अतृप्त प्रेम
अतृप्त प्रेम


प्रेम हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य अंग असतो. साधू संत सोडले तर प्रत्येकाने कुणावर तरी प्रेम केलेले आहे. प्रेम म्हणजे भावनिक विश्वास. परिणाम सहन करण्याचे तयारी ठेवणे. त्यात माणूस आपल्या कर्तुत्व व शिक्षण शून्य समजत असतो. असेच मी डी.एड ला असताना मुंबई शहरात राहत होतो. राहण्याचा ठिकाणा नाही. जेवायचे वांदे. फुटपाथवरचे जीवन. माझ्याकडे प्रवासालाही पैसे नसायचे. त्या काळात मी कॉलेजला डब्बा नेत नव्हतो. तेवढीमाझी परिस्थिती नव्हती.
त्याच काळात माझे एका कॉलेजातील मैत्रिणीसोबत ओळख झाली. ती कधी कधी मला तिच्या जेवणाच्या डब्यातुन मला भाकरी व कालवण आणायची. पण आमची एका ठिकाणी भेट व्हायची. तिथेच ती दोन चपात्या व भाजी द्यायची पण कॉलेज मधे कुणालाही न सांगता ह्या अटीवर. तिला माझ्या परिस्थितीची कीव यायची.त्यातून आम्ही इतके भावनिक झालो की आम्हाला रात्र कधी संपेल आणि दिवस कधी उजाडेल असे व्हायचे. तिचाही तेवढा प्रतिसाद असायचा. नंतर ती माझ्या पोटाची काळजी घेत असल्याने मी तिला लग्नाची विचारणा केली. तिला ह्या शब्दाने खूप आनंद झाला होता. पण दोघांमध्ये जात आडवी येत होती. तरी सुद्धा तिचा होकार होता. हे सर्व द्वितीय वर्षापर्यंत चालले. परीक्षा झाल्यानंतर आम्ही निर्णय पक्का केला होता.
पण ती शिकत असतानाच तिचे आत्याच्या मुलाबरोबर लग्नाचे पक्के ठरले. तिने सर्व मला सांगितले देखील. तिने पळून जाण्याचा मार्गही मला सांगितला. पण मला माझी गरीबी समोर दिसत होती. पोलिस स्टेशन, कोर्ट दिसत होते. मला त्या भानगडी नको होत्या .तिला तिच्या वडिलांच्या विचारांचे समर्थन करायला लावले. तिच्या वडिलांना होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली.वडिलाना होणाऱ्या दुःखाची जाणीव करून दिली. जे करायचे ते एकमेकांच्या परवानगीनेच असी माझी भूमिका होती.तिला लग्न करण्याची परवानगी ही दिली होती. तिच्या लग्नात मी आवर्जून उपस्थित होतो.आता ती सुखात नांदत आहे. मी ही माझ्या परिवारात सुखात आहे.तिही शिक्षिका आहे मीही शिक्षक आहे;पण आदराने आम्ही दोघांच्या सुख दुःखात सामिल असतो.पण जुन्या प्रेमाच्या, विश्वासाच्या आठवणी अजूनही तशाच आहेत.