भारत देश महान
भारत देश महान
विविधतेने नटलेला भारत माझा देश आहे. पौराणिक कथेनुसार भरत राजाच्या नावावरून भारत असे नाव मिळाले असे म्हटले जाते. इंग्रजीत माझ्या देशाला इंडिया असे म्हणतात तर या देशात हिंदू धर्मीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे हिंदुस्थान असे ही म्हटले जाते. जगातील सर्वात मोठी लोकशाही या भारत देशात नांदते. येथे हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी असे विविध धर्मियांचे लोकं एकत्र राहतात. आपले सण व समारंभ एकत्रित साजरा करतात. जगाच्या पाठीवर भारत असा एकच देश आहे ज्याठिकाणी विविध धर्माचे, पंथाचे व विविध भाषा बोलणारे लोकं असून देखील एकदिलाने राहतात. समाजात तेढ निर्माण करून देशाची एकता मोडीत काढण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाला आहे मात्र येथील समजुतदार जनतेने त्यांच्या साऱ्या आशा-आकांक्षा धुळीस मिसळविल्या आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांकडून देशावर हल्ले देखील करण्यात आले पण ते हल्ले ही परतवण्यात येथील जनतेला व सैनिकाला यश मिळाले म्हणून तर आजही भारत देश एकतेच्या धाग्यात सदैव टिकून आहे. फार पूर्वी भारत देशातून सोन्याचा धूर निघत होता म्हणून यास सोने की चिडीया असे म्हटले जात होते, असे येथील वयोवृद्ध लोकं म्हणतात. परंतु याच सोने की चिडीयाला इंग्रजांची नजर लागली. विविध नैसर्गिक साधनसामग्रीने नटलेल्या भारताचा त्यांनी आपल्या देश विकासासाठी वापर केला. अज्ञानात असलेल्या भारताला इंग्रजांनी गुलामगिरीच्या साखळदंडात कैद केले. येथील लोकांना काही गोष्टीचे आमिष दाखवून त्यांनी राज्य केले. एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यांनी भारतावर राज्य केले आणि येथील नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून घेतला.
अनेक क्रांतिकारक, महात्मे आणि शूरवीरांचा बळी गेल्यानंतर भारत देश 15 ऑगस्ट1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू लाभले. त्यांच्यासमोर अज्ञान, दारिद्र्य, गरिबी, बेरोजगारी आणि निरक्षरता असे अनेक प्रश्न तोंड वासून उभे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना तयार केली ज्याच्या बळावर भारत देशाची पुढील प्रगती आणि विकासाची गती ठरली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन 1956 साली भाषावार प्रांतरचनेनुसार घटकराज्ये निर्माण करण्यात आले ज्यामुळे देशाचा विकास साधणे सोपे झाले. आजमितीला भारतात 28 घटकराज्ये असून 08 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारत देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगा असून त्यामुळे आम्हांला नेहमीच प्रेरणा मिळते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे जन गण मन हे आमचे राष्ट्रगीत आहे. कोणत्याही शासकीय कामाची सुरुवात करतांना राष्ट्रगीत म्हटल्याशिवाय कार्यक्रमास प्रारंभ होत नाही. गेल्या काही वर्षांपासून सिनेमागृहात देखील चित्रपटाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच होते. जगातल्या सात आश्चर्यात गणले जाणारे ताजमहल भारतातील आग्रा याठिकाणी आहे. सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री बालाजी मंदीर तामिळनाडूतील तिरुपती येथे आहे. विदेशातील अनेक अभ्यासक भारतातील खजुराहो, अजिंठा, वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना अभ्यास करण्यासाठी भेटी देतात.
भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून येथील एक तृतीयांश जनता ग्रामीण भागात राहून शेतीच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करीत असतो. गेल्या 75 वर्षात भारताने शेतीसोबत इतर व्यवसायात देखील प्रगती साधली आहे. अनेक कारखाने उभे करून उद्योगधंदे वाढविली आहेत. त्यामुळे आज भारत देश एक विकसनशील देशाच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. उद्योगपती रतन टाटा, धीरूभाई अंबानी यांच्यामुळे उद्योग क्षेत्रात भारताची वेगळी ओळख आहे. नैसर्गिक खनिज संपत्ती, वन्य संपत्ती आणि सागरी संपत्ती विपुल प्रमाणात असल्याकारणाने अनेक देश भारताकडे सहकारी वृत्तीने पाहत असतात. भारताला 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. येथील लोकांची भाषा ववेगवेगळी असली तरी भारताची मुख्य भाषा ही हिंदी आहे. मातृभाषेला प्रथम भाषेचे स्थान तर द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा वापर केला जातो. हिंदीची लिपी देवनागरी आहे. इंग्रज लोकांनी येथील लोकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान दिल्यामुळे ही भाषा देखील उत्तम प्रकारे बोलली जाते व शालेय अभ्यासक्रमात त्यास तृतीय भाषेचे स्थान देण्यात आले. तसं पाहिलं तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे मात्र भारताने क्रिकेट खेळात खूप मोठे नाव कमावले आहे. क्रिकेट जगतात आज ही कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, विराट कोहली आणि मिताली राज यांचे नाव आदराने घेतले जाते. अंतराळ क्षेत्रात देखील राकेश शर्मा, कल्पना चावला व सुनीता विलियम्स यांनी भरीव कामगिरी केली आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताचे कार्य अभिमानस्पद असेच आहे. भारतातील दीडशे कोटी जनतेची जीवाची काळजी करणारे आमचे सैनिक आम्ही भारतीय कदापि विसरणार नाही. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांचा नारा जय जवान जय किसान प्रत्येकाच्या ओठावर असते. त्यात एकविसाव्या शतकात जय तंत्रज्ञानचा नारा त्यात समाविष्ट झाला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील भारत मागे नाही. एकूणच भारत माझा देश असल्याचा आणि मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे.
जय हिंद .... जय भारत ...!