मुलगी काळाची गरज/स्त्रीजन्माचे स्वागत.
मुलगी काळाची गरज/स्त्रीजन्माचे स्वागत.
नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुर पूजिते!
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!!
स्त्रीरूपी देवीची आपण पूजा करतो, जिला आपण साकड घालतो, सुखी ठेव, पैसा दे, मुलगा दे, आणि मुलगी नको???
एका स्त्रीशक्ती कडेच आपण मुलगी नको म्हणतो....का??? ही मानसिकता आहे कि दुसर काही, आजपर्यंत बऱ्याच लोकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांचं आयुष्य बदलवण्यात हातभार लावले आहेत पण, एक स्त्री म्हणून मी किंवा स्वतः तुम्ही किती हातभार लावलेत? किंवा एक पुरुष म्हणून तुम्ही एका स्त्रीला किती रूपांमध्ये पूजनीय ठरवता आणि मानता? एक मुलगा म्हणून? एक पती म्हणून? आणि एक पिता म्हणून? कि एक खूनी म्हणून???भारतीय संस्कृती पितृसत्ताक आहे, म्हणून, आजच्या काळात स्त्री अर्भक त्यांच्या नजरेतून काय आहे? हे तितकंच महत्वाच आहे. जरी स्त्री २२ व्या शतकाकडे धावत असली तरीही अजूनही तिला बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. मग त्यात ती स्वतःच्याच बाळाची खूनी देखील होऊ शकते...ज्या विरोध करतात त्या एकतर कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बळी ठरतात तर काही विद्रोही.
अजन्म्या कळीला आपण उमलूच देत नाही, का? रोज सकाळी जेव्हा मी वर्तमानपत्र हातात घेते, तेव्हा मनात एक भीती असते,आज कुठे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडेल? अश्या, एक नाही हजारो वेगवेगळे प्रकार आहेत...आजही जेव्हा बाई प्रसूत होते, तेव्हा आसपासला ज्या कोणी स्त्रिया असतात त्याच पहिला प्रश्न करतात, "काय आहे?" मुलगा म्हंटल रे म्हंटल कि सगळीकडे एकच जल्लोष सुरु होतो आणि मुलगी म्हंटल कि सगळ्यांची तोंडे काळी का होतात?ज्या देवीला आपण मनोभावे पूजत आहोत तिही एक स्त्रीच आहे, स्त्रीच स्त्रीत्वाचा अपमान करतेय....मग अश्या या स्त्रियांना देवी शिक्षा का देत नाही? हा प्रश्न मला लहानपणापासून पडत आला आहे, पण आता मला त्याच उत्तर सुद्धा गवसलं आहे. या पुरुषप्रधान समाजात स्त्रिच, स्त्रिची सर्वात मोठी शत्रू आहे.खूप जणांना वाटेल मी अतिशयोक्ती करतेय पण, असं नाहीय. याची बरीच उदाहरणे मला देता येतील, काही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रीतीने माझ्यासमोर आलीत तर काही माझ्याचं समोर घडली.
एक स्त्रिच एका अजन्म्या स्त्री अर्भकाची खुनी असते. कारणे काहीही असोत, परिस्थिती काहीही असो, जोपर्यंत एक आई परवानगी देत नाही तोपर्यंत कोणीही तिच्या पोटातल्या गोळ्यास मारू शकत नाही. ती हे का विसरते कि ती सुद्धा एक स्त्रिच आहे! मी खूप लहान होते, दुसरी-तिसरी मध्ये असेन, एका नातलगांच्या घरी आम्ही कार्यक्रमासाठी गेलो होतो, तिथे एक बाई दुसऱ्या बाईला सांगत होत्या," काढून टाकायला सांग तिला, पहिल्या दोन आहेत न मुली बसं झालं, आता मुलगाच पाहिजे." लहान असल्यामुळे मला त्या वाक्याचं इतक गांभीर्य कळल नाही. पण, आता अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किती निर्दयी आहेत या बायका.
आपण पुरुषांना बोल लावण्यापेक्षा हे पाहिलं पाहिजे कि, ते तर पुरुष आहेत, मंगळावर राहणारा ज्याचा भावनांशी काडीचाही संबंध नसूनही तो उलटा अश्या उलट्या काळजाच्या बायकांपेक्षा लाख गुणांनी बराच म्हणावं लागेलं. कारण या पुरुषानाही एक स्त्रिच संस्कार देते, समाजात मान देते. काहीना ती शिवाजी महाराज बनवते तर काहीना कसाब तर काहीना बलात्कारी, खुनी! अजिबात अतिशयोक्ती नाहीय यात. मी मुंबईला असताना माझ्या एका मैत्रिणी सोबत एक किस्सा घडला होता. ती जॉब वरून घरी जाण्यास निघाली होती. अंधेरी स्टेशन, बसकरता ती लाईन मध्ये उभी होती, तिच्या बाजूला वयस्कर माणूस उभा होता, त्याच्या सोबत त्याची बायको आणि माझ्या मैत्रिणीच्या वयाच्या त्याच्या मुलीसुद्धा उभ्या होत्या. पब्लिक प्लेस वर सिगारेट ओढन कायद्याने गुन्हा आहे, तो माणूस बिंदास पणे सिगारेट फुंकू लागला होता, तिला साहजिकच त्रास होऊ लागला म्हणून तिने त्यांना नम्रपणे विनंती केली. "अंकल! प्लीज आप सिगरेट बंद करेंगे, तकलीफ हो रही हैं।" यावर त्या माणसाने तिला अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं कि ते मी इथे नमूद करू शकत नाही, आपल्या बायकापोरांसमोर हा निर्लज माणूस एका मुलीचा गलिच्छ शब्दांमध्ये अनादर करत राहिला पण, त्याची बायको, मुली काहीही बोलल्या नाहीत, त्या चुपचाप तमाशा पाहत होत्या. माझ्या मैत्रिणीने त्या माणसाला तर सुनावालच, पण त्याच्या बायकोला आणि मुलींना सुद्धा ऐकवलं, "आपके सामने ये बेटी कि उमर कि लडकी के साथ ऐसी बात कर रहे हैं और आप बुत बनके खडी हैं। ती इतकी भडकली कि तिने पोलिस येऊपर्यंत त्या माणसाला सोडलच नाही. हेट्स ऑफ टू हर! काही लोक तिच्या बाजूने बोलत राहिले काही समजावत राहिले, ती मात्र ठाम राहिली.
हे थांबल पाहिजे, स्त्रिच स्त्रिची शत्रू हे समीकरण बदललं गेलं पाहिजे. मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो हे ब्रीदवाक्य कालबाह्य केलं गेलं पाहिजे. टीवीवर रोज स्त्रियांची कपटी कारस्थाने बघून रियल लाईफ मध्ये पण बायका तेच फॉलो करतात, अशी बुरसटलेली, समाजाला घातक नाटके बंद झाली पाहिजेत. समाजाची जननी ही एक स्त्रीच आहे, तिची विकृत मानसिकता कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी घातक आहे म्हणून ही मानसिकता बदलायलाच हवी. लहान मुलांमध्ये कुठे आला लिंगभेद? ते तर आपण मोठी माणसे त्यांच्यावर बिंबवतो. खरचं! तुमच्या कानी पडली असतील ना काही अशी वाक्ये…तू मुलगा आहेस, मुलींसारख काय रडतोयस? तू बॉय आहेसं, बॉईज स्ट्रोनग असतात, हिरो असतात, बॉईज गर्ल्स सोबत खेळत नाहीत, बाहुल्या मुलींसाठी असतात, दुध पिलं की शक्ती येते अन मग तू गर्ल्स ना वाचवू शकतो…काय यार तू जेवण बनवतोस? लाज वाटली पाहिजे तुला, मुलगी आहेस का तू? आईला काय मदत करतोस मुलगी आहेस का तू? अशी बरीचं वाक्ये सर्रास कानी पडतच आपण मोठे झालोय, झालोय ना?
लहानपणापासून दोन पारडी आपण बनवतो, हे मुलांनी करायचं आणि हे मुलीनी! मुलींना कणखर, सक्षम बनवायचं सोडून आपण त्यांच्यावर बिंबवतो की त्या किती नाजूक आहेत, त्यांनी कसं पवित्र राहिलं पाहिजे, मुलांनी छेड काढली की लक्ष द्यायचं नाही, स्त्रिया असतातच कमजोर, सहन करत रहायचं, त्यांनी कसं घर सांभाळल पाहिजे, नवऱ्याचा मार कसा खाल्ला पाहिजे, माहेरी परत यायचं नाही, सासरचं तिचं खंर घर, तिथूनच बाहेर पडायचं ते चार माणसांच्या खांद्यावर वगैरे वगैरे आणि वगैरे…पण या सगळ्यात एक स्त्री असून आपण हे कशे विसरतो, "जी स्त्री पुरुषाला जन्माला घालते ती कमकुवत होईलचं कशी?"
आज स्त्री प्रत्येक अनुषंगाने पुढे गेली आहे, पण, अजूनही पारडी समान व्हायचं नाव घेत नाहीत, याला कारणीभूत काही अंशी स्त्रिया सुद्धा आहेत, स्त्रिच स्त्रिची शत्रू बनून तिला जन्मायच्या आतच संपवून टाकते तर कधी हुंड्याच्या आगीत पेटवून देते, तर कधी ओझं समजून आपल्याचं मुलीला बाजारात विकायला मागे पुढे पाहत नाही…मग तर पुरुषांच्या मार्फत होणाऱ्या अपराधांच तर काय बोलणार, संपूर्ण देश होरपळून निघाला तरीही बलात्कारी उघड्या तोंडाने फिरतच आहेत. ना कोर्टात त्या अंधळ्या मूर्तीसमोर न्याय मिळतोय स्त्रियांना ना घरात मान…आज ही सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा घरगुती अत्याचारांच प्रमाण दिसून येत…रोज एक व्रण तोंडावर घेऊन ती कामावर जाते, रोज तिला मारलं जात आहे, पेटवल जात आहे,…हे कोणामुळे? या निगरगट्ट समाजामुळे!
प्रत्येक आई अन बाबाने जर ठरवलं, मी जन्माला घालणाऱ्या या परीला उडायला एक सुरक्षित आकाश द्यायचं आहे तर हे का नाही होऊ शकणार? मुलींना मुलांप्रमाणेच शिकवा लढायला, स्वसंरक्षणाचे धडे घरातूनच मिळायला सुरु व्हायला हवं, मग मजाल आहे कोणा षंढाची! सर्व आईबाबांना, अन भविष्यात आईबाबा होणाऱ्या सर्वांना आवर्जून एक विनंती करते की, " कळ्यांना उमलू द्या, ठरवा स्वतःच्या मनाशी माझ्या परीला स्वच्छंदी बागडायला मी एक निर्भय, सुरक्षित आकाश देणारच." समाजात स्त्री पुरुष जनगणनेत समानता आली तर कित्येक अविवाहित पुरुषांची दुखणी संपतील, दिसेल त्या स्त्रीला जनावरासारखा ओरबाडून काढणारा पुरुष संयमित होण्यास काही अंशी तरी लगाम लागेल. घरोघरी स्त्रीशक्तीची सळसळती ऊर्जा संपूर्ण घराचे सोने करेल हे मात्र नक्की! ज्या घरात स्त्रीत्वाचा अपमान होतो तिथे लक्ष्मी नांदेल तरी कशी, तिची अवकृपा होणारच, म्हणूनच म्हंटल जात, "जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर , जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर".