रक्षक
रक्षक
जग जरा विचित्र संकटामध्ये सापडलेले होतं. कुठल्यातरी अदृश्य शत्रू बरोबर लढण्यासाठी घराघरातून तरुण मुलांना खेचून बाहेर नेण्यात येत होतं.
जणू काही एखादा बकासुर रोज गाडाभर अन्न आणि एक प्राणी मागत होता. तरुण मुले एकदा का घराबाहेर गेली की परत येतीलच याची शक्यता नव्हती.
माया आणि रोशन आपल्या आईबरोबर राहत होते. हिमालयाच्या एका बाजूला असलेल्या जंगलामध्ये त्यांचं लाकडी घर होतं. माया आणि रोशन ची आई सुरभी आपल्या घराभोवती भाजीपाला उगवत असे तसेच जंगल तोडण्यासाठी ती वनामध्ये जात असे. सहा महिन्यातून एकदा खाली उतरून शहराकडे जाऊन ती घराला लागणाऱ्या बाकीच्या वस्तू घेऊन येत असे. जंगला मधले मध आणि इतर काही औषधी वनस्पती विकून त्यांचा गुजरा चालत असे. त्या तिघांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती, त्यांच्या गरजा अगदी माफक होत्या आणि जंगला बरोबर त्यांचं नातं होतं.
अचानक एक दिवस सुरभीचे दूरचे काका सुरभी चे घर शोधत शोधत त्या वाटेने आले. सुरभीचे काका संन्यासी, त्यांना शांतते मध्ये राहून कसलासा जप करायचा होता आणि मंत्र सिद्धी करायची होती. काका आल्यावर सुरभी ने त्यांचे आनंदाने स्वागत केले, काही दुरवर असलेल्या मोठ्या कदंब वृक्षाच्या फांद्यांवरती रोशन ने स्वतःसाठी एक छोटसं घर बांधलं होतं तिथे काकांची सोय करण्यात आली. शांतपणे बसून त्यांना त्यांचा जप करता येणार होता. खरं म्हणजे काका आयआयटीच्या संस्थेमधून अतिशय उत्तम गुणांनी भौतिकशास्त्राचे पदवीधर होते, नंतर त्यांना विरक्ती आली आणि संशोधन आणि परमात्मा यांची सांगड घालण्यासाठी म्हणून ते संन्यासी झाले होते. सुरभीला काकांच्या बद्दल अतिशय आदर होता, कारण वडिलांनंतर काकांनी सुरभी आणि तिच्या भावंडांचे पालनपोषण केले होते.
त्या विचित्र संकटाने सुरभी चा नवरा घरातून बेपत्ता झाला होता तो गेली चार वर्ष कुठे होता हे सुरभीला आणि मुलांना माहीत नव्हतं. कदंब, देवदार केदार चिनार असल्या वृक्षांची दाटी असलेल्या भागांमध्ये काकांचं वास्तव्य व्यवस्थित चालू होतं. चुकून एखादा माकड किंवा माकडाचे पिल्लू काकांच्या खोली डोकावे, परंतु तिथे खायला काहीच नसल्यामुळे जास्त वेळ न घालवता तिथून पसार होईल. काका फक्त एकदा जेवत, फळे दूध मध किंवा जे काही सुरभी बनवेल ते, कसलाच आग्रह नसे, हिमालयातल्या निर्मळ झऱ्यांचे पाणी पिऊन देखील राहण्याची त्यांची तयारी होती, भौतिकशास्त्राबरोबर वनस्पतीशास्त्र यांचाही गाढा अभ्यास असलेले काका आपल्या पोतडीत कुठल्या कुठल्या वनस्पतीच्या मुळे बाळगून असतात ज्यामुळे त्यांच्या शरीरात कायमच गरमी राहत असे आणि त्यांना भुकेचा त्रास होत नसे.
नऊ दहा वर्षांची माया अतिशय तत्परतेने काकांची सेवा करत असे. आपल्या आईबरोबर जंगलामध्ये जात असल्याकारणाने मायाला देखील जंगलातल्या वनस्पतींचे चांगली माहिती झालेली होती. जगावर आलेल्या संकटांपासून सुरभी नाही मुलांना दूरच ठेवले होते पण तिला माहित होते का एक ना एक दिवस ते लोक येतील आणि रोशनला तिच्यापासून दूर घेऊन जातील.
दूर घनदाट जंगलामध्ये चिनार वृक्षाच्या मोठ्यामोठ्या खोडामध्ये लपण्यासाठी भरपूर जागा होत्या, रोशनने त्या पाहून ठेवले होते, जर तसंच काही संकट आलं तर तो मायIला आणि आपल्या आईला घेऊन जंगलामध्ये निघून जाणार होता. काकांना येऊन आता सहा महिने झाले होते, कधीकधी रात्री त्यांच्या झाडावरच्या घराकडून दिव्य असा प्रकाश पसरे, खरंतर झाडावरच्या घरामध्ये मेणबत्ती पण मिळण्याची सोय नव्हती तरीपण त्यांच्या तपामुळे आणि जपामुळे त्यांच्या भोवताली एक दिव्य मंद असा प्रकाश पसरलेला मायाला कायमच दिसे.
आता काकांना येऊन आठ महिने झाले. सुरभी ला सांगितले की ते सगळ्यां सकट वनाच्या आतल्या भागात जाणार आहेत. पहाटेच उठून सुरभी नि वनातल्या मुक्कामासाठी खाण्यापिण्याची तरतूद केली, सूर्य उगवायच्या आत चौघेजण वनाच्या दिशेने निघाले.
रोशनने पाहून ठेवलेल्या चिनार वृक्षांच्या दाट छायेखाली सर्व जण येऊन पोचले. काकांनी रोशनला आणि मायाला स्वतःजवळ बसवले, डोळे मिटायला सांगून समोर हात पसरायला सांगितले, काकांनी सिद्ध केलेले मंत्र ते घडाघड म्हणू लागले. मायाच्या डोक्यापासून पाठीच्या कण्यात मधून एखादी सुंदर लहर जावी आणि काहीतरी दिव्य अनुभव यावा असे तिला वाटू लागले. प्रयत्न करूनही तिचे डोळे उघडत नव्हते. रोशनला पण बहुतेक तसाच अनुभव येत असावा पण रोशन मोठा होता आणि समजदार होता त्यामुळे त्याने स्वतःचे डोळे घट्ट बंद करून घेतले होते. कानावर पडलेल्या मंत्राने शरीरातून विद्युत लहरी उत्पन्न होत होत्या, काहीतरी अघटित अचंबित अद्भुत असा प्रयोग चिनार वृक्षाच्या सावलीमध्ये चालला होता.
सुरभी पण ध्यानस्थ बसली होती, काळा वेळाचे भान तिला राहिले नव्हते. मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी बेपत्ता झालेला नवरा आणि जवळ असलेल्या मुलांची चिंता एवढेच दोन विचार चालू होते.
किती वेळ लोटला कोणालाच कळले नाही, सूर्य पश्चिमेकडे डुंबण्यासाठी आला होता, तरीपण काकांचे मंत्रोच्चार चालू होते. तो पूर्ण दिवस आणि ती पूर्ण रात्र त्याच दिव्य अनुभवातून गेल्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा काकांनी मंत्रोच्चारण थांबवले. काकांनी तिघांनाही अतिशय सावकाश पणे डोळे उघडण्यास सांगितले.
कालचा पूर्ण दिवस उपाशी असूनही तिघांना त्याची जाणीव नव्हती, ते कुठे आहेत, काय आहेत ,याची देखील त्यांना जाणीव नव्हती. डोळे उघडल्यानंतर सगळ्यात प्रथम त्यांना काकांच्या आकृती ऐवजी एक दिव्य ज्योत दिसली. ज्योतीला नमस्कार करण्यासाठी म्हणून त्या तिघांनी हात जोडले तेव्हा हाताच्या पंजावरती त्यांना कुठली तरी वस्तू असल्याची जाणीव झाली. डोळे उघडून बघितल्यावर ती त्या तिघांच्या हातावरती एक दिव्य अंगठी होती.
अंगठी मध्ये एक पिवळसर सोनेरी रंगाचा खडा मायासाठी होता तर रोशनच्या हातामध्ये तांबुस रंगाचा खडा असलेली अंगठी होती, सुरभीच्या हातात निळसर झाक असलेला खडा असलेली अंगठी आलेली होती. काकांनी अंगठीचे प्रयोजन समजावून सांगितले. कोणीही अस्त्र-शस्त्र घेऊन त्यांनी चालून आला आणि मायाने अंगठीचा खडा त्याच्या बाजूनी करून फक्त "रक्षति रक्षति" असे म्हटले तर त्या व्यक्तीचा हात निर्जीव होऊन त्याच्या हातातले अस्त्र किंवा शस्त्र निर्बल होऊन जाणार होते. रोशनच्या अंगठीने त्याला आर्थिक बळ आणि नवीन जादुई शक्ती मिळणार होत्या.
मुलांचा आणि नवऱ्याचा ठावठिकाणा सुरभी च्या हातातल्या निळ्या खड्ड्यांमध्ये दिसणार होता त्यामुळे ती आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकणार होती. रोशनने हातातल्या अंगठीचा स्पर्श जेव्हा चिनार वृक्षाला केला तेव्हा त्याच्या अंगामध्ये चिनारासारखा प्रचंड ऊर्जा असल्याचा त्याला अनुभव झाला. सुरभीला आणि मुलांना आशीर्वाद देऊन सुरभी चे काका जंगलाच्या दिशेने नाहीसे झाले. सुरभी आणि मुले अतिशय आनंदाने घरी परतली.
त्यांच्या लाकडाच्या घराच्या भोवताली काळे कपडे घातलेले बरेच लोक जमा झालेले होते. काकांच्या येण्याचा सुगावा त्यांना पण लागला होता, आणि त्यांना रोशनला न्यायचे होते. सुरभी नि मुलांना प्रेमाने जवळ घेतले आणि रोशन ला जेऊ खाऊ घालून बरोबर पाठवले, का कोणास ठाऊक पण तिला असे वाटत होते की जरी या दिव्यशक्ती दिल्या आहेत तरी त्यांचा ह्या काळया शक्ती पुढे निभाव लागणार नाही.
आता घरामध्ये फक्त सुरभी आणि माया, माया मानायलाच तयार नव्हती की तिच्या भावाला त्यांच्यापासून कोणी दूर नेईल. ज्याप्रमाणे तिचे वडील नाहीसे झाले होते त्याचप्रमाणे आता रोशन पण निघून जाणार होता ही कल्पना आणि हे दुःख तिला सहन होत नव्हतं. रोशनला घेऊन काळे कपडे घातलेले लोक निघून गेले आणि दुःखात असलेल्या आईला सोडून माया बाहेर धावली. लोकरीचे जॅकेट अंगात चढवून तिने आपल्या आवडत्या घोड्याचा लगाम हातात धरून त्याच्यावरती उडी मारली, तिने त्या लोकांच्या पाठीमागे धाव घेतली.
काळे कपडे घातलेल्या लोकांना जमिनीच्या हादरणे वरून कल्पना आली की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहे. मागून येणाऱ्या लहान मुलीला बघून ते सगळे जण कुत्सितपणे हसले, ही काय आपल्याला थांबवणार? असे त्यांना वाटले. घोड्यावर बसलेल्या मायाला पाहून रोशनला पण बळ आले, काळे कपडे घातलेल्या मोरक्याने आपला हात हवेत फिरवून एक जादुई गोळा मायाच्या दिशेने फेकला, मायाने तो चुकवला. आता सगळेच लोक माया च्या दिशेने जादुई गोळे फेकू लागले, मायाने घोडा वळवला, अंगठी घातलेला हात सांभाळून बाजूला केला,
मनातल्या मनात काकांच्या दिव्य ज्योती स्मरण करून हवेमध्ये गोलाकार हात फिरवत "रक्षति रक्षति" म्हणत तिने अंगठीचा हात त्या लोकांसमोर धरला. त्याबरोबर चमत्कार झाला, ते सर्व लोक निर्जीव होऊन खाली पडले. रोशनने त्यांच्या जवळील हत्याराने त्या सगळ्यांना ठार मारले आणि भसाभस बर्फ उकरून त्या लोकांना गाडून टाकले. रोशनने मायIला मिठी मारली, प्रेमभराने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले, मायIला मिठी मारली, दोघे ही बहिण भाऊ घोड्यावर बसून आपल्या घरी परत जाण्यासाठी वळले.
सुरभीने आपल्या अंगठीमध्ये बघून मुलांची लढाई अनुभवली होती. घराच्या दरवाजाशी उभे राहून ती आता त्या दोघांची वाट बघत होती. गुरुत्वाकर्षण एकत्रित करून काही होऊ शकतो का याचा प्रयोग काका करत होते, गुरुत्वाकर्षण एका बिंदूमध्ये साचवून त्याचे रूपांतर त्यांनी एका रत्नामध्ये केले होते, केवळ शब्द उच्चार आणि गुरुत्वाकर्षणाचा वेग आणि दिशा ठरवता येईल अशी साधना त्यांनी केली होती. माया अतिशय निस्पृह आणि सोज्वळ मुलगी असल्यामुळे काकांनी तिच्या हातामध्ये ती अमोघ शक्ती सोपवली होती. सुरभी नंतर मायाच आपल्या कुटुंबाचे योग्यरीत्या संरक्षण करेल ही त्यांची खात्री होती. रोशनला केवळ बळ देऊनच ते थांबले नव्हते तर त्यांनी आपल्या भौतिक शास्त्रांच्या नियमानुसार त्याच्या अंगामध्ये होणाऱ्या शक्तीचे एका अतिशय अमोघ अशा शास्त्रांमध्ये रूपांतर केलेले होते. सुरभीच्या नवऱ्याचे नाहीसे होणे, काळ्या शक्तींचा उदय हे पृथ्वीतलावरील लोकांना घातकच ठरत होते आणि त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान याचा उपयोग करून काकांनी शस्त्र निर्मिती केली होती.