Jyoti gosavi

Inspirational

2  

Jyoti gosavi

Inspirational

मी मला घडवले

मी मला घडवले

5 mins
363


आमचे लहानपण गरीबीत गेले. फक्त देवाच्या कृपेने दोन टाइम आमटी आणि दामटी (भाकरी आणि डाळ) मिळत असे. त्यात कधी पोटाला फाके पडले नाहीत. सातारा जिल्ह्यातील एका अत्यंत मागास खेडेगावात आमचे लहानपण गेले. त्याकाळात नॉन मॅट्रिक ही पदवी लग्नाच्या बाजारात नंबर वन होती. मुलगी कशीबशी ढकलत दहावीपर्यंत गेली म्हणजे गंगेत घोडे न्हाले. पण आमच्या आईवडिलांनी मात्र आम्हाला लहानपणापासून शिक्षणाचे बाळकडू दिले होते आम्ही तिघी बहिणी, आम्हाला भाऊ नाही .आई सांगायची नोकरी हा तुमचा भाऊ. त्यामुळे गावात दहावीपर्यंत शाळा केली पुढचे दोन वर्ष अकरावी बारावी अपडाउन केले कित्येक वेळा बसस्टँडवर दोन-दोन तीन-तीन तास बसावे लागायचे. पावसाळ्यात वापरायला छत्री देखील नव्हती पाऊस थांबल्यानंतर बाहेर पडायचे पण शिक्षण मात्र पूर्ण केले आणि ईश्वर कृपेने नर्सिंग साठी आप्लिकेशन केले असता माझा नंबर आशिया खंडातल्या नंबर एक च्या हॉस्पिटलसाठी जेजे हॉस्पिटल साठी लागला. बाहेर पडल्यानंतर हळूहळू जगाचे व्यवहार समजू लागले पायाला चप्पल ट्रेनिंग ला आल्यावर पहिल्यांदा मिळाली.

बारावीपर्यंत रंगीत कपडे माहीत नव्हते. शाळेचा एक निळा पांढरा गणवेश दिवसभर घालायचा तो आज धुवायला टाकायचा तर उद्या दुसरा निळा पांढरा घालायचा दोन ड्रेस असायचे. रंगीत कपडे माहीतच नव्हते तिथे आल्यावर स्वतःचे चक्क 35 रुपये स्टायपेंड मिळू लागले त्या पैशांमध्ये जीवाची मुंबई केली. ट्रेनिंग च्या दिवस पण अत्यंत खडतर होते. कधीकधी नाश्त्याला बुरशी आलेले पाव असायचे . कधी कधी जर सकाळी डोळा उघडला नाही ही तर उपाशी पोटी ड्यूटीवर जावे लागायचे. आणि एवढ्या मोठ्या इन्फेक्शन भरलेल्या वार्डात आम्ही उपाशी पोटी ड्युटी करायचो पण सुदैवाने कधी काही झाले नाही.


ट्रेनिंग संपले आणि पहिली पोस्टिंग रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे मिळाली. तोपर्यंत कोकण कधी बघितलेच नव्हते आणि अचानक एकट राहण्याची वेळ आली. कारण ट्रेनिंगला गेलो तेव्हा आई वडील सोडले परंतु माझी मोठी बहीण मला एक वर्ष सिनियर होती व आम्ही दोघी रूम पार्टनर देखील होतो त्यामुळे कुठे लांब आल्यासारखे वाटले नाही शिवाय इतर बर्‍याच माझ्यासारख्या आई-वडील सोडून आलेल्या मुली असल्यामुळे हळूहळू आम्ही तेथे रुळत गेलो. पण नोकरीच्या ठिकाणी एकदम एकटे राहायची पाळी आली. आपणच आपले शिजवायचे ,खायचे आपल्या घराला कुलूप लावून जायचे आणि संध्याकाळी एकट्याने उघडायचे ते दिवस खूप वाईट गेले. एकटेपणा आधी खायला उठत होता, बर आता सारख्या सुविधा काहीच नाहीत. टीव्ही नाही कुकर नाही गॅस नाही एक फक्त ट्रांजिस्टर माझ्यासोबत होता कधी रात्री झोपताना भीती वाटायची तेव्हा तो रेडिओ रात्रभर मी उशाला चालू ठेवायची. आत्ता चालू असलेली रामायण ही सिरीयल तेव्हा एकदम टॉप वर होती आमच्या शेजारी एक मनोहर म्हणून आजोबा होते त्यांच्याकडे कलर टीव्ही होता हे रामायण बघण्यासाठी मात्र तिथे जाऊन मी बसत असेल रस्त्यावरचे घर असल्याने चाळीस-पन्नास माणसे तरी रस्त्यावर उभे राहून रामायण सिरीयल बघत असत.


पण एक गोष्ट नक्कीच मानावी लागेल ,तीन वर्षात कोकणामध्ये एकटी दुकटी मी, अन मॅरीड मुलगी, पण मला कोणी कधीच काही त्रास दिला नाही कधी कुणी माझा दरवाजा सुद्धा कोणी ठोकवला नाही. हे जर मी घाटावर नोकरीला असते तर कदाचित हे चित्र वेगळे असते किंवा मला नोकरी सोडून घरी यावे लागले असते. तीन वर्षाचा बॉण्ड पूर्ण करून बदली मागितली . सरकारी कारभारात बदली कशी होते हे माहीत नव्हतं, त्यामुळे दुसरी बदली त्यांनी मला ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे दिली. त्यावेळी मोखाडा म्हणजे काय चीज आहे हे माहितच नव्हतं. मोखाड्याला बदलून आले, तर अक्षरशः हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये एका शिपायाने कुडाची झोपडी बांधलेली. ती मला क्वार्टर म्हणून

राहायला मिळाली. आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखे झाले.

गरम तर इतके व्हायचे की माझी चुलत बहीण एकदा भेटायला आली तर दुसऱ्या दिवशी लगेच पळून गेली आणि घरी जाऊन तिला ताप आणि जुलाब सुरू झाले.

तेथेदेखील मी कसेबसे एक वर्ष काढले अर्थात माणसे मात्र सगळीकडे चांगली मिळाली. मला आदिवासी लोकांपासून कधीच काही त्रास झाला नाही उलट ते इतके प्रामाणिक असतात की एकदा माझ्याकडे एक जुलाबाची पेशंट आली त्यावेळी आमच्या दवाखान्यात किचन वगैरे नव्हते .दोन दिवस झाले मी बघते ,तिचा नवरा लहान कच्चीबच्ची घेऊन तिथेच बसून राहिलेला, कुठे कधी खायला-प्यायला गेलेला दिसलाच नाही. शेवटी मी त्याला न राहवून विचारले "बाबा रे "तू जेवायला कधी जातोस? मुलांना काय खाऊ घालतो? तेव्हा त्याने सांगितले पैसेच नाहीत तर कुठून खायला आणणार? माझ्या पोटात एवढी कालवाकालव झाली, खूपच वाईट वाटले तेव्हा माझ्याजवळ आई राहत होती. तिथेच

क्वार्टर असल्याने मी घरी जाऊन आईला भात आणि पिठले करायला सांगितले अख्खा कुकर भरून भात शिजवला व त्या माणसाला भात पिठले नेऊन खायला दिले त्याची भरपाई म्हणून जाताना तो माणूस ज्या लाकडाच्या ओंडक्याला झोळी करून त्याच्या बायकोला त्यात घालून दवाखान्यात आणले होते तो ओंडका शिसवी लाकडाचा होता तो जाताना मला देऊ लागला. मी घेत नव्हते बाबा रे मी याचे काय करू ?मला नको. तो काही ऐकेना शेवटी आमचा शिपाई म्हणाला सिस्टर! नाही घेतले तरी त्यांना राग येतो घ्या तुम्ही !मी त्याचे स्टूल वगैरे बनवेन शेवटी मी तो घेतला अशी त्यांची कृतज्ञतेची वृत्ती आहे


तेथून मी बेंगलोर येथील नावाजलेल्या निमांन्स नावाच्या नावाजलेल्या संस्थेत मनोविकृती तज्ञ परिचारिका म्हणून मी अजून एक वर्षाचा डिप्लोमा केला. बंगलोर ला गेल्यानंतर वेगळीच कथा. परप्रांतात जाण्याची पहिलीच वेळ त्यांचे सगळे व्यवहार इंग्लिश मध्ये नाही तर त्यांच्या लँग्वेज मध्ये कानडी मध्ये आणि तिचे देखील एकदम चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागलं. तरी बरं नशीब माझं! माझं ट्रेनिंग जेजे ला झाल्यामुळे माझे इंग्लिश त्यातल्या त्यात बरे होते. तरीपण पास होईल की नाही याची भीती होती. मी तर ज्या महत्प्रयासाने अनेक खटपटी लटपटी करून सदर ट्रेनिंगला प्रवेश मिळवला होता. हे सोडून पुन्हा महाराष्ट्रात येण्याचा विचार करत होते. इथे मात्र वडील पाठीशी उभे राहिले म्हणाले "आशा" नापास झालीस तरी चालेल! पण ट्रेनिंग सोडून पळून यायचं नाही. पळपुटेपणा करायचा नाही पाय रोवून ठाम उभी रहा. मग मी हळूहळू तेथे रुळले माझे इंग्रजी पण तेथे चांगले इंप्रूव्ह झाले आज मला सांगण्यास अभिमान वाटतो मी देते 75 टक्के मार्गांनी उत्तीर्ण झाले आम्ही 18 महाराष्ट्रीयन होतो पैकी नऊ जणी पास झालो त्यात मी पास झाले. त्यानंतर मनोविकृतीतज्ञ परिचारिका म्हणून मनोरुग्णालय ठाणे येथे मी एकूण 23 वर्षे काम पाहिले. ठाण्याला बदलून आल्यानंतर जगरहाटी प्रमाणे लग्न मुले संसार हे सर्वकाही व्यवस्थितपणे पार पाडले. सगळे सण, वार, संस्कार जे प्रत्येक आजकालची नोकरी करणारी मुलगी जशी घरची आणि दारची दोन्ही आघाड्या सांभाळते तशा मीही सांभाळल्या. कालच लग्नाला 28 वर्षे पूर्ण झाली दोन्ही मुले नोकरीला लागली. एक माझ्या क्षेत्रात आहे तर, एक आयटी सेक्टरमध्ये आहे. गेली सहा वर्षे मी नेटाने या पदावरती काम पहात आहे


जेव्हा पहिली अपॉईंटमेंट घेतली तेव्हा, कितीतरी मुली खेड्यापाड्यात हजर झाल्या नाहीत. त्या मुळात शहरांमध्येच राहत असल्यामुळे त्यांना तिथल्या महानगरपालिकेत किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला नोकऱ्या मिळाल्या आमच्या बरोबर हजर झालेल्या मुली देखील अर्धवट बाँड टाकून पळाल्या. त्यानंतर मोखाडा, त्यानंतर बेंगलोर, उरण अशा कित्येक ठिकाणी मी 20- 22 व्या वर्षी एकटे- दुकटे राहून नोकऱ्या केल्या. कुठेही पळपुटेपणा केला नाही त्यामुळे आज मी नर्सिंग ऑफिसर या पदावर ती आहे परमेश्वराच्या कृपेने वाडवडिलांच्या आशीर्वादाने आयुष्यात भेटलेल्या भल्याबुऱ्या लोकांच्या सोबतीने मी हा प्रवास पार केला या प्रवासात मी निश्चितच स्वतःला घडवले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational