राजाचे मनपरिवर्तन
राजाचे मनपरिवर्तन
चंपावती नावाच्या नगरीमध्ये एक यवन राजा राज्य करीत होता. राजा अत्यंत निष्ठुर आणि क्रूरकर्मा होता .त्याच्या अवतीभवती लांगूलचालन करणारे अनेक मंडळी असायची. प्रजेच्या प्रति त्याचा फक्त पैसा वसुली करणे एवढाच राजधर्म असायचा. आणि लोकांना छळणे, त्यातूनच स्वतःचा धर्म सोडून इतरांच्या धर्माची हेटाळणी करणे. हिंदुंना काफरांना म्हणून डिवचणे. त्यांच्यासाठी कडक कायदेकानून होते. साधुसंतांचा अपमान करणे, या गोष्टी चालू असायच्या. लोक अतिशय घाबरून असायचे. आपल्या आपल्या दैवतांचे पूजन चोरून चोरून घरांमध्ये करायचे. बाहेर मंदिरे वगैरे त्याने बंद करून ठेवली होती. पण एकदा एका साधूने एक शंकर मंदिर उघडून त्याचे पूजन केले. ते राजाच्या सैनिकांनी पाहिले आणि त्या साधुला फरफटत दरबारात आणले.
साधू ने विचारले माझा अपराध काय?
त्यावर सैनिकांनी सांगितले तू दुसऱ्या धर्माचा आहेस. या राज्यांमध्ये आमचा देव सोडून, इतर धर्माची पूजा करणे मान्य नाही. त्यामुळे तू गुन्हा केला आहे.
राजाने त्याला दरडावून विचारले.
तू या राज्यात खातोस, राहतोस, अन्न आमचे खातोस ,परंतु आमच्याशी बेईमानी करतोस?
महाराज मी कोणतीही बेईमानी केली नाही. तुम्ही तुमच्या देवाची पूजा करता तसे मी माझ्या देवाची पूजा करत होतो.
परंतु तुझ्या देवाची पूजा करण्यास मी बंदी घातलेली आहे. मी सर्व मंदिरे बंद करून ठेवलेली आहेत. अशावेळी तू हिम्मत कशी काय केलीस?
त्यावर ती साधू म्हणाला, परमेश्वर सगळीकडे अखंड भरलेला आहे. ज्याला तुम्ही अल्ला म्हणतात ,यालाच मी भगवान म्हणतो. त्यालाच काही लोक ईश्वर मानतात, काही येशू मानतात. शेवटी सर्व देवतांचा उगम एक शक्ती तत्व आहे. परंतु बघणार ऱ्याचा नजरिया वेगवेगळा आहे.
जसे की पाच आंधळ्यांनी एक हत्ती हाताने चापचून बघितला, ज्याच्या हाताला कान लागला, तो म्हणाला हत्ती सुपा सारखा आहे. ज्याच्या हाताला सोंड लागली, तो म्हणला हत्ती मुसळा सारखा आहे. ज्याच्या हाताला पाय लागला ,तो म्हणाला हत्ती खांबा करत आहे. ज्याच्या हाताला पाठ लागली, तो म्हणाला हत्ती भिंतीसारखा आहे .ज्याच्या हाताला शेपूट आले तो म्हणाला हत्ती दोरी सारखा आहे .असे प्रत्येकाने वेगळेवेगळे वर्णन केले, पण या सर्व वर्णनाचा मिळून एक हत्ती तयार होतो. तशा त्या अनंत ब्रम्हांडे भरून राहिलेल्या परमेश्वराचे आपण वर्णन करू शकत नाही.
तो जसा निर्गुण-निराकार आहे, तसा तो सगुण-साकार पण आहे. महाराज अजून तरी डोळे उघडा .
राजा पुन्हा तेच म्हणाला राहतोस आमच्या राज्यात, खातोस आमचेच ,आणि आमच्याशी गद्दारी ?
त्यावर साधू म्हणाला, आम्ही काय कुणाचे खातो?
तो राम आम्हाला देतो!
त्यावर राजाने सांगितले याला वर्षभर एका खोलीमध्ये, कोठडीमध्ये बंद करून ठेवा. याला अन्न-पाणी काही द्यायचे नाही. याचा राम याला अन्नपाणी पुरवणार आहे. बघूया साधुमहाराज कसे जिवंत राहतात .
त्यावर साधूने देखील सांगितले राजा एका वर्षानंतर आपण भेटू आणि बघ माझा राम मला अन्नपाणी पुरवतो की नाही. राजा च्या आदेशानुसार सैनिकांनी साधूला अंधार कोठडीत बंद केले आणि कोणीही तिकडे फिरकत नव्हते. अन्न पाण्याविना उपाशीतापाशी टाचा असून घासून साधू एक दिवस मरणार हे सर्वांनाच विदीत होते.
परंतु तो पण असा तसा साधू नव्हता ,तो सिद्धी प्राप्त केलेला साधू होता. स्वतःच्या शरीरासाठी अन्न पाण्याची निर्मिती करणे हे त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु साधुने तसे केले नाही. साधूने समाधी लावली. शरीराची षट्चक्रे कार्यान्वित केली. समाधी लावली आणि पार्थिव शरीर खाली ठेवून स्वतःच्या मनाने त्याने आपला आत्मा मुक्त करून घेतला. साधूने आपला देह सुरक्षित राहावा म्हणून त्याच्या बाजूला राखणदार म्हणून दोन काळसर्प ठेवले. आणि साधू शरीरातून आत्मा काढून घेऊन अनंत ब्रह्मांड यांची सफर करायला निघाला .
या अवकाशाच्या पोकळीमध्ये अनंत ब्रम्हांडे आहेत. अनंत आकाश गंगा, त्या प्रत्येक आकाशगंगेमध्ये आपले आपले स्वतःचे सूर्य आहेत, ग्रहमाला आहेत, अनेक पृथ्वी आहेत, सप्त स्वर्ग आहेत, सप्तपाताळ आहेत, त्यामुळे साधूचे भ्रमण सर्व ब्रह्मांडा मधून चालू राहिले. त्याने अनेक ब्रम्हांडे धुंडाळली आणि मधून मधून राजाच्या दरबारात देखील अदृश्य रुपाने उपस्थित असे. तेथे चालणारा कारभार, कोणावर जर अन्याय होत असेल तर साधू गुप्त रूपाने जाऊन त्या व्यक्तीला मदत करत असे. इकडे मात्र राजाचे दिवस पालटले. राजाला दरबारामध्ये अनेक गुप्त शत्रू निर्माण झाले. जीवाची भीती निर्माण झाली .राजाच्या अन्यायी वागणुकी विरुद्ध खूप कटकारस्थाने होऊ लागली. राजाला सतत अपशकुन होऊ लागले. सिंहासनावर बसण्याची सुद्धा भीती वाटू लागली. आपल्या स्वतःच्या सुरक्षारक्षकां बाबत त्याच्या मनात शंका निर्माण झाल्या. आणि राजाला वेड लागण्याची पाळी आली.
तो विचित्र वागू लागला, विक्षिप्त वागू लागला, आणि सर्वजण असे म्हणू लागले हा सगळा त्या साधूचा शाप आहे. राजाने विनाकारण त्या साधूचा छळ केल्यामुळे त्याच्यावरती ही वेळ आलेली आहे. असे करता करता एक वर्ष निघून गेले, आणि साधूला बघण्यासाठी राजाने सैनिक पाठवले. सर्वांना असेच वाटले होते तो साधू मेला असणार, आणि त्याच्या हाडांचा सापळा आता आपणाला बघायला मिळणार .परंतु कोठडीचे दार उघडले तर काय आश्चर्य! जणू काही एखाद्या निद्रेतून उठल्या प्रमाणे साधु निश्चल पणे मांडी घालून बसलेला होता. आत मध्ये मशाल पेटवली असता साधूच्या अंगाभोवती दोन काळसर्प विळखा घालून बसलेले होते. परंतु मशाल पेटल्यानंतर शांतपणे बाजूला झाले आणि साधूने जणू काही झोपेतून उठावे अशा पद्धतीने आपले डोळे उघडले. त्याचा चेहरा अजून तेजस्वी दिसत होता. ते पाहून सर्वांना भोवळ यायचीच बाकी होती. आता साधू आपल्याला काहीतरी शाप देणार असे वाटून सैनिक मंडळी उलट्या पावली पळत सुटली. आणि दरबारात येऊन त्यांनी राजाला सदर गोष्ट सांगितली. त्यांचे बोलणे पुरे होत नाही तोपर्यंत तेथे साधू अवतीर्ण झाला. त्याला प्रत्यक्ष डोळ्यासमोर जिवंत पाहून राजाची पण बोबडी वळाली. आता हा काही आपल्याला जिवंत सोडणार नाही.
त्याच्याकडे काहीतरी सिद्धी आहे. हा विचार करून, राजाने साधूच्या पायावरती लोटांगण घातले. आणि साधू महाराज मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखले नाही .आपण खरोखर परमेश्वर आहात! मी हे मान्य करतो .पण आपण मला मारू नका. असे गयावया करू लागला.
अरे राजा तुला मागणारा मी कोण? तो सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान, परमेश्वर वरती बसलेला आहे. तो न्यायनिवाडा करेल. परंतु सध्या तरी मी तुला एका अटीवर माफ करेन, ते म्हणजे तुझ्या सर्व प्रजे बद्दल तुला समान भाव पाहिजे. तू राजा म्हणजे सर्वांचा पिता आहेस. तू सर्वांना सारख्या न्यायाने वागवले पाहिजेस आणि इथून पुढे प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माने वागण्याचे स्वातंत्र्य तू दिले पाहिजे .हे तुला मान्य असेल तरच मी तुला सोडून देईन, त्यानंतर मात्र राजाने आपल्या वागण्या मध्ये बदल केला ,आणि तो क्रूरकर्मा राजा आपल्या प्रजे बद्दल काळजीने आणि पितृत्व ने वागू लागला. त्याच्या स्वभावामध्ये किमान साधूच्या शापाला घाबरून तरी बदल झाला, किंवा त्याने स्वतः मध्ये बदल केला.