समर्थ रामदासांना पत्र
समर्थ रामदासांना पत्र
माननीय समर्थ रामदास स्वामी महाराज
साष्टांग दंडवत
अहो तुम्ही नारायण सूर्याजी ठोसर, ते समर्थ रामदास या पदापर्यंत येण्यासाठी, या नारायणाला समर्थ रामदास होण्यासाठी अनेक दिव्ये करावी लागली. आणि अगदी रामरायाने तावून-सुलाखून घेतले, तेव्हा कुठे तुम्ही लोकमान्यता पावलात, आणि समर्थ रामदास स्वामी झालात.
अगदी लहानपणापासून मला तुमच्या चरित्राचे फार आकर्षण होते, त्यातून सज्जन गड जवळ वर्षातून एक-दोन वेळा तरी जाणे होई, आणि तुमच्यावरती असणारी खूप पुस्तके वाचली, आई-वडील दोघेही कथा सांगताना तुमच्या गोष्टी सांगत असत, आणि तेव्हाच मी मनोमन असे ठरवले की, मी जर गुरु केला तर ते, "समर्थ रामदास स्वामीच" "माझे गुरु असतील.
त्या लहान वयात देखील तुम्ही आवडण्याचे कारण काय माहिती का? कारण तुमचं ठोशास ठोसा हे आवडतं तत्व, तुम्ही कधी कोणाकडून मार खाल्ला नाहीत तर, यवनांच्या राजवटीत देखील यवन लोक देखील तुम्हाला घाबरत असत ,आणि तुमचा उचित सन्मान करत असत. अर्थात चमत्काराशिवाय नमस्कार कोठेच नसतो. आणि ते तुमच्यावरती शस्त्र उगारून आलेले यवन सैनिक, त्यांना तुम्ही चांगला तुमच्या दंडुक्याच्या प्रसाद दिलेला ही कथा ऐकताना आम्ही खूप हसायचो, खुश व्हायचो.
तुमचा गुरुभक्ती कशी असावी याबाबत कल्याणा छाटी ही कथा, उद्धव कल्याण स्वामी हे तर शिष्य होतेच, पण त्या काळात तुम्ही वेणाबाई सारख्या स्त्रियांना देखील आपले शिष्यत्व दिले त्यांना आपल्याबरोबर गडावरती ठेवले आणि त्यांचा उद्धार केला. लहानपणी तुमच्या यवनांना झोडपलं, तो कोणीतरी एक बादशहा म्हणाला मला परमेश्वर दाखव तेव्हा तुम्ही लहानशा भोकातून आरपार गेलात आणि त्याला म्हणाला तेथून आला इथे देव उभा आहे, तुमचा कोणी एक शिष्य माधुकरी मागायला गेला तेथील ज्योतिषाने सांगितलं की उद्या तो शिष्य मरणार आहे. तुझे गुरु जर खरच महात्मा असतील तर तुला वाचवतील मग तुम्ही त्या शिष्याला कसं वाचवलं, आणि दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कसा माधुकरी मागायला गेला, डाळ गप्पू या शब्दाचा तुम्ही केलेला वि ग्रह, कुठेतरी तुमच्या शिष्यांना जबरदस्तीने यवन समीष भोजन जबरदस्तीने खायला लावत होते तेव्हा तुम्ही त्या अन्नाची केलेली मिठाई, या कथांचे आकर्षण होते .
पण जशी मोठी झाले ना! तशी तशी तुमचे वेगवेगळे पैलू कळायला लागले. ज्यावेळी एकीकडे शिवाजी राजे स्वातंत्र्यासाठी सगळ्या पातशाह्या विरुद्ध शस्त्र उचलत होते ,त्याच काळात तुम्ही समाजाचे प्रबोधन करत फिरत होतात. देश, गाव, खेडी, पिंजून काढत होतात .एक प्रकारची जनजागृती करत होतात. ज्यावेळी मुठभर यवन घोडेस्वार येऊन गावेच्या गावे लुटत होते, जाळपोळ करत होते, तरण्याताठ्या लेकी सुनांना उचलून नेत होते, आणि आम्ही काय करत होतो तर त्यांच्या भयाने रानोमाळ पळत होतो, लपून बसत होतो. परंतू प्रतिकार करण्याचा विचार देखील करत नव्हतो. त्यावेळी तुम्ही "वन्ही तो चेतवावा रे "अशा मंत्राने लोकांमध्ये जनजागृती सुरू केली. बलाची उपासना करण्यासाठी कित्येक गावांमध्ये तरुण पिढीची एक फौज तयार केली, त्यामध्ये तुम्ही मारुतीरायाच दैवत निवडले का निवडले?
कारण तो रावणाची लंका देखील जाळू शकत होता. परंतु आपल्या ताकतीचा त्याला कधीही गर्व नव्हता, तर तो दास मारुती म्हणून राहत होता.
अशा पद्धतीने तुम्ही गावोगावी मारुतीच्या स्थापना करून लोकांमध्ये बल उपासना करण्यास सुरुवात केली. आणि तीच माणसे पुढे राजांच्या फौजा मध्ये मावळे म्हणून भरती होत होते. संपूर्ण भारत पाया खाली घालून तेथील प्रजेची होणारी ससेहोलपट पाहून तुम्ही व्यथित झालात, अशा दुर्बल आणि भयभीत जनतेला परमार्थाचा उपदेश करणे म्हणजे अजूनच दुर्बल बनविणे ,हा विचार करून तुम्ही प्रथम समाज संघटित केला, शक्तिसंपन्न आणि बलशाली समाज झाला पाहिजे, समाजाचा आत्मविश्वास जागृत केला पाहिजे हा विचार करून बलोपासनेवर भर दिला. गावोगावी मारुतीची स्थापना केली, श्री मारूती म्हणजे काय? बल, शक्ती आणि स्वामी कार्यासाठी सदैव तत्परता. गावोगावी तालमी सुरू केल्या, आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार तुम्ही स्वतः रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होतात, "भीमरूपी" सारखे बलाची प्रेरणा देणारे स्तोत्र आणि "सत्राणे उड्डाणे" सारखी प्रलयंकारी आरती तयार करून एक प्रकारे सुलतानी राजवटीविरुद्ध झुंजण्याचा अघोषित मंत्र तुम्ही दिला.
अकराशे मठ स्थापित केले, चौदाशे मुलांना दीक्षा दिली, हिमालयातसुद्धा तुमचा स्थापित मठ आहे. राजकारण आणि धर्मकारण अंतर्भूत करणारे धर्मपीठ आणि राज्य शक्ती यांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालावे असे सांगणारे एकमेव असे संत तुम्ही आहात. यवनांच्या भयाने इस्लामी राजवटीत, नदीत डोहात लपविलेल्या मुर्त्या बाहेर काढून ,त्यांची पुन्हा प्रतिष्ठापना करायला लावणारे, लोकांना अन्यायाचा प्रतिकार करावयास शिकवणारे ते एकमेव असे तुम्ही आहात! जागोजागी तुमचे गोसावी, बैरागी तयार होते जे शिवाजीराजांना गुप्त संदेश पुरवत होते.
अशी एक यंत्रणाच तुम्ही तयार केली होती.
बर! तुमची योग्यता याहीपेक्षा फार मोठी आहे. अध्यात्म शिकावं तर तुमच्याकडूनच! महंत कसा असावा, एका समासात तुम्ही त्याचं छान वर्णन केल आहे. आजकाल कोणी छोट्याशा पदावर गेला तरी लगेच त्याला गर्व चढतो, पण तुमच्या दासबोधा मधील महंताची व्याख्या फार वेगळी आहे.
तुमच्या दासबोधा मधील मुर्खा ची व्याख्या खूप योग्य आणि हसण्यासारखी आहे, प्रत्येक समासामध्ये अनुप्रास अलंकार साधून, तुम्ही दासबोध लिहिला आहे. त्यातल्या प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द कित्येक रोगांची नावे म्हणजे एक साधा त्वचारोग जरी घेतला तर त्याचे किती प्रकार या सगळ्या गोष्टींचे ज्ञान तुमच्याकडे कोठून आले होते?
माणसाने माझं माझं करू नये ,कसं निरिच्छ असाव, याचं साधं उदाहरण देताना तुम्ही सांगता ,की हे घर तुम्ही म्हणता माझ आहे, पण हे घरच काय पण शरीर तरी तुमचे आहे का? मुंग्या म्हणती माझे घर, उंदीर म्हणती माझे घर, पाली म्हणती माझे घर,इतकेच काय तुमच्या शरीरातले कृमी कीटक जंतू तुमच्या शरीराला माझं घर म्हणतात, हेच प्रबोधन तुम्ही साध्या सोप्या शब्दात करता, विश्वाची उत्पत्ती कशी झाली ?हे वर्णन सगळ्या पोथ्या पुराणांमध्ये आहे. पंचमहाभूते कशी तयार झाली, आणि प्रलयाच्या वेळी पुन्हा ती कशी एकमेकात विलीन होतात हे सगळ्या पुराणांमध्ये आहे. परंतु ते समजत नाही.
पण जेव्हा तुमचा अर्थासहित दासबोध वाचला, तेव्हा अगदी सोप्या सुलभ शब्दांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली? ब्रह्म म्हणजे काय? अहम ब्रह्मस्मी म्हणजे काय? सारी पंचमहाभूते कशी निर्माण झाली! ती एकमेका तून कशी उत्पन्न होतात आणि प्रलयाच्या वेळी एकमेकात कशी विलीन होतात यायचं सोप्या शब्दात तुम्ही उदाहरण दिले आहे, की जे माणसाला कळते.
तुम्ही स्वतः एक पुरुष होतात, ब्रह्मचारी होतात, तरीही स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ कसा तयार होतो, हे त्या काळामध्ये एक्स-रे सिटीस्कॅन उपलब्ध नसणाऱ्या काळामध्ये, तुम्ही तंतोतंत वर्णन करून सांगितलेले आहे. तुमचा दासबोध एकदा वाचल्यानंतर ती एक पोथी नसून, किंवा एवढी पारायणे केली असे सांगण्याची गोष्ट नसून, ते तत्वज्ञान आहे. त्यामधून ज्ञानप्राप्ती होते.
शिवथर घळीच्या शांत सुंदर वातावरणामध्ये तुम्ही तो दासबोध लिहिला आहात, आपण कितीतरी धबधबे पाहतो परंतु
"धबाबा ओतील्या धारा, धबाबा तोय आदळे" या एका शब्दात त्या रोरावत या धबधब्याचे वर्णन येते
तुमच्या कितीतरी उक्ती समाजामध्ये रूढ आहेत, प्रचलित आहेत .
उदाहरणार्थ
"यज्ञ तो देव जाणावा,
"आधी केले मग सांगितले"
"वन्ही तो चेतवावा रे
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
"समर्थ रामदास महाराज तुमच्या काळात तुमच्याबरोबर ती वावरलेले शिष्य खूप भाग्यवान ,आम्ही फक्त कथा ऐकायच्या ,
चला किमान विश्व लेखिकेच्या निमित्ताने तुम्हाला पत्र लिहिण्याची तरी संधी मिळाली. हेही नसे थोडके
तुमची आज्ञाधारक शिष्या