छत्रपती शाहु महाराज...
छत्रपती शाहु महाराज...
आदरणीय यशवंतराव चव्हाण हे शाहु महाराजांविषयी बोलतात..
"सत्ताधारी हा असावा लागतो गांजलेल्यांना, पिडीतांना
तो अपील कोर्टासारखा वाटावा.आणि कर्तृत्ववानांना तो त्यांचा आधार वाटावा.शाहु महाराज तसेच होते.आणि म्हणून ते एक केंद्रबिंदू बनले होते.लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात. त्याचप्रमाणे. लोकं त्यांच्याकडे धाव घेत. राजर्षी शाहू महाराज केवळ वारसाहक्काने राजे नव्हते.ते लोकांचे राजे होते."
इतिहास काळात जी थोर माणसं होऊन गेलीत.त्या ऐतिहासिक थोर पुरुषांमधील राजर्षी शाहू महाराज हे थोर लोकनेते होते. समाजाला मानवी समान संधीचे मुलभुत हक्क मिळवून देणारे ते थोर राष्ट्रपुरुष होते.
शाहु महाराजांनी शोषित,दलित व सामान्य जनतेच्या उदारार्थ केलेले कार्य आजच्या सरकारला सुद्धा मार्गदर्शक ठरणारे आहे.
शाहु महाराजांचा जन्म २६ जुनं इ.सन. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला.त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव,आईचे नाव राधाबाई होते.कोल्हापुर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि शाहु हे नाव ठेवले. एप्रिल २ इ.स. १८९४ ला त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला.
दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा, लोकनायक बनला.
दुर्दम्य इच्छाशक्ती च्या बळावर शाहु महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या.ध्येयधोरणे आखुन त्यांनी विकासासाठी सत्ता राबवली. कोल्हापूर संस्थानात सक्तीचा मोफत शिक्षण कायदा राबवला.एवढेच नाही तर ५००ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मिती केली. एवढेच नाही तर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना प्रतीमहा १ रुपया दंड आकारण्याची
कायदेशीर तरतूद केली. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.
अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सवर्ण व अस्पृश्य अशा वेगवेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धती १९१९ मध्ये बंद केली.गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या,तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम राबविले.
त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह घडवून आणले.
ते कलासक्त होते.आपल्या राज्यातील कलाकारांना ते राजाश्रय देत असत.राज्यातील शेतकरी,शेतमजुरांची ते काळजी घेत. शेतकऱ्यांसाठी त्या काळात त्यांनी राधानगरी धरण बांधुन शेती विकासाला चालना दिली.
शेतमाल खरेदी विक्री साठी मार्केट यार्ड तयार केले.
राजर्षी शाहू महाराज म्हणजे आरक्षण देणारा पहिला राजा,कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांड यावर प्रहार करणारा राजा. सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.
राजर्षी शाहू महाराज हे काळापलीकडचा राजा, राजकीय स्वातंत्र्या पेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला महत्व देणारा राजा.लोकांच्या मनातला लोकराजा असणार शाहु आणि त्यांचे कार्य आभाळाएवढे मोठे आहे.
शाहु महाराजांना जाऊन शंभर वर्षे उलटत असले तरी
त्यांनी मांडलेले विचार आजही आदर्शवादी ठरतात.
शाहु महाराजांचे हे स्मृती शताब्दी वर्ष या महासूर्याला आणि त्यांच्या महान कार्याला स्मरणात ठेवुया आणि त्यांना विनम्र अभिवादन करु या..