हाच खरा देव...!
हाच खरा देव...!
किर्ती नुकतीच लग्न करून सासरच्या वातावरणाशी जुळवून घेत होती.घरी सासूबाईंच्या कडक नियमात कोणीही लुडबुड केलेली त्यांना खपत नसे...रोजची पूजा , अर्चा , कुळाचार हे अगदी व्यवस्थित साग्रसंगीत झालेच पहीजेत हा त्यांचा दंडक होता.मग त्यासाठी घरच्यांना जेवायला किंवा कुठल्याही कामाला उशीर झाला तरी त्यांना पर्वा नसायची...
किर्तीची मोठी जाऊ मीरा दोन वर्षांपूर्वी लग्न करून घरात आलेली होती.तिला ह्या सगळ्याची चागलीच सवय झालेली होती .ती आनंदाने सगळं निभावून नेत होती. सासूबाईंना न दुखवता सगळी कामं पटापट उरकून सगळ्यांना वेळेवर जेवण ,नाश्ता , डबा देऊन तिने सगळं अगदी योग्य रीतीने सांभाळलं होतं...
किर्तीच लग्न होण्याआधीच मीराला दिवस गेले त्यामुळे तिला त्रास व्हायचा आणि मग घराचं गणित जरा बिघडायच...पण सासूबाई काहीही ऍडजस्ट करून घ्यायला तयार नसायच्या...बिचारी मीरा तसच सगळं सहन करत होती.कीर्ती आल्यामुळे तिला आधार मिळाला होता.दोघी अगदी बहिणी बहिणी प्रमाणे एकमेकींना सांभाळून घ्यायच्या...
"उद्यापासून श्रावण सुरू होतोय , घरात कडक नियम असतात , सगळी पूजा साग्रसंगीत झाल्याशिवाय बायकांना काहीही खाण्याची परवानगी नसते.रोजचा नेवेद्य, स्वयंपाक तुम्ही दोघी जावा मिळून करा.मीराला सगळं माहिती आहे ती सांगेल तुला " राधाबाई आपल्या नवीन सुनेला,कीर्तीला समजावत होत्या.
मीरा थकल्यासारखी वाटत होती , तिला नुकताच नववा महिना लागल्यामुळे तिची काळजी घेणे खूप गरजेचे होते. किर्तीचे तिला आराम करायला सांगून स्वतः स्वयंपाक करू लागली...आज पूजेला खूप उशीर झाला. मिराताईंची अवस्था बघून कीर्ती ने हिम्मत करून मीराला जेवायला दिलं...आता सासूबाई ओरडतील म्हणून मीरा घाबरली आणि तिने जेवायला नकार दिला...
पण सासूबाईंनी तिला जवळ घेऊन स्वतः भरवल
"अगं मीरा ..आज माझ्या देवाला नैवेद्य मिळाला ! माझं नातवंड म्हणजेच खरा देव ग...तुला त्रास झाला तर का तो देव खुश होईल ? आजपासून तुला कोणतेही नियम लागू नाहीत ...तू फक्त स्वतःची काळजी घे आणि तुला काय हवं ते सांग...आम्ही तुझे सगळे लाड पुरवू ! आज खऱ्या अर्थाने मी श्रावण पाळला ! " सासूबाईंच्या बोलण्याने दोघींचे डोळे आनंदाने पाणावले !
आज खऱ्या अर्थाने देवाला नैवेद्य पावला होता...!