जिजाऊ कालची आणि आजची
जिजाऊ कालची आणि आजची
प्रथम सर्वांना आजच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, आणि जिजाऊ साहेबांना जयंती निमित्त मानाचा मुजरा .
माझा आजचा विषय आहे, जिजाऊ आजची आणि कालची
असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, ती आई असते, बायको असते, मुलगी असते, बहीण असते, कोणत्याही रूपात ती असू शकते .
स्त्री ही जगतजननी आहे. पण तेव्हाची जिजाऊ आणि आताची जिजाऊ यात खूप फरक आहे .
तेव्हाच्या जिजाऊ ने श्रीमंती आणि ऐशोआराम यामध्ये स्वतःचे देखील आयुष्य घातले नाही ,आणि मुलाचे देखील घालू दिले नाही. सासर-माहेर दोन्हीकडून त्या श्रीमंत होत्या, घराण्यात सरदारकी होती पण त्यांना आस लागली होती हिंदवी स्वराज्याची, त्यासाठी ज्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले असेल, त्या आपल्या काळजाच्या तुकड्याला त्यांनी या समरामध्ये लोटले.
काय सोसले नसेल त्या माऊलीने?
जेव्हा महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात होते,
जेव्हा महाराज प्रथम अफजल खानाशी युद्ध करायला गेले,
जेव्हा महाराज औरंग्याच्या नजर कैदे मध्ये होते.
आयुष्यभर तळ हातावरती शीर घेऊनच ते फिरत होते. आणि त्याच वेळी ही साध्वी व्रतवैकल्ये करत होती, शरीराला कष्ट देत होती .त्याच वेळी संपूर्ण स्वराज्याच्या कारभारावर देखील तिचे लक्ष होते.
कित्येक वेळा या मातेला वाटले असेल, निव्वळ आपल्या या महत्त्वाकांक्षी स्वभावापायी,
महत्वकांक्षा कसली? स्वतःला काहितरी मिळवण्याची? नव्हे!नव्हे! तर गुलामगिरीतून बाहेर पडून हिंदूंचे एक स्वतःचे असे राज्य असावे ही महत्त्वाकांक्षा.
पण त्यापायी आपल्या शिवबाला कित्येक वेळा साक्षात यमाशी सामना करावा लागला आहे. कित्येक आप्तेष्ट शत्रू झाले आहेत,
पण म्हणून काय!
"आता बाबा तू पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकला होतास, तुझ्या जीवावर बेतलं होतं, नको आता ते स्वराज्य "तू आपला सुखाने घरातच रहा. असं काही त्या म्हणाल्या नाहीत.
पण आत्ताच्या जिजाऊ असं करतील का?
" मुळात शिवाजी जन्मावा! पण तो शेजार्याच्या घरात. ही आपली वृत्ती असते. आपण फक्त सोशल मीडिया वरती लढवय्ये.
पण प्रत्यक्षात वेळ आली तर दार दडपून घरात बसणारे .
चोरी होते ,दरोडेखोर आलेत, शेजारच्या किंचाळ्या ऐकू येत आहेत. पण आपण तेव्हा दार उघडून हातात काय मिळेल ते शस्त्र घेऊन धावणार नाही, तर धडधडत्या काळजाने घरात लपून बसणार .ही आहे आत्ताची वृत्ती .
दंगली, भूकंप, पूर, यामध्ये किती आयांनी स्वतःहून आपल्या मुलांना देखील मदतीला पाठवले असेल?
आताच्या जिजाऊची संकल्पना, "घर आणि घराच्या चौकटी पर्यंत मर्यादित असते" तिच्या डोळ्यापुढे देव देश धर्म यातलं कुठलं काही नसतं, तर स्वराज्याची बातच सोडा.
जेव्हा आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोंगल, असं चारी बाजूने महाराष्ट्राला विळखा होता, तेव्हादेखील या मातेने क्रूर धर्मांध मुसलमानी राजवटीमध्ये देखील, स्वराज्याचे इवलेसे रोप लावण्याचे स्वप्न पाहिले, आणि नुसते पाहिलेच नाही तर ते आपल्या मुलात उतरविले .आणि त्या इवल्याशा रोपाचा वटवृक्ष झाला, शिवबा अभिषिक्त चा राजा झाला, त्याच्याबरोबर बाराव्या दिवशी या मातेने देह ठेवला. तिच्या आयुष्यात ती कृतकृत्य झाली, आणि जे स्वप्न बघितले ते याची देही याची डोळा पूर्ण झाले.
तशी जिजाऊ आता जन्माला येणे नाही.
आणि तसा शिवबा देखील होणे नाही्.