अबोल प्रीत!
अबोल प्रीत!
स्वरा ऑफिसमधे आली आणि तिला सरांची बदली परत त्यांच्याच आधीच्या जुन्या ब्रांचला, म्हणजे जिथून ते आले होते त्या ठिकाणी परत झाली हे समजले. इतरांसाठी ही बातमी फक्त एक चर्चेचा नवा विषय होती पण स्वराला त्यामागचे काही वेगळे कारण असावे अशी दाट शंका होती...शंका कसली मनोमन खात्रीच म्हणा ना! कुठेतरी तिच्या मनात अपराधी पणाची भावना येताना तिला जाणवली आणि म्हणून मग तिने सरळ सरांच्या केबीन मधे जाऊन त्यांच्याशी बोलायचे ठरवले....
"प्रेम करणं इतकं सोपं वाटत का सर तूम्हाला? तुम्ही तुमचे मन आणि तुमच्या मनात असलेल्या माझ्या विषयीच्या हळूवार प्रेमळ भावना व्यक्त केल्या. ऐकून छान वाटले...जगात कुणाला आवडणार नाही प्रेम मिळत असेल तर? तरीही मी काही विचार केला आणि माझे मत तूम्हाला सांगितले. मी तूम्हाला नकार दिल्यावर, तुमच्या प्रेमाचा स्विकार करु शकत नाही म्हटल्यावर तुम्ही माझी बदली करायची दुसरीकडे कुठेतरी करायची होती ना!....माझा राग स्वत:वर का काढला?आणि स्वत:ला त्रास का करुन घेतलात तुम्ही? तुम्ही कशाला ब्रांच बदलून घेतली तुमची? तूम्हाला घरी लक्ष देता यावे यासाठीच तुम्ही ही तुमच्या घराजवळची ब्रांच मागून घेतली होती ना? तरी देखील एका आठवडाभरात माझा नकार आल्याने लगेच जुन्या ठिकाणी परत जायला निघालात? मला खूप अपराधी असल्यासारखे वाटतेय."
इतका वेळ शांतपणे ऐकून घेत असलेले सर स्वराशी संवाद साधून तिला काही समजावता येईल का या विचारात तिच्याकडे पाहत म्हणाले... "स्वरा,यात तुला अपराधी वाटून घेण्याची काहीच गरज नाही.तू नकार दिलास म्हणून मी चाललोय असे नव्हे तर तुला मिळवण्यासाठी हे करत आहे. तुझी बदली करुन तुला त्रास द्यायचा नव्हता. तू तुझ्या इमेजला खुप जपतेस हे मला समजले. तू मला नकार देण्याचे कारणही मी समजू शकतो. तुझ्याघरी प्रेम विवाहाला मंजुरी नाही म्हणून मी तुला लग्नाबद्दल विचारल्यावर तू नकार दिला असशील हे कळाले .मला तू आवडली आणि तुझ्याशी लग्नं करावे अशी माझी ईच्छा आहे म्हणूनच त्यावर उपाय म्हणून मी परत जुन्या ब्रांचमधे जातोय....जेणेकरुन माझ्या घरच्यांना तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्यांशी रीतसर बोलुन तुझा हात मागता येईल. मोठ्यांकरवी अशी रीतसरमागणी घालता आली की मग तर कुणाचा विरोध नसेल ना आपल्या लग्नाला? अर्थात तुझी संमती आहे यासाठी आणि तुझा होकार गृहीत धरुन मी हे ठरवले आहे. तुला कुणी दुसरे आवडत असेल किंवा मी पसंत नसेल तर आधीच सांग मला!"
स्वराला स्वत:चा गैरसमज झाला याचे वाईट वाटत होते. मनोमन ती सुखावली देखील होती...तिने लग्नासाठी मना पासून तिची संमती देऊन टाकली....
"मनापासून प्रेम करणारा जोडीदार लाभत असेल तर मला आणखी काय हवे. एक नाते जोडताना आई वडिलांच्या इच्छेचा मान ठेवावा म्हणून मी माघार घेत होते. पण आता सगळे त्यांना सांगून आणि त्यांच्या आशिवार्दाने होणार असेल तर माझा होकार आहे."
हे बोलून स्वरा तिच्या डेस्कवर पोहचली... काही दिवसांचा दुरावा असला तरी शेवट गोड होणार होता...ज्याची स्वप्ने ती रंगवत होती.