माझ्या नवऱ्याची दुसरी बायको
माझ्या नवऱ्याची दुसरी बायको


आज आपण टीव्हीवर अनेक मालिका बघतो त्यात झी मराठीवर असलेली मालिका माझ्या नवऱ्याची बायको ही सद्या चालू आहे. त्यात राधिकाच्या रूपात आलेली समाजाशी झगडत असलेली स्त्री. आज रधिकासारख्या आपल्या समाजात अशा कितीतरी स्त्रिया आहे त्या अजूनही मुकाट्याने पुरुषी अहंकाराचा मार सहन करत आहे
असं म्हणतात की लग्न झाल्यावर नवरा-बायकोच्या नात्यात सुख दुःख वाटून घेतली की ते नातं घट्ट होतं. लग्नात एकमेकांसाठी शपथा घेतल्या जातात. लग्नात बायकोला मी जन्मभर साथ देईल अशी शपथ घेतो. दोघांच्या गोड संसाराला सुरवात होते. हळूहळू नातं फुलत जातं. त्या संसाररुपी नात्यात त्यांच्या प्रेमाचं एक फुल उमलतं. पूर्ण कुटुंब आनंदाने वेडं होतं. हळूहळू ते फुल उमलत जातं. पण अचानक ह्या नात्यात सुखादुःखासोबत ते प्रेम वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग ह्या नात्याची विण घट्ट होण्याऐवजी ती उकलत जाते. कितीही विणण्याचा प्रयत्न केला तरी ती पुन्हा विणली जात नाही. मग हा संसार गोड होत नाही तर तो कडू व्हायला सुरुवात होते.
नवरा या वाटेकरीच्या नादी इतका लागतो की त्याला आपल्या पिल्लाची जरासुद्धा काळजी वाटत नाही. या गोड संसारात जेव्हा या नवऱ्यावर हक्क सांगणारी तिसरी व्यक्ती येते तेव्हा ही हक्काची बायको त्या व्यक्तीचा तिरस्कार करू लागते. ज्या नवऱ्याच्या हाताला उशी समजून त्याच्या कुशीत विसावा घेणारी त्यांची हक्काची बायको त्या व्यक्तीचा रागराग करू लागते. मनातून तळतळाट होऊन त्याला कोसू लागते. हळूहळू त्याच्या नात्यावर विरजण पडतं.
मी म्हणते की हे पाऊल उचलताना पुरुषांना किंवा त्या स्त्रीला हे मनात का येत नाही की लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील. हे काम करताना त्यांना लोकलाज्जेविषयी किंतु परंतु मनात येत नाही. आपल्या पिल्लांचा जरासुद्धा विचार मनात का येत नाही. अरे पैशाने माणसाला विकत घेता येत नाही तर ते प्रेमाने घेता येतं. नुसता पैसा फेकला म्हणजे संसार होत नाही. लग्न झालेल्या बाईला नुसता पैसा नाही तर नवऱ्याचं प्रेम हवं असतं. आयुष्य हे खुप सुंदर आहे. आपल्या आयुष्यात खरी साथ कोण देणार हे त्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने ठरवायला हवं आणि कोण टिकुन राहील हे पण त्यांनी जाणून घ्यायला हवं.
आज आपण पाहतो तरुण पिढीमध्ये खरं प्रेम सोडून वासना अधिक दिसून येते. त्यामुळे समाजात अशा अनेक घटना घडतात. आज माणूस मानसिक तणावाखाली जगतो आहे. माणसाची मानसिक स्थिती बिघडली की त्याला नातीगोती, प्रेमभाव याचे महत्व राहात नाही. अशा स्थितीत तो आपल्या नात्यापासून दूर ओढला जातो. कधीकधी तो या स्वतःच्या हक्काच्या नात्यापासून इतका दूर होतो की आपण कोण, हे म्हणजे स्वतःची ओळख विसरून जातो. अशा स्थितीमध्ये नवरा बायकोमधले ऋणानुबंध त्यांना एकत्र आणू शकतात. या ऋणानुबंधामध्ये इतकी ताकद असते की ते कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ते तोडता येत नाहीत.
नाती तोडणे सोपे असते पण ती जोडायला अनेक वर्षे लागतात. समजा ती जोडली तरी काही घटना अशा असतात की त्या व्यक्तीला कितीही जवळ आणण्याचा प्रयत्न केला तरी ती घटना त्या व्यक्तींना जवळ येू देत नाही. मनापासून ते एकमेकांना आपलं मानत नाहीत.
लग्नाच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करणारी त्याची बायको आपल्या प्रेमाच्या वाट्याला येणाऱ्या त्या व्यक्तीचा द्वेष करणार नाही तर काय? कोणतीही स्त्री हे सहन करणार नाही. राधिकासारखी समाजाशी झगडणारी, संकटाशी सामना करून आपल्या पायावर सक्षमपणे उभी राहणारी 300 करोडच्या कंपनीची मालकीण अशी एखादी बोटावर मोजण्याइतकी स्त्री फार दुर्मिळ आहे. आपल्या मुलाची बाजू न घेता केवळ सत्याच्या बाजूने उभे राहणारे सुभेदार काका-काकूसारखे आपल्या समाजात काही काही ठिकाणी आढळतात.
माझ्या मते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गुरुनाथसारख्या नवऱ्याला अद्दल घडवायला हवी. राधिकासारख्या समाजाशी दोन हात करणाऱ्या स्त्रीची भूमिका डोळ्यासमोर ठेवून समाजात घडणाऱ्या जखमी अवस्थेतल्या पुरुषाला अद्दल घडवायला हवी. त्यांच्याशी सामना करून 'हम भी किसी से कम नही' हे समाजाला दाखवून द्यावे.