चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला
सूर्य मावळतीला आला होता. पक्षी किलबिल करत घरट्याकडे निघाली होती. सायंकाळी नदीकिनारी वॉकला आलेली लोकही आपापल्या घराकडे परतायला लागली होती. रघुनाथ मात्र अजूनही शेजारच्या बाकावर बसले होते. आजूबाजूची वर्दळ शांत होतात, ते बाकावरून उठले आणि नदीच्या दिशेने जाऊ लागले. एका उंच पठारावर उभे राहून त्यांनी नदीकडे एकटक पाहिलं. एक मोठा श्वास घेतला आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ते नदीत उडी घेणारच.., इतक्यात मागून कोणीतरी त्यांचा हात धरला. "अहो.., काय करताय?" व्हील चेअर वर बसलेली एक साठीतील महिला त्यांना विचारू लागली. "सोडा माझा हात.. प्लीज सोडा..!!! असं असह्य होतंय मला जगणं. हा एकांत जीव घेतोय माझा..! संपवू द्या एकदाच सगळं.!!" रघुनाथच्या मनात दाटून आलेल्या भावना उफाळून बाहेर येत होत्या.
"तुम्ही प्लीज शांत व्हा आधी..!" असं म्हणत साधना ने त्यांच्या हाताला धरत त्यांना बाजूला केल आणि एका बाकावर बसवलं. पर्स मधून पाण्याची बॉटल काढून रघुनाथ ला पायला दिली. दोन घोट पाणी पीत रघुनाथने डोळे पुसले. पुन्हा एक दिर्घ श्वास घेतला आणि आता तो शांत झाला होता. "एकटं जगण्याचा कंटाळा आलाय हो. घरी मुलगा सून आहे पण तरी त्यांच्या साठी मी नसल्यासारखाच आहो. माझी अडचण होतंय त्यांना. असं लाचारीच जगणं नकोय मला. त्या पेक्षा मरण मला सोपं वाटत.!!" रघुनाथ त्याच्या मनातील सल बोलून दाखवू लागला. रघुनाथ च्या बोलण्यातून तो दुखावलाय हे तर स्पष्ट कळत होत. मात्र जगात त्याच्या इतका कोणीही दुःखी नाही हेच तो जणू काही पटवून देतोय असंही वाटतं होत. साधना शांत पण सगळं ऐकून घेत होती.
"हम्म्म्म...!! मी साधना, साधना देसाई. ते पलीकडे वृद्धाश्रम दिसतंय ना ते माझंच आहे." रघुनाथ आश्चर्याने तिच्या कडे बघू लागला. "आहो, पण तुम्ही असं व्हील चेअरवर बसून सगळं कस सांभाळता?" रघुनाथ बोलू लागला. "अहो, ही व्हील चेअरच तर माझी स्ट्रेन्थ बनली. जेव्हा पाय साबूत होते. सगळं करू शकायचे तेव्हा माझी मुलं आनंदाने मला त्यांच्या सोबत ठेवायची. ती कुठे गेली तर त्यांच्या मुलांचा सांभाळ करायला मी असायची. एका ऍक्सीडेन्ट मध्ये मी पाय गमावले आणि सगळं बदललं. त्यांना मी नकोशी झाले. कारण आता मी त्यांच काहीही करू शकणार नव्हते. दोन्ही मुलांनी मला त्यांच्या जवळ ठेवणास नकार दिला. त्या क्षणी निर्णय घेतला आता कधीच दोघाच्या दारात उभ राहायचं नाही. माझा पैसा होता. तो सगळा मी या वृद्धाश्रमाला दान दिला. तिथली लोकं माझी झाली आणि मी हळूहळू त्यांची. तिथे आलेली बरीच माणसे.. त्यांचं दुःख तर एवढं मोठ आहे की त्यांच्या पुढे आपलं दुःख आपल्याला कमीच वाटायला लागतं. अहो आयुष्य आपलं आहे. आपण कस जगायचं ते आपण ठरवायच. ते असं सपंवून कस चालेल.?? नाही का??"
साधनाच्या बोलण्याने रघुनाथला आयुष्याची नवी वाट मिळाली होती. आता रात्र होऊ लागली होती. आकाश्यात तारे दिसू लागले होते. रघुनाथ ने नव्या आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा साधनाच्या जोडीने नव्याने पाऊल टाकलं आणि त्यांच्या सोबतीला रघुनाथ च्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणून चंद्रही त्याच्या बरोबर चालू लागला..!!