डॉ. आनंदीबाई जोशी भाग - ३
डॉ. आनंदीबाई जोशी भाग - ३
यमूची बुद्धी जन्मतःच तीक्ष्ण होती. आता त्या बुद्धीला अक्षरांची साथ मिळाली. अक्षर आणि स्त्री हे त्याकाळी विरुद्धार्थी शब्दच होते! तरीही त्यांना आपल्या मुलीचं फार कौतुक वाटे, कोणी पाहुणे आले कि ते आवर्जून आपल्या लेकीचं कौतुक करून मोकळ व्हायचे. पण, त्याकाळातल्या पुरुष काय स्त्रियांनाही हे खपायचं नाही. कारण, शिक्षण ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे लोक त्यांना बोल लावू लागले, "अक्षर ओळख पुरे झाली लग्नाचं कधी बघताय तिच्या? तुमच्या अश्या वागण्याने कोण करून घेईल हिला? वय निघून गेलं तर कायमची घरात ठेवणार आहात का हिला?…अश्या असंख्य बोचरया प्रश्नांचे घेरावे गणपतरावांना पडले होते. त्याकाळी पाळण्यातच लग्न उरकून टाकायचे, मुलगी कळती झाली कि त्या इवल्याश्या जीवाला सासरी धाडलं जायचं. पाळण्यात स्थळ नाहीच भेटलं तर लवकरात लवकर मुलीचा सोक्ष मोक्ष लावला जायचा. वय जितकं जास्ती, जास्ती म्हणजे आठ-नऊ वर्षे तितकेच लग्न ठरण्यात अडचणी! त्यामुळेच गणपतरावांना यमूच्या लग्नाची काळजी वाटू लागली. यमूच्या लग्नाचे वारे जोरात वाहू लागले होते...
यमुच्या आयुष्यातील महत्वाच पर्व १८७०! यमूच्या आयुष्यात गोपाळराव विनायक जोशींचा प्रवेश! गोपाळरावांची नियुक्ती कल्याण पोस्टात क्लार्क म्हणून झाली होती. गोपाळराव नव्या विचारांचे, शिकलेले गृहस्थ होते, त्यांना स्त्री शिक्षणाबद्दल कळवळा होता. पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर, पुन्हा लहान मुलीशी लग्न करायला त्याचं मन धजत नव्हतं, त्या काळातील विधवा पुनर्विवाह करण्याच्या चळवळीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता, त्यांनी मनाशी ठाम ठरवल होत, पुन्हा लग्न करेन तर शिकायला तयार असणाऱ्या एखाद्या विधवेशीच! अश्या विचारांना घेऊनच ते कल्याणला आले होते. पण, मग त्यांनी वयानी लहान असलेल्या यमुशी विवाह का केला? हे अत्यंत क्लिष्ट कोड आहे.
गणपतरावांची वर संशोधन मोहिम जोरात सुरूच होती पण, म्हणावं तसं काही जुळून येत नव्हत. त्यातच गोपाळरावांची बदली अलिबागला पोस्टमास्तर म्हणून झाली, पगारही वाढला होता. आपले गुरुजी आता जाणार या भीतीने यमूला सारकाही संपल्यासारख वाटू लागलं, आता पुढे कसं शिकणार? कोण शिकवणार आपणास? पुन्हा कधीच पुस्तके पहायला भेटणार नाहीत! अश्या विचारांनी ती चिमुकली सैरभैर झाली, तिचा हट्ट सुरु झाला, तो असा कि तिलाही गोपाळरावांसोबतच जायचे आहे. सगळेच कोड्यात पडले! त्यावेळी यमू फक्त आठ वर्षांची होती. विवाहयोग्य असणारया मुलीला असं कसं परक्या पुरुषासोबत पाठवणार नाही का? गुरुजी असले म्हणून काय झालं? यमूची आई काही ऐकायला तयार नव्हती. म्हणून गणपतरावांनी मध्यस्थामार्फत लग्नाची बोलणी केली. गोपाळरावांना आपल्या आज्ञाधारक शिष्येच कौतुक नक्कीच होत, त्यामुळे त्यांनी लग्नाला होकार दिला. आईवडिलांना घेऊन येतो म्हणून ते निघाले तेव्हा त्यांच अंतर्मन पुन्हा एकदा जाग झाल असाव, ९ वर्षे वयाच्या यमूशी लग्न करायला त्यांच मन धजेना. म्हणून, ऐन लग्नाच्या तिथीलाच हा माणूस गायबच राहिला. संतापलेल्या गणपतरावांनी मध्यस्त गृहस्थला पकडून बोल लावले. तो मध्यस्थ गोपाळरावांचा शोध घेत नाशिक स्टेशनला पोहचला असता, त्याला गोपाळराव सापडले, बरेच बोल ऐकून, शेवटी गोपाळरावांनी माफी मागितली अन लग्नाला तयार झाले ते एका अटीवर, लग्नानंतर यमुनेच्या शिक्षणामध्ये कोणीही कधीही ढवळाढवळ करणार नाही! या अटीवर शिक्कामोर्तब झाले, ३१ मार्च १८७४ साली! अवघ्या नऊ वर्षे वयाच्या यमुनेचा विवाह तिच्याहून वीस वर्षांनी मोठया असणारया गोपाळरावांशी झाला. हिंदू धर्माच्या चालीरीतींनुसार विवाहानंतर स्त्रीचे नाव बदलले जाते, जन्मापासून जे नाव तिची ओळख असते, जे नाव तिच्या जन्मदात्यांनी तिला दिलेले असते ते एका क्षणात बदलून, त्या स्त्रीच जणू पुन्हा नामकरणच होते, नव्या नावासोबत नवा अध्याय! असो, गोपाळरावांनी यमुनेच नामकरण "आनंदी" केलं. आनंदी अर्थात सर्वांना आनंद देणारी आनंदी! या नावातही किती गहन अर्थ लपलेला आहे, संपूर्ण हिंदुस्थानातील स्त्रियांना भविष्यात आनंदाच सुवर्ण दार उघडून देणारी ही आमची "आनंदी"!