पूर्ती... बालहट्ट
पूर्ती... बालहट्ट
"अजिबात ऐकत नाही ही मुलगी....!!!" काय करू मी? कुठे चुकले माझे...?? रिना एकटीच स्वतःशी बोलत होती... असा विचार करता करता नकळत ती भुतकाळात गेली... एक एक गोष्टी तिला स्पष्ट आठवत होत्या.... तीच्या आईच्या, बाबांच्या... पण आता काही उपयोग नाही का? असे वाटून तिला पश्चाताप होत होता... रात्रीचे दोन वाजले होते.. विचाराने झोप येत नव्हती... हे वयच असे असते का?? पण तिच्या बरोबरच्या बाकीच्या मुले-मुली असे वागतात का?
वयाच्या १२ व्या वर्षी ही मुलगी जर अशी वागते तर पुढे काय होईल? तिला झोप काही येत नव्हती... बाहेर सगळीकडे शांतता... त्यात राहुल काही दिवसांसाठी आऊट ऑफ इंडिया गेला होता..त्यामुळे ती एकटी पडली आहे असे तिला वाट्त होते....
राही लहान असल्यापासुनचे सर्व क्षण तिला आठवत होते... त्या दोघांना मुलगीच हवी होती.. आणि काही झाले तरी एकच चान्स घ्यायचा असे त्यांनी ठरवलं होते.. राहीचा जन्म झाला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेले.. त्यांचे अख्खं जग म्हणजे राही... तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते... तिच्यासाठी खूप सारी खेळणी, कपडे आवडेल ते दोघेही आणायचे.. लहान असताना तिला काही कळत नव्हते.. पण हळू हळू जेव्हा तिला सर्व कळू लागले.. तसे तिचे हट्ट वाढतच गेले... प्रत्येक गोष्ट हवे म्हणून हट्ट करू लागली... रिना आणि राहुल यांचा तर जीव होती ती... त्यामुळे तिला नाही म्हणणे त्यांना जमतच नसे... अर्थात कोणत्याही गोष्टीचे फायदे असतात तसेच तोटे देखील असतातच..
एकदा राहीने मोबाईल दिला नाही म्हणून रिनाच्या बाबांचा मोबाईल खिडकीतून खाली टाकून दिला तर तिच्या आवडीचे कार्टून लावले नाही म्हणून रीमोट फेकून आजीला मारला... आता मात्र रिनाशी बोलायला हवे... असे म्हणून त्यांनी रिनाला सांगितलं,आग जरा आवर घाल तिच्या हट्टाला... मोठी झाल्यावर तुलाच त्रास होईल... पण रिनाचे एकच म्हणणे, लहान आहे ती अजून,आपली परिस्थिती नव्हती म्हणून मी मन मारुन जगले...तेच माझ्या मुलीने करावे असे वाट्त नाही मला... तिचे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आईला खूप राग आला आणि आईने तिला बोल सुनावले, "पालकांचे मुलांवर प्रेम असते म्हणून मुलांचे लाड केले जातात, हा समज खरा नाही. प्रेम व्यक्त करण्याचा लाड करणे हा एकमेव मार्ग नसतो..." "पालकत्व एवढ सोपं असते तर श्रीमंत पालक हे सर्वात बेस्ट ठरले असते....पण पालकांना मुलांबद्दल ओढ असते, ती असायला तर हवीच आणि व्यक्त ही व्हायला हवी...." खरंतर मुलांचे लाड करावे की करू नये? हा प्रश्न ऐकला की हसायला येते...निरर्थक वाटतो... मोठी माणसे म्हणजे आजी आजोबा म्हणतात लाड मुलांचे करायचे नाहीत तर मग् कोणाचे करायचे? पण आपल्या इथे आम्ही तूला सांगतोय की हे अतीलाड थांबव... त्यामागे आमचा काय स्वार्थ ग..! पण तुला आवडत नाही तर मी या मध्ये परत कधीच पडणार नाही आणि तुझ्या घरी सुद्धा मी कधीच येणार नाही असे म्हणून आई रागाने निघून गेली... रिना, राही दोघी जायच्या.. आजी ओरडते, असे करू नको तसे करू नको म्हणून हळू हळू राहीने आजीच्या घरी जाणे बंद केले...
एकदा रस्त्यात राहीने रडून गोंधळ घातला... त्या दुकानात लावलेला ड्रेस मला हवायं आताच्या आता... तेव्हा रिनाने तो ड्रेस तिला घेऊन दिला.. वर परत आमच्या राहिला प्रत्येक कार्यक्रम असला की नवीन ड्रेस लागतो, जुना घालत नाही... असे कौतुकाने सांगितलं सर्वांना.. रिनाच्या आईला या गोष्टी काही पटत नव्हत्या आणि रिनाला तीच्या आईच्या... राही जशी मोठी होत होती तशी अजून हट्टी होत होती..
आता हळूहळू रिनाला आईचे बोलणे आठवत होते... आपण एक पालक म्हणून कमी पडलोय असे जाणवत होते.. त्यामुळे तिची चिडचिड वाढली होती.. राही मात्र आपला प्रत्येक हट्ट रिनाकडून पूर्ण करून घेत होती.. एखादी वस्तू नाही मिळाली तर ती कशी मिळवायची हे तिला चांगलेच माहित झाले होते.... त्यात हे लॉकडाउन आल्यामुळे राहुल तिकडे अड़कुन पडला होता... त्याच्या जॉबचं देखील काही खरे नव्हते.. असे सर्व टेन्शन.. त्यात रिनाचे वर्क फ्रॉम होम... त्यामुळे तिच्या मीटिंगच्या वेळेस तमाशा केला की हवे ते मिळते हे राहिला चांगले समजले होते... तिला न्यू इयर गिफ्ट म्हणून लॅपटॉप हवा होता... खर तर तिचा अभ्यास व्हावा म्हणून रिनाने स्वतःचा लॅपटॉप तिला दिला होता आणि ऑफिस टाईमिंगसुद्धा त्या प्रमाणे अड्जस्ट करून घेतले होते त्यामुळे नवीन लॅपटॉपची गरजच नव्हती..
पण राहीने खूप तमाशा केला तिचा लॅपटॉप बिघडून ठेवला... तिची महत्वाची मीटिंग, त्यात राहीचा गोंधळ.. तिने राहिला चांगले फटके दिले...आणि एका खोलीत कोंडून ठेवले... तिची मीटिंग झाली तिने लॅपटॉप प्रॉब्लेम सांगितला आणि क्लायंट कडून चार दिवसाची मुदत मागून घेतली... इकडे नकार ऐकायची सवय नाही त्यामुळे राहीने सुरीने हात कापुन घेतला होता.. सुदैवाने तिला काही झाले नाही पण रीनाची मात्र झोप याच गोष्टीने उडाली होती.. तेवढ्यात तिला आईने आज पाठवलेल्या पत्राची आठवण झाली... आणि ती भानावर आली... तेवढ्यात ५ वाजले होते...
हळूच राहीच्या खोलीत डोकावून तर ती झोपली होती... रिनाने चहा केला आणि आईचे पत्र उघडले... तुझी मुलगी आहे त्यामुळे आता मी परत या मध्ये कधीच लक्ष घालणार नाही....असे मी तेव्हा तुला रागाने बोलले होते.. पण माझी मुलगी आई म्हणून कमी पडू नये असे मला वाट्त म्हणून काही गोष्टी या पत्रात लिहुन दिल्या आहेत त्या वाचून बदल करता आला तर बघ... एक पालक म्हणून आम्हाला आलेला अनुभव त्यातून आम्ही घडत गेलो एक पालक म्हणून.. तू सुद्धा आता घडत आहेस एक पालक म्हणून..!लाड, कौतुक जरुर करावे पण त्याचे रूपांतर हे अती लाडात व्हायला नको इतकेच.... कारण समज येईपर्यंत ती हट्ट करणारच ग... मुळात "बालहट्ट हा असा हट्ट आहे की ज्याची पूर्ती कधीच होत नाही... योग्य समज येईपर्यंत दुसऱ्याकडे असणारी प्रत्येक गोष्ट त्या मुलाला हवी असते... आणि त्याचे मन न दुखावता हसत खेळत त्या हट्टाला आवर घालणे म्हणजे 'सुजाण पालक' होय..."
१. मुलांना रोज आवडत असलेले खाणं दिले पाहिजे मान्य पण तें पौष्टीक पण असले पाहिजे...हे पालक विसरून जातात...२.एखादे मूल उर्मट बोलले तरी हसुन दुर्लक्ष करतात पालक....३. काही पालक तर स्वतः च्या मुलांची चूक असली तरी, आपले तें बाब्या आणि दुसऱ्याचे कार्ट करून मोकळे होतात..४.बाहेर गावी जाताना बॅग अगदी जास्तीत जास्त गच्च भरत असतात काही पालक...का तर आपण कुठे कमी दिसू नये....मुले नाराज झाली, त्यांचे मन दुखावले तर आपल्या पासून दुरावतील म्हणून काही पालक घाबरून ओरडत नाही...आणि मग् मुले मोठी झाली की त्याचा गैरफायदा घेतात....खरच तू मला सांग सर्व वस्तू दिल्या, सुख सोयी दिल्या म्हणजे उत्तम पालक का????तसेच मुलांना आई बाबा आवडतात पण येतां जाता प्रत्येक गोष्टीचे लाड खरच पूरवायला हवे का??? खरच सारखे कोडकौतुक करायची गरज आहे का???वर दिलेली यादी हवी तेवढी वाढवता येईल...पण हे सर्व अती लाडात येते....म्हणूनच लहान असल्यापासूनच मुलांना शिस्त किंवा ते वळण प्रत्येक पालकांनी लावायला पाहिजे...आणि त्यासाठी त्यांच्या मध्ये दुमत असू नये...किंवा घरात जेवढ्या व्यक्ती असतिल त्या सर्वांच्या वागण्यात तें असायला हवे....एकमेकांवर जबाबदारी ढकलली तर, मुलांचे नुकसान होते...एकट्या आई किंवा बाबां वर टाकून उपयोग नसतो.... म्हणून आम्ही तुला वेळोवेळी सावध करत आलो... अजूनही वेळ गेली नाही बाळा...
"आपल्या मुलांचे भविष्य उज्वल होण्यासाठी प्रत्येक आई-वडीलांना साम,दाम,दंड यांचा योग्य तो मेळ घालावाच लागतो..."
मुले जशी मोठी होतात तसे पालकांना केवड्यासारखे व्हावे लागतें.. केवडा जसा असतो सुगंधी, टोकदार आणि तीक्ष्ण... तसेच पालक म्हणून कौतुकाचे सुगंधी शब्द, वेळ आलीच तर टोकदार भाषा अन मुलांच्या वागण्यावर तीक्ष्ण नजर यांचा समन्वय घालवाच लागतो...
रिनाला आईचे पत्र वाचून खूप बरे वाटले...मनात आलेले सर्व वाईट विचार बाजूला ठेवून ती पुन्हा एकदा सज्ज झाली.. हे पालकत्व परत एकदा नव्याने स्वीकारायला...
पालक म्हणून घडत असताना अनेक बदल होतात... हेच या कथेतून दाखवायच आहे...