गणपती दुर्वा वाहण्याची कथा
गणपती दुर्वा वाहण्याची कथा
अनलासूर नावाच्या दैत्याने तपश्चर्या करून भगवान शंकराकडून अजिंक्य असा वर मागून घेतला आणि त्याने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. या वेळी सर्वांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी गणपतीचे स्तवन केले. त्या वेळी गणपतीने प्रकट होऊन प्रचंड स्वरूप धारण करून त्या दैत्याला गिळले. दैत्याचे तेजस्वी अग्नीसारखे प्रचंड शरीर गणपतीच्या पोटात गेल्याने गणपतीच्या शरिराचा दाह होऊ लागला आणि तो दाह काही केल्या शांत होईना. चंद्राने आपले शीतलत्त्व दिले, तरीही दाह शांत होईना. इतक्यात तेथे काही ऋषी दूर्वा घेऊन आले. त्यांनी गणपतीची स्तुती केली आणि भावपूर्ण अंतःकरणाने त्या दूर्वा गणपतीच्या मस्तकावर अर्पण केल्या अन् दाह शांत झाला. तेव्हा गणपति सर्व देवांना म्हणाला, ‘‘मला दूर्वा पुष्कळ प्रिय आहेत.’’ त्या वेळेपासून सर्व देवांनी दूर्वा वाहून गणपतीचे पूजन चालू केले.
