शेवटचा मेसेज
शेवटचा मेसेज
स्क्रीनवर शेवटचा मेसेज फ्लॅश झाला, 'लव्ह यू सीया.. बाय'.. वेळ ३ मिनिटांपूर्वीची..
त्या सेना अधिकाऱ्याचे डोळे पाणावले.. कोणाचा होता तो मोबाईल? शोधणं अशक्य होतं.. पण ड्युटी हाक मारत होती.. तसा त्याने तो मोबाईल एव्हिडन्सच्या पिशवीत टाकून ती खिशात कोंबली आणि त्या पन्नास माणसं एकमेकांवर उभी राहतील एवढ्या उंचीच्या गाळाकडे एक हताश कटाक्ष टाकला.. निसर्गदेवतेचं तांडव थांबलं होतं पण काय झालं असेल या कल्पनेनेच अंगावर शहारा उठत होता..
मंदिरांचे कळस.. यात्री / भाविकांची गर्दी.. पूजेचं साहित्य, थंडीपासून संरक्षण देणारे विविध कपडे आणि खाण्यापिण्याच्या दुकानांच्या रांगा.. चालत, चढत, दमत, हसत, नामस्मरण करत वावरणारे लोक.. या सगळ्यांची सेवा करत लगबगीने धावणारे रहिवासी.. क्षितिजापर्यंत पसरलेला निसर्ग.. शांत करणारी हिरवाई, निरभ्र आकाश, अधेमधे कोसळायला येणारे काजळी कायेचे मेघ, आपली नजर पोहोचणार नाही अशी एका दरीमागोमाग दुसरी खोल दरी, बोचणारी थंडी.. दडी मारून बसलेला चंडाशू.. अधूनमधून भिजवून आणि रिझवून जाणाऱ्या सरी..
अशा नयनरम्य स्वप्नवत दुनियेची वाताहत झाली होती.. उत्तरेकडून सुटलेल्या जलप्रवाहाने सगळ्या उत्तराखंडाच्या आयुष्याला भकास राखाडी रंग फासला होता.. आयुष्याच्या उतरणीला पापमुक्ती म्हणून लोक चारधाम यात्रा करायला जातात.. देवाने एकत्रच ती बहाल केली जणू.. हृदय पिळवटून टाकेल एवढा रुद्रावतार पाण्याने दाखवला.. माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही हेच देवाने दाखवून दिलं..