धडपडणाऱ्या शिक्षिकेची कहाणी..
धडपडणाऱ्या शिक्षिकेची कहाणी..
"नांदूर च्या शिक्षिका रोहिणी लोखंडे यांची विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी धडपड".श्रीमती रोहिणी राजेंद्र लोखंडे यांचा जन्म पुण्याचा.डी.एड झाल्यानंतर त्या पुणे येथील हुजूरपागा शाळेमध्ये काही महिने रजेवर गेलेल्या शिक्षिकेच्या जागेवर कार्यरत होत्या.१०-७-१९९५ त्या जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्या.अध्यापना बरोबरच वेगळे व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे समाज माध्यमांनी त्यांची दखल घेतली.केवळ अध्यापन नव्हे तर नाविन्यपूर्ण उपक्रमामुळेही शिक्षकांना समाजमान्यता मिळत असतेंसमाज मान्यता ही काम करण्यासाठी ची प्रेरणा असते.महानुभव, लोकराज्य, वयम मासिकांनी,व दैनिक एकमत, लोकमत ,सकाळ ,महाराष्ट्र टाइम्स यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. विविध ठिकाणी कार्यरत असताना रंजकअध्यापन, संगीत कवायत, शाळेची रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, परिपाठात we learn Englishउपक्रम, मुलांना वैदिक गणित शिकवणे, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, आम्ही वाचतो उपक्रम यामुळे मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत, सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा यावर आधारित प्रश्न कुंभ उपक्रम, भाषा अभिव्यक्ती मुलाखत उपक्रम, ग्लोबल क्लास रूम अंतर्गत केरळचे संतोष तळपट्टी सरांची ऑनलाईन मुलाखत घेतली,दिनंकाचा पाढा, लेझिम पथक स्थापना, शिवाय स्नेहसंमेलनातून ७ लाख रुपये जमा करणे, खाऊ गल्ली उपक्रम राबवून सहा हजार रुपयांची कमाई करणे, शाळेची कंपाउंड वॉल बांधणे असे विविध उपक्रम विविध शाळेत राबविले. प्रत्येक ठिकाणी उपक्रमामुळे मुले शाळेत येऊ लागली व त्यांना शाळेबद्दल आवड निर्माण होऊ लागली.कोणत्याही क्षेत्रात वेगळ्या वाटा शोधल्या शिवाय त्या क्षेत्रात यश मिळत नाही.जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयानुसार तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमारयांच्या संकल्पनेतून बाल रक्षक चळवळ जन्माला आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम राबवला जात असताना असे लक्षात आले की शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा आहे. शाळा प्रगत करायची असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत ही मुले शाळेत टिकली पाहिजेत व शिकली पाहिजेत. हा प्रश्न एखाद्या स्वयंसेवी संस्थेकडून सोडवण्यापेक्षा राज्यभरातील लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने बालरक्षक बनवून कार्य केले तर मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकतो यातूनच बालरक्षक या संकल्पनेचा उदय झाला.स्थलांतरित कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी, नांदूर येथील लोखंडे या प्राथमिक शिक्षिका मागील अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशा स्थलांतरित कामगारांच्या दोन मुलांना दहावीच्या परीक्षेला बसवणसाठी त्यांनी केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहेत.शिक्षण विभागाच्या मदतीने सुरू असलेल्या बालरक्षक उपक्रमाची त्यांना चांगली साथ मिळाली, नांदूर परिसरातील दोन वेगवेगळ्या कुटुंबातील शुभम साळवे व नंदिनी राठोड या दहावीत शिकणार्या मुलांना लोखंडे यांनी केलेल्या सहकार्यामुळे परीक्षा देणे शक्य झाले. यातील शुभम साळवे हा ऊस तोडणी मजुराचा मुलगा आहे तर नंदिनी राठोड ही रस्ते बांधकाम करणाऱ्या मजुरांची मुलगी आहे. लॉक डाऊन च्या काळात या दोघांच्या शिक्षणाची वाताहत झाली होती. दहावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र भरणे ही त्यांना शक्य झाले नव्हते, रोहिणी लोखंडे यांना हे समजताच त्यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. शुभम हा नगर जिल्ह्यातील आहे त्याने फॉर्म भरला नव्हता फॉर्म भरण्यासाठी लोखंडे यांनी मदत केली. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी रात्रशाळा :- रोहिणी लोखंडे यांनी असेच विशेष प्रयत्न ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केले आहेत. कोरोना च्या काळात शाळा भरत नसे. विद्यार्थीही शाळेत येत नसत, त्याच्यामुळे, शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रम विचार करणे व तेअंमलात आणणे गरजेचे झाले आहे.यापूर्वीही अनेक कारणांमुळे विद्यार्थी शाळेत येत नसत त्यापैकी ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडायचा यावर तोडगा काढला आहे सध्या नांदूर येथे कार्यरत असलेल्या रोहिणी लोखंडे यांनी नांदूर हे गाव दौंड तालुक्यात येते. ऊसतोड कामगारांची मुले काही दिवसापासून, रोहिणी लोखंडे यांच्या मदतीने व पुण्यातील सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलाकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल सारखे साधन नसताना त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची किमया रोहिणी लोखंडे यांनी केलीं आहे. त्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत, त्यांनी रात्र शाळेच्या माध्यमातून गेले वर्षभर ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाचे धडे दिले आहेत. यासाठी त्यांना पुण्यातील अक्षर मानव या संस्थेने मदत केली आहे. गेले वर्षभर करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे व यापुढेही शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद राहतील अशा परिस्थितीत विद्यार्थी येतच नसतील तर त्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागेल. पण ते कसे, कुठे व केंव्हा द्यायचे याचे नियोजन, रोहिणी लोखंडे यांनी केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाने रात्र शाळेच्या माध्यमांतूनही मुलांना शिक्षण देता येते हे त्यांनी दाखवून दिले. नांदूर गावा जवळ ऊसतोड कामगारांचे अनेक फड असल्याने तेथील मुले सहा महिन्यांहून अधिक काळ तेथे वास्तव्यास असतात. दरवर्षी या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवायला पाठवले जाते, पण करोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे मुले शिक्षणा बाहेर रहाण्याची भीती होती. ऊसतोड कामगारांच्या मुलाकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी गॅजेट्स नसल्याने शिक्षण शक्यच नव्हते यावर लोखंडे यांनी गावातील एका महिलेच्या सहकार्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले व यासाठी त्यांना पुण्यातील अक्षरमानव या सामाजिक संस्थेकडून जुने स्मार्टफोन मिळवले फोन च्या साह्याने त्यांनी विद्यार्थ्यांना सायंकाळी सात ते रात्री साडेनऊ या काळात शिकवायला सुरुवात केली. महिला सहकार्याच्या मदतीने घराच्या अंगणात व्यवस्था त्यांनी केली आणि रात्रशाळेच्या माध्यमातून मुलांचे अध्यापन सुरू ठेवले.कोरोच्या काळात प्रत्येक शिक्षकाला त्यांच्यासमोर असलेल्या प्रश्नांची उकल करणे क्रमप्राप्त आहे, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.ऊसतोड मजुरांच्या एखाद्या मुलाला शाळेत आणणे मोठे जिकिरीचे असते ही वस्तुस्थिती असताना नांदूर येथील शाळेतील रोहिणी लोखंडे यांनी अन्य शिक्षकांच्या मदतीने विविध तांड्यावरील सुमारे १७ मुले शाळेत दाखल करून घेतली. इतकेच नव्हे तर त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केल्याने ती शाळेत टिकूनही राहिली त्यांचा उत्साह पाहून त्यांच्या पालकांचा आणि शाळेतील शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.ग्रामस्थ व शाळा समितीच्या मदतीने या मुलांसाठी एका स्वयंसेवीकेला नियुक्त करण्यात आले होते. शालेय उपयोगी व नित्य वापराच्या वस्तूंची विविध घटकांकडून मदत उपलब्ध झाली. यामध्ये दप्तर कानटोपी ,रुमाल, पॅड ,रंगीत पेन्सिल ,पाटी अशा विविध साहित्याचा समावेश होता. दौंड पंचायत समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी गोरखनाथ इंगणे यांनीही या उपक्रमास हातभार लावला.लॉक डाऊन या काळात ऑनलाईन शिक्षणाचे वारे वाहू लागले असतांनाही त्यांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा जो मोठा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर एक वेगळा मार्ग काढला. या शाळेत ऊस तोडी वाल्यांची मुले शिकतात. शाळा बंद असल्यामुळे इयत्ता सातवीतील दोन मुले ऊस तोडी करण्यासाठी जाऊ लागली. श्रीमती लोखंडे यांनी त्या मुलांच्या पालकांशी फोनवर बोलून त्यांच्या साध्या मोबाईलवरही शिक्षण देता येईल हे पटवून सांगितले. संध्याकाळी ही मुले ऊस तोडी वरून घरी आल्यावर त्यांच्या फोनवर वर्ग सुरू होत असे. पाठ्यपुस्तके त्यांना मिळाली होतीच. एकाच वेळी पाठ्यपुस्तकातील एकेका पाठाचे वाचन त्या घेत. छोटे-छोटे घटक वाचुन त्यांना समजावून सांगत. आशयाचे स्पष्टीकरण दिल्यावर प्रश्न विचारत, दोघेही त्याची उत्तरे देत. वहीत प्रश्न लिहायला सांगत. त्या त्यांची उत्तरे पाहू शकत नसल्या तरी त्यांनी लिहिलेली उत्तरे वाचायला सांगत.अशाप्रकारे दररोज एक तास फोन वर ही 'आमची शाळा' चालत होती.रोहिणी लोखंडे युट्युबवरही यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन हे चॅनल चालवतात, यामध्ये त्यांनी खुरपणी करतांनाचे, खते व बियाण्यांची माहितीचे, सिंचनाच्या पद्धतीचे, नद्या व धरणे व त्यांची उगमस्थाने प्रत्यक्ष धरणाच्या सानिधयातून सांगणे, वनस्पतीचे प्रकार ,वनस्पतीचे अवयवांनुसार वर्गीकरण, प्राण्यांचे अधिवास, शेती अवजारे ,सुधारित शेतीच्या पद्धती हे पाठ त्यांनी प्रत्यक्ष वस्तू आणि प्राणी दाखवून, त्याचे व्हिडिओ बनवले व त्या स्वाध्यायाची उत्तरे व्हाट्सएप्पवर विद्यार्थ्याकडून घेतली.त्यांनी शेतातील आंब्याच्या झाडाला व्हाईट बोर्ड लावून त्यावर गणिताच्या पाठाचे व्हिडिओ तयार केले. त्यांनी तयार केलेले व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या वर्गासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले आहेत. त्यांनी तयार केलेला, शेतात खुरपणी करताना अध्यापनाचा व्हिडिओ महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाला होता.स्थानिक पातळीवरील प्रत्येक प्रश्नाची उकल शिक्षकांनी स्वतःचा कल्पनेतून व नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली तरच शैक्षणिक चित्र पालटेल.अनेक ठिकाणीअनेक चांगले उपक्रम शिक्षक राबवतातच, ते इतरांनाही कळायला हवेत.समाजासमोर जेवढ्या यशोगाथा येतील त्या समाज सुधारायला प्रेरणेचेच काम करतील.