सासरीजाण्याच्या वेळेस
सासरीजाण्याच्या वेळेस
सनईच्या मंजुळ सुरांनी संपूर्ण हॉल गुंजत होता. आब्यांच्या पानाने विवाहमंडप शोभत होता. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व आप्तजन अक्षतांचा सुखद वर्षाव करत होते. जन्मोजन्मीसाठी आता माझे होणारे ते माझ्याकडे बघून हसत होते. सर्वत्र आनंद पसरला होता... पण हा आनंद, हा स्नेह, हे प्रेम मला खुपत होते. ज्या घरी मी वाढले आज त्याच घराचा उंबरठा ओलांडून मी कायमची जाणार होते. ‘आपली आता परकी’ आणि ‘परकी आता आपली’ होणार होती! नवीन घर... नवीन जागा... नवीन लोकं... कशी असतील? त्यांच्याशी आता कसं निभवायचं ह्या विचारमात्रने मन कासावीस होत होतं. आईची साथ नाही... बहिणभावंडांची सोबत नाही... आणि वडील!!! आपोआप माझी दृष्टी वडिलांकडे वळली. ते नेहमीसारखे सर्वांशी हसून खेळून बोलत होते. आईचे डोळे ओले होते. भाऊ माझ्याकडे पाहून हसत होता पण त्याचे ह्रदय रडत होते. लहान बहिण गपचूप एका कोपऱ्यात बसली होती, पण वडील!!! ते मात्र स्वस्थ उभे होते! अखेर विवाहसोहळा संपन्न झाला. सर्वांचा निरोप घेऊन सासरी जाण्याची वेळ आली.
‘हे परमेश्वरा... गुरुजींच्या मुखात थोडे अजून श्लोक ठेवले असतेस तर थोड्यावेळासाठी तरी ही वेळ टळली असती. पण आता...’
आईच्या गळ्यात पडून आम्ही दोघी ढसाढसा रडू लागलो. भाऊ सांत्वनाचा हात माझ्या पाठीवर फिरवू लागला. बहिणीला मामाने आवरलं. माझे वडील... ते दूरच उभे होते. आई मला सोडायला तयार होत नव्हती. शुभ मुहूर्त निघून चालला होता. अखेर काका जवळ आले आणि त्यांनी माझ्या आईचे सांत्वन केले. आईच्या रुद्नाचा स्वर थांबला पण अश्रू वाहतच होते.
आईला सोडून मी माझ्या वडिलांच्या जवळ गेले. मला वाटलं माझे बाबा मला पाहून खचून जातील, आसवांनी मला भिजवून टाकतील. पण ते मात्र “सुखी रहा...” असं म्हणून तिथून निघून गेले. माझ्या वडिलांचा स्वभाव पहिल्यापासून कडक. आम्हा सर्व मुलांना ते खूपच धाकात ठेवायचे. आम्ही त्यांना हिटलर म्हणूनच संबोधायचो. परंतु आजची त्यांची ही तानाशाही मला बिलकुल पटली नाही. मला माझ्या वडिलांना भेटून मनसोक्त रडायचं होतं. परंतु त्यांच्या ह्या वागणुकीचा मला खूप राग आला. आज मुलगी घर सोडून चालली आहे आणि त्याचा इतका फिक्कट प्रतिसाद! मुलांना धाकात ठेवलं पाहिजे; पण एवढं? काय त्यांच्या जीवनात माझं काहीही मोल नाही? मी खूप संतापले.
‘बाबा, तुम्ही कधी चांगले वडील बनूच शकला नाहीत’, असं सांगण्यासाठी मी त्यांच्या मागोमाग धावून गेले. आजपर्यंत आम्ही कोणी भावंडांनी त्यांच्यासमोर वर मानकरून बघण्याचं धाडस केलं नव्हतं पण आज मी त्यांच्यासमोर बोलायला जात होते. त्यांना वास्तविकतेचं भान करून देणं खूप गरजेचं होतं. आज वर्षानुवर्ष साठलेला राग माझ्या ओठांवर येण्यासाठी तडफडत होता.
बाबा त्यांच्या खोलीत गेले होते. मी घाईघाईने पाऊल त्या दिशेला वळवले. पण दाराजवळ येऊन मी थांबले. माझा सगळा राग एका क्षणात ओसरला. मला धावत जाऊन त्यांना भेटून हे सांगायची इच्छा होती की, “मला माफ करा बाबा... मला माफ करा...” पण असं अचानक त्यांच्यासमोर गेले तर त्यांना कसं वाटेल? असा विचार येताच मी तिथून माघारी वळले आणि माझ्या वडिलांना ढसाढसा रडू दिलं, माझ्या सासरीजाण्याच्या वेळेस.