अनामिक भीती - भाग २
अनामिक भीती - भाग २
मनात तोच न्यूनगंड घेऊन, अनामिक भीती घेऊन आज सुरभीने कॉलेज मध्ये पाऊल ठेवले... मनात असणारी भीती, कमी असलेला आत्मविश्वास यामुळे ती आतून थरथरत होती...
पहिल्याच दिवशी स्वतःची ओळख आणि स्वतः मध्ये असलेला कलागुण सादर करायला सांगितल गेले, कॊणी गाणे म्हणत होते, कॊणी जोक सांगत होते... सुरभी मात्र घाबरून गेली होती... मी काही करू शकते हा विश्वास तिला नव्हता.. आता इथे पण सर्व हसतील मला, नाव ठेवतील, मी काय करू? घाम आला तिला.. शेवटी तिने ठरवले, आज आपण नाटक करायचे.. खूप इच्छा असून सुद्धा वडलांच्या दडपणामुळे अन् गावात राहायला असल्यामुळे तिला स्टेज असे कधी मिळाले नव्हते.. जिद्दीने तिने मोठा श्वास घेतला.. डोळे बंद केले.. अन् स्वतःला शांत केले.. ही वेळ अशीच होती की हायपर होऊन काही उपयोग नव्हता.. तिच्या मनातल्या त्या अनामिक भीतीला बाजूला सारून तिने मोठ्या आत्मविश्वासाने खणखणीत आवाजात स्वतःची ओळख करून दिली.. अन् नाटकसुद्धा केले.. सुरभीचे नाटक संपेपर्यत अख्खा क्लास एकदम शांत होता.. मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.. नाटक संपताच जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले..
तिच्याकडे असलेली अभिनयाची कला जी तिने कालपर्यंत वाटणा-या अनामिक भीतीमुळे कधी सादर केलीच नव्हती... त्यामुळे तिला सुद्धा या सर्वच गोष्टींचे अप्रुप वाटले.. अन् स्वतःचं कौतुक सुद्धा.. खूप खुश होती ती.. विचारात हरवली.. तेवढ्यात रीसेसची घंटा झाली अन् ती भानावर आली... थोड्या वेळात सर्वांनी तिच्या भोवती गलका केला... प्रत्येक जण तिच्या सोबत मैत्री करून घ्यायला स्वतःहून पुढे येत होता.. आतापर्यंत सर्वानी तिला तिच्या रंगावरून, राहणीमानावरुन हिणवले होते.. असे तिचे कौतुक कधी झाले नव्हते.. आज पहिल्यांदा तिला खूप छान वाट्त होते.. थोड्या अंशाने तरी तिच्या मनातील न्युनगंड कमी झाला होता..
कॉलेजमध्ये संस्कॄती नावाचे एक दालन होते, वेगवेगळ्या कला असणाऱ्या मुलांसाठी असा तो कक्ष होता.. कलेची आवड असणारे काही शिक्षक त्याचे नेतॄत्व करायचे.. तिला हे सर्व नवीन होते, मनात असलेली भीती तिला परत आड येत होती.. पण तिच्या त्या अफाट अभिनयामुळे तिला न विचारता तिचे नाव एन्ट्री करून घेतले गेले. शिक्षक वर्गापुढे काय बोलणार म्हणून सुरभी गप्प बसली.. हळूहळू या संस्कॄती ग्रुपमुळे तिच्या मधील बऱ्याच कला गुणांना वाव मिळाला.. कॉलेजमध्ये डान्स, नाटक या साऱ्यात तिला बक्षिस मिळत गेली.. हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला..
पण तिच्या घरात मात्र या गोष्टींना अगदी तुच्छ लेखले जाई... सुरभी घरात गप्प असली तरी तिच्या मनात खूप काही चालू असायचे.. बकेट लिस्ट तिच्या मनात तयार असायची.. कधी तरी माझी ही लिस्ट नक्की पूर्ण होईल असा तिला विश्वास वाट्त होता.. तो दिवसेंदिवस वाढत होता... आत्मविश्वास वाढला तसे ती अनामिक भीती कमी होत गेली...
तिच्या गुणांनी तिचे कर्तॄत्व उजळून निघाल होते.. तिच्या सावळ्या रंगामुळे आतापर्यंत कमी लेखणारे मित्र-मैत्रिणी तिचे कौतुक करू लागले.. पण घरात अजून काही फरक नव्हता.. त्या रंगावरून बोलणारे नातेवाईक मात्र अजून तोंडसुख घेत होते.. जखमेवर मीठ चोळत होते.. नुसते गुण असून काय उपयोग? लग्नासाठी रंग बघितला जातो...
बाबा खूप टेन्शनमध्ये असायचे, आईच काही चालत नसे, सुरभीला पुढे शिकायच होते, नोकरी करायची होती.. पण, बाबांच्यापुढे तिचे काही चालत नसे.. बाबा सतत उद्याचा विचार करायचे? लग्न कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहायची.. पण या उद्याचा विषय निघाला की तिच्या मनात परत एकदा उभी राहिली एक अनामिक भीती....
आता माझे येणारे आयुष्य कसे असेल? ही येणारी वेळ माझ्यासाठी चांगली असेल का?
(क्रमश:)