सांजसखी
सांजसखी
मिष्का पार्थीहून साधारण आठ वर्षांनी मोठी. तिच लग्न झाल होतं. एक मुलगा आणि प्रेमळ नवरा असा सुखी संसार. पण तरीही पार्थी आणि तिची झक्कास मैत्री होती. दोस्ती झाली तेव्हा नुकतंच इंटरनेट सुरु झालं होतं. भेटण कमी व्हायचं दोघांचं. पण याहू मेसेंजरवर खूप गप्पा मारायचे दोघे. मिष्का पार्थीला सतत चिडवायची कोणत्या ना कोणत्या मुलावरून. ती ही ते एकदम खेळीमेळीने घ्यायची. अशीच दोघांची दोस्ती वाढत होती. पार्थीच्या घरी गणपतीला नवऱ्याला आणि लेकाला घेऊन ती गेली होती. तिच्या मनात होतं कदाचित् पार्थीचे पालक आणि तिचा नवरा असे सगळे मिळून एक कौटुंबिक मैत्री होईल. पण तसं काही झालं नाही. अर्थात त्याचा तिला विषाद वाटला नाही; की त्याला दु:ख झालं नाही. 'त्यांचं नाही जमल, पण आपण दोस्त आहोत न? एवढं बास आहे की!'
पार्थीच लग्न ठरलं. ठरलं म्हणजे ठरवलं ते ही प्रेम विवाह! तीच्या लग्नाला मिष्का हौसेने आली मग मंगळागौरीला देखील. पण त्याच्या कुटुंबात काही मैत्री नाही झाली. 'नाही तर नाही. आपण दोस्त आहोत न? बास आहे की!' परत एकदा दोघांच्या मनात होतं...!!
पार्थीचा नवरा तिला घेऊन परदेशात निघाला. थोडं अजून चांगलं आयुष्य मिळवायला. मिष्का अगदी धावत पळत गेली विमानतळावर भेटायला, पण तिला तसा थोडा उशीरच झाला. ती पोहोचली तोपर्यंत ते दोघेही आत गेले होते. पार्थीच्या आई-वडिलांशी थोडफार बोलून ती जड मनाने परतली. घरी खिडकीत बसून दोघांच्या मेसेंजरवरच्या गप्पा, कधीतरी अधून मधून भेटले होते तेव्हाचे किस्से आठवत होती आणि अचानक तिचा मोबईल वाजला. तिचा फोन होता. विमानतळावरून! तिच्या डोळ्यात पाणी उभं राहीलं.
"जातेस?"
"हो ग! जायला हवं न?"
"हम्! विसरशील?"
"वेडी! आणि तू?"
"वेडी आहेस?"
"मेल्स करत जा...."दोघींनी एकमेकांना बजावल.
दिवस जात होते... महिने... वर्ष.... संपर्क थोडा कमी झाला होता. दोघीही संसारात अडकत जात होत्या पण मेल्स मात्र चालू होते आणि मग दोन वर्षांनी आली इथे. तीने दुसऱ्याच दिवशी तिला फोन केला.
"भेटशील?"
"हा काय प्रश्न आहे? उद्या एका कामासाठी चर्चगेटला जाते आहे. तू येतेस तिथे?"
"ओके!"
मिष्का तिचं काम पटकन उरकून स्टेशनवर पार्थी ची वाट बघत येऊन बसली होती. तिला पार्थी दिसताच धावतच तिला मिठी मारून मनापासून हसली. क्षणभर गोंधळ उडाला पण मग स्टेशन गुलाबी झालं. मग खूप गप्पा! त्यांना आलेल्या अडचणी... त्यावर त्याने केलेली मात.... आता छानशी नोकरी.... सगळं कसं छान चालू आहे ते अगदी उत्साहाने सांगत होता आणि मिष्का समाधानाने मनापासून ऐकत होती. तिच्या आयुष्यात घडलेले आणि घडणारे बदल ती देखील मनापासून त्याला सांगत होती. तिच्या डोळ्यात खोलवर बघत ते ऐकत होती.
"असं काय बघतेस?"
"काही नाही."
"ए तुझ्या डोळ्यांच्या पापण्या मला फार आवडतात; आणि तुझे ब्राऊन डोळे तर खूपच गहिरे आहेत."
"फक्त माझे नाही... तुझे पण त्याच रंगाचे आहेत. आणि त्याला ब्राऊन नाही तर गावठी मधाचा रंग म्हणतात."
" कोणता रंग म्हणतात आणि कोण म्हणत असं?" मिष्का चेष्टेच्या मूड मध्ये म्हणाली.
"आम्ही.... म्हणजे मी ग. तुझ्या डोळ्यातला गावठी मध मला गुंतवून ठेवतो." पार्थी ओलावलेला हळुवार आवाज मिष्काच्या कानात रुंजी घालू लागला.
मिष्का तिच्या बोलण्यावर फक्त हसली अगदी मधाळसं!
जमेल तसं पण दोघी भेटत होत्या आणि मग हे जणूकाही ठरुनच गेलं. दर वर्षी पार्थी भारतात यायची मग कधी एखादा बस स्टॉप गुलाबी व्हायचा तर कधी एखादा मॉल वा एखादी बाग..!!
मैत्री पलीकडचं एक ओढ लागलेलं नातं होतं, पण त्याला नाव नव्हतं. सगळंच कसं शब्दातीत होतं पण होतं!!! एकमेकींच्या आयुष्यात घडणारी लहानात लहान गोष्ट एकमेकींना माहित असायची. इतकंच काय पण ई मेलचा पासवर्ड देखील माहित होता. अगदी त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती होती. वर्षभरात एकदा भेटली की दोन गिफ्ट्स नक्की असायची. एक पाडव्याचं आणि एक वाढदिवसाचं. पाडवा? हो!! पाडवा!!! कधी सुरु झालं ते दोघीनाही आठवत नव्हतं.
मिष्का पार्थीला हाक मारताना कधी 'राणी' म्हणायची तर कधी 'डार्लिंग'. पार्थी मात्र त्याला नेहेमी नावानेच हाक मारायची. का? कारण अस काही नाही पण मिष्का नावाप्रमाणेच प्रेमळ होती म्हणून असेल कदाचित..!
असच एकदा पार्थी आली होती पण यावेळचा तिचा नूर वेगळा होता. एरवी मिष्का खूप बोलायची आणि पार्थी फक्त तिच्याकडे बघत तिचं ऐकाचयची पण यावेळी पार्थी खूप भरभरून बोलत होती आणि मिष्का मनापासून ऐकत होती. इतक्या वर्षात दोघीनाही काही गोष्टी न सांगता देखील कळायला लागल्या होत्या. त्यांच्यात काहीतरी बदलंत होतं. ते प्रेम(?) एक वेगळं वळण घेत होतं.
मिष्का तिला मिळालेला मेल बघून हरखून गेली.
दिवस, महिने... वर्षे सरली,
तशीच ओढ तरी का मज तुझ्या भेटीची?
नेहेमीच होते मन अधीर भेटण्यास तुला;
जाते चुकवून हळूच काळजाचा ठोका,
दिसताच तू वाटे धडधड अनामिक,
बोलायचे असे बरेच,पण शब्दच हरवतात,
असे काही जादू तुझ्या स्पर्शांत,
मज जाणवले ते प्रत्येक क्षणात,
घेताच मी हात तुझा माझ्या हाती,
होते शांत काहूर उठले जे मनात..!!!
तिने मेल वाचला आणि ती हसली. डोळ्यात अश्रू तरळले होते का दोन? फक्त तीच्यासाठी? कुणास ठाऊक!
तिने त्याला फक्त 'मस्त' इतकाच रिप्लाय केला. अन् पुरेसा होता तो तिच्यासाठी..! एक मंद स्मित होतं पार्थी च्या चेहेऱ्यावर मिष्का तो एक शब्दाचा मेल वाचताना.
त्यानंतरच्या एका भारत भेटीत त्या दोघी भेटल्या होते तेव्हा मिष्का तिच्या डोळ्यात खोल बघत तिला विचारलं.
"एक सांगू?"
"अजूनही अस विचारवं लागतं का आपल्यात?"
"तरीही....."
"बरं... बोल..!"
"तुला प्रपोज करणार आहे."
"एका अटीवर..!"
"कोणत्या ग राणी?"
"नरीमन पॉईंटला..! कोसळत्या पावसात..! एका गुढग्यावर बसून करणार असलीस न तरच!!!' पार्थी हसत म्हणाली.
त्यावर तिचा हात हातात घेत मिष्का म्हणाली, "तुला कसा कळला माझा प्लान?"
मग दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून खळखळून हसले.
मैत्री फुलत होती...!! नातं मुरत होतं आणि जगाचं राहाटगाडगं देखील फिरत होतं.
आणि एकदिवस अचानक पार्थीचा मेल आला.
"मी घोळ घालून ठेवला आहे. माझ्या नवऱ्याने तुझे माझे संवाद बघितले. तसं मी नेहेमी डिलीट करते ग. पण काल राहिलं आणि त्याने माझा फोन हाताळताना तुझ नाव वाचून आपलं चाट उघडलं आणि बघितलं. आपल्या साध्याच गप्पा होत्या नेहेमी प्रमाणे पण तू माझा उल्लेख 'राणी', 'सोन्या', 'डार्लिंग' असा केलेला बघितला आणि मग घरात तिसरं महायुद्ध झालं. त्याने लगेच आई-बाबांना फोन करून सांगितलं. त्यांना हे माहित आहे की आपण अधून मधून बोलतो; पण तरीही त्यांना देखील या असल्या गप्पा पटल्या नाहीत. त्याचं देखील बरोबर आहे आपली जी आणि जशी मैत्री आहे ती सहसा कोणाला पटणार नाही. म्हणून त्यांच्या समाधानासाठी तुला एक मेसेज करते आहे. "
"आपल्यामध्ये जी काही मैत्री आणि जे काही होतं ते सगळं मी थांबवत आहे. ह्या पुढे मी तुला कुठलाही मेसेज, वां इतर काहीही कॉन्टॅक्ट करणार नाही. गुड बाय..!!"
मिष्काला धक्का बसला पण क्षणभरात तिने स्वतःला सावरलं आणि पार्थीच्या मेसेजला उत्तर लिहीलं.
"जे काही होतं?आपली एक चांगली हेल्दी मैत्री आहे किंवा होती म्हणू. हे अचानक काय आलं? पण ठीके! नाही बोलायचं तर नको. तू माझ्याशी किंवा मी तुझ्याशी न बोलल्यामुळे आपलं आयुष्य थांबणार नाही आहे किंवा बोलल्यामुळे आयुष्य वेगळं देखील होणार नाही आहे. मुळात आपण असं किती बोलतो; की बोलणं थांबवायचा मेसेज तू करोत आहेस? एक लक्षात घे मी एक सुखी सांसारिक स्त्री आहे. तुझे आई-वडील नवरा आणि माझा नवरा एकमेकांशी का कन्फर्टेबल होऊ शकले नाहीत ते मला माहित नाही. त्यामुळे माझं देखील तुझ्या आई-वडिलांशी बोलण थांबलं पण असं का झालं ते मी त्यांना देखील कधी विचारलं नाही. बरं; थट्टा, मस्करी, गप्पा या व्यतीरिक्त आपण नक्की काय बोलतो की तू म्हणावस की जे काही होतं? अरे माझा मुलगा आणि नवरा देखील माझा मोबाईल हाताळतात आणि माझी त्याबद्दल काही हरकत देखील नाही. ते दोघे फोन घेतात म्हणून मी कधी तुझे मेसेज डिलीट नाही करत. तुझा हा मेसेज बघून त्यांचा काही गैरसमज होऊ शकतो ना. किमान दहा वेळा विचार करायचास की मेसेज करताना. बरं; फक्त तुझ्या माहितीसाठी सांगते आहे. मी हे मेसेज पण डिलीट नाही करणार. जर त्यांनी बघितले आणि काही विचारलं तर मी स्पष्ट सांगीन की आम्ही बोलायचो आणि तिने असा अचानक हा मेसेज का पाठवला तीच तिला माहित. तुला माझी बाजू सांगणं मला गरजेचं वाटलं म्हणून हा मेसेज करते आहे. गुड बाय. "
तीने व्हॉट्स ॲप चाट बंद केल आणि तशीच स्वस्थ बसून राहिली. तिला फार वाट बघायची गरजच नव्हती. मेल आल्याचं तिच्या मोबाईलने लगेच ओरडून सांगितलं तिला. तिने हसतच इनबॉक्स उघडलं.
"अग हा काय मेसेज केलास? मी फक्त त्यांच्या समाधानासाठी मेसेज करत आहे असा मेल केला होता तो बघितला नाहीस का? रागावली आहेस का? खरंच बोलायचं नाही का आपण आता? अर्थात तू अस ठरवलं असलंस तर तुझं देखील बरोबर आहे म्हणा. हे असं खोटं बोलून नाव नसलेलं नात जर तुला पटत नसेल तर मी तुला काहीच प्रश्न नाही विचारणार."
मिष्का हसली. मात्र लगेचच तिचा उतरलेला चेहेरा तिच्या डोळ्यासमोर आला आणि तिने घाईघाईने रिप्लाय केला.
"वेडी आहेस तू अगदी. माझ्या मेसेजने तू जर गडबडली आहेस तर नक्कीच त्याचा योग्य तो परिणाम इतरांवर झाला असेल न? मला कळतं की नाही पटणार तुझ्या घरच्यांना हे असं आपलं बोलणं. ही मैत्री स्वीकारणं अवघड आहे सगळ्यांना. तो मेसेज करताना देखील मला मनातून वाटत होतं की खरं तर हे असं काहीतरी एक बोलायचं आणि वेगळंच वागायचं मला पटत नाही. तसा माझा काय आणि तुझा काय स्वभाव नाही. पण कोणालाही काहीतरी सिद्ध करून दाखवण्यापेक्षा आणि काय पटतं आहे किंवा नाही याहीपेक्षा तुझं माझ्या आयुष्यात असणं मला जास्त महत्वाचं वाटतं. तुझं मन देखील हेच सांगतं आहे तुला याची मला खात्री आहे. त्यामुळे आता फार विचार करू नकोस. झालं गेलं संपलं ते सगळं. बस! आता मात्र काळजी घे."
मिष्का मेल वाचून पार्थी विसावली आणि मग त्याचं उत्तर आलं तिच्या मेलला.
"आठवतं का ग असंच एकदा आपण गप्पा मारत होतो; तेव्हा कधीतरी मी तुला विचरलं होतं 'काय नाव द्यावं आपल्या या नात्याला?' आणि तू म्हणाली होतीस 'या नात्याला नाव नको देऊया.' पण आत्ता माझ्या मूर्खपणामुळे ज्या काही घटना घडल्या आणि तू मला सावरून घेतलंस आणि त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे तू का सावरून घेतलंस याचं कारण सांगितलंस आणि मनात आलं खरंच काही नाव का नसावं ह्या नात्याला? किंवा काय नाव देता येईल ह्या नात्याला? तसं आपल्या सामाजिक परिस्थितीत आपलं हे नातं कुठेच बसत नाही. म्हणजे 'खूप चांगली मैत्री'च्या बरंच पुढे किंबहुना मैत्रीच्या देखील पलिकडे गेलंय हे नातं. तरीही अस्तित्वात असलेल्या कोणत्याही नात्यापर्यंत पोहोचू न शकणारं असं हे विलक्षण साधंसं आणि तरीही गुंतागुंतीचं...! भावनिक आणि तरीही सुंदर नातं आहे हे. मग मनात विचार आला ह्या विलक्षण नात्याला नाव देखील तेवढंच विलक्षण हवं. नाव असावंच असं नाही, पण काय आहे न आपलं दोघींचं हे नातं खरंच खूप सुंदर आहे. इतकी वर्ष होऊनही तेवढंच जिवंत आणि तरुण आहे. ना कधी भांडण ना वाद, हा; एखादा विषय पटला नाही तर चर्चा होतेच की आपल्यात पण तू तुझा मुद्दा सोडत नाहीस आणि मी माझा, पण ते तेवढ्या पुरतंच असतं; आणि दोघांनाही त्याची पूर्ण जाणीव असते. एक वेगळीच समज आहे या नात्याला. मग अशा या नात्याला नाव पण तसंच हवं न.
विचार करताना मनात आलं एक नाव सांजसखी! रुढार्थाने कोणत्याही नात्याच्या अटींमध्ये न बसणारं आणि एकमेव असं हे नातं आहे. आता जर हे नाव मी देत आहे तर त्याचं कारण देखील तुला सांगितलं पाहिजे न.... हेच नाव का ते सांगू?
एकतर; सांज म्हंटलं की एक शांत संध्याकाळ..! मावळतीचा सूर्य किंवा एखादी पौर्णिमेची रात्र आठवते. समोर अथांग समुद्र..!! जो आपल्याला दोघीना आवडतो आणि माझ्या शेजारी संपूर्ण पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये केस मोकळे सोडून बसलेली तूच आठवतेस. अजून एक कारण हेच नाव देण्याचं. सांजेचा लाल पिवळसर रंग; तू असलीस की सगळं कसं गुलाबी होतं अन् हा गुलाबी रंग पण त्या लाल रंगात मुरला आहे. एक अजून, सांज बरीच रेंगाळते तुझ्या आठवणी सारखी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोज येते उलट ती जितकी वेळ वाढवत जाते आणि तिचा रंग तितकाच गहिरा होत जातो.
आज या नात्याला नाव देताना मनातून समाधान वाटतं आहे. खूप काहीतरी शांत झालं आहे मनात. माझं माझ्या आयुष्यावर आई-बाबांवर आणि नवऱ्यावर जितकं प्रेम आहे न तितकंच ते तुझ्यावर देखील आहे.. हे ' सांजसखी' चं नातं खूप खूप खास आहे माझ्यासाठी..! अहं..!! आपल्यासाठी!!!"

