शेतकरी नवरा नको ग बाई..
शेतकरी नवरा नको ग बाई..
नमस्कार,
नुकताच एका वृत्तवाहिनी वर वरील टॅग लाईन असलेला कार्यक्रम बघितला आणि मन सुन्न झाल. म्हणून काहीस एक शेतकरी पुत्र या नात्याने या विषयावर प्रकाश टाकावा म्हणून लिखाण प्रपंच करत आहे.
भारत नावाला कृषीप्रधान देश उरला आहे. अर्थात शेतीवर अर्थशास्त्र चालत असेल देशाच मात्र शेतकरी उध्वस्त झाला आहे. मुलींना शेतकरी नवरा नकोय, याआधी शेतकर्यांच्या पोरांना तरी शेती करायची आहे का..? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरातील मुलगी जी शिकलेली आहे, जिचे आई वडील सुशिक्षित आहे, नोकरदार आहे अशी मुलगी शेतकऱ्याशी लग्न करेल हे खुप क्वचित होत. पण जिच्या सात पिढ्या शेतीत राबून गेल्या, जिचा बाप शेती करतो ती तरी शेतकरी नवरा हवा अस म्हणते का...? तर नाही. अस का याचे कारण आपण नंतर समजून घेणारच आहोत. मात्र ठिक आहे मुलीला नवरा शेतकरी नको. मग तिच्या शेती करणार्या आई-बापाला तरी शेतकरी जावई हवा आहे का...? तर याच ही उत्तर नाही. बर मग तिचा भाऊ जो शेती करतो त्याला दाजी म्हणून शेतकरी मुलगा चालेल का..? तर याचही उत्तर नाही. मग फक्त मुलीला दोष देऊन उपयोग नाही. कारण स्वतः शेतकरी असलेला मुलगा, शेतकरी बाप आपल्या मुलीला शेतकर्याला देत नाही म्हणजे काही तरी दुसर चुकत आहे. याचीच कारणमीमांसा करण्यासाठी मी काही कारणे मांडत आहे.
1) आमच्या बापजाद्यांकडे शेकडो एकर जमिनी होत्या, मात्र आज त्या गुंठ्यावर येऊन ठेपल्या आहे.
2) एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येत असल्याने शेती साठी लागणारे संख्या बळ कमी होऊन, शेतकर्यांना इतरांना मोलमजुरी द्यावी लागते. पर्यायी उत्पादन खर्च बघता नफा काहीच उरत नाही.
3) सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतीमालाल न मिळणारा हमीभाव.
4) शेतीमध्ये करावे लागणारे काबाडकष्ट आणि त्याबदल्यात मिळणार उत्पन्न यात जमीन आसमानाचा फरक असतो. नोकरदार एक व्यक्ती काम करतो आणि सगळ घर बसून खाते, शेतकरी मात्र घरातील गुरा ढोरांसह आणि घरातील म्हातारा देखील कष्ट करून सुध्दा हालाखीच जीवन जगतो.
5) रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग, कुठलीही वेळ काळ न बघता पाणी भरायला जाव लागत. अस्मानी संकंटाना तोंड द्यावे लागते.
6) शेतकरी देखील शेतकर्यांच्या भल्यावर नाही, आजही कित्येक न्यायालयात शेतीच्या बांधा वरून, शेतीच्या रस्त्यावरून लाखो केसेस सुरू आहेत.
7) शेतकरी म्हटलं कि, तो एक सोशिक चेहरा आठवतो. का...? तर आमच्या शेतकर्यांना हमी भाव न मिळाल्याने त्याची ती अवस्था झाली आहे.
ही आणि अशी अनेक कारण देता येईल. शेतकर्यांना देखील आपल मुल शेतकरी व्हाव किंवा मुलीला शेतकरी नवरा बघाव वाटत नाही. मुलींना जेव्हा विचारल गेल कि, शेतकरी नवरा का नको..? तर त्यांची उत्तर मला बालिश वाटली. त्यांच्या मते गावाकडे लाईफस्टाईल नाही,स्वातंत्र्य नाही,एकत्र कुटुंब नको, कष्ट नको , गावाकडे मुलीला समजून घेतले जात नाही. यांच्या या प्रश्नाच एकच उत्तर आहे. एखादा शेतकरी आधुनिक शेती करत असेल आणि त्याच्या कडे लाखोचा इनकम असेल , गाडी बंगला असेल तर यांच्या पैकी किती मुली नाही म्हणतील. मुळात शेतीच्या मालाला हमीभाव आणि वरील इतर कारणे बघितले असता लक्षात येईल कि, साहजिकच कुठल्याही शेतकर्यांच्या पोरीने आपल्या बापाला वरील सर्व परिस्थिती मध्ये रडताना च बघितले असेल. मग कुठली मुलगी किंवा बाप स्वतः च्या पायावर दगड मारुन घेईल. मग याला पर्याय काय तर भविष्यात नुसते खोटे आश्वासन न देता, स्वामीनाथन आयोग लागू करावा. शेतकर्यांना मुबलक प्रमाणात विजेची व्यवस्था करावी. पिकेल ते विकेल यासाठी मोठ्या प्रमाणात काम करून धोरणे आखावी. शेतीला दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, कुक्कुटपालन यासारखी आणखी जोडधंदे निर्माण करावी. कुठलेही निकष न लावता या उद्योग धंद्यासाठी होईल ती मदत सरकार ने करावी. खेड्यांना शहराच्या बरोबरीने निधी उपलब्ध करून देऊन सर्व सुख सुविधा मिळतील ही काळजी सरकार ने घ्यावी. भविष्यात येणाऱ्या या संकटाला 80% आजतागायत आलेली आणि चालू सरकार जबाबदार आहे. मतांच्या राजकारणासाठी मदत, नुकसान भरपाई सारखे गाजर देऊन प्रश्नांच्या मुळापर्यंत न जाता ते तसेच झुलवत ठेवायचे. ज्या दिवशी हमीभाव मिळेल, विज, पाणी मिळेल, पक्के रस्ते मिळतील त्या दिवशी माझ्या शेतकर्यांना सुगीचे दिवस येतील. शेतकरी जेव्हा पैसे वाला असतो ही धारणा जेव्हा लोकांची होईल तेव्हा पुन्हा शेतकर्यांच्या मुलांसाठी मुलीचे बाप चकरा मारतील.
