आठवणीतले शिक्षक
आठवणीतले शिक्षक
आठवणीतले शिक्षक
...
मुकुंद घनश्याम कुलकर्णी.
(चंपावती हायस्कूल, बीड चे माजी मुख्याध्यापक)
व्यक्तिमत्त्वाचे ठसें आता नामशेष झालेत. पाय धर ण्यासारखी व्यक्तिमत्वें जेव्हा नसतात, तेव्हा आठवणींचाच आधार घ्यावा लागतो. काळ माणसें हिरावून घेऊ शकतो पण आठवणी नाही. आठवणीचं बोट हा आधारच असतो,लहानपणी चालण्यासाठी बोटाचा आधार लागतो. मोठेपणी आयुष्य सुसह्य करण्यासाठी आठवणींचं बोट धरावंच लागतं. आठवण आहे म्हणून व्यक्तीमत्त्वाची साठवण आहे. नांवात केवळ व्यक्ती नाही,व्यक्तिमत्व असतं. एकच नांव अनेकांचं असतं पण व्यक्तिमत्वंच नावांला ओळख देतं. असंच एक व्यक्तिमत्त्व.
मु.घ.गुरुजी, मु.घ. सर या नावाने ओळखले जाणारे.
व्रतस्थ, शिस्तबद्ध आयुष्य जगणारे, मुल्यांची वाट न सोडणारे, अशी माणसे होती यावर विश्वास बसणे कठीण.
काही माणसे भुकेने मरतात पण विचारांची शिदोरी असेल तर मरण जवळही येत नाही,शिदोरी प्रेरणा देते, जगण्याला बळ देते.
चरित्रवान व्यक्तींचंआयुष्य आचरणात आणलं तर वेगळे मूल्यशिक्षण द्यायची गरज भासणार नाही. आम्ही माणसेच ओळखत नाही ही आजची शोकांतिका. काही माणसे विचार देतात,काही आचरण शिकवतात.
शिक्षकाचे काम केवळ अध्यापन करणे नसून विद्यार्थ्यांना विचार देणं, दिशा दाखवण, आचरण देणं हे होय. Values are not taught online. Values are caught offline. मूल्य शिकवता येत नाहीत. मूल्यांचे संवर्धन
होतं चांगल्या सहवासामुळे.
आठवणीतले शिक्षक विसरता येत नाहीत. मु.घ.चे चाहते विद्यार्थी आज मोठ्या पदावर आहेत, पण ते जेव्हा आठवणीत रमतात तेव्हा सरांनी आम्हाला काय दिलं व त्यांच्यामुळेच आज आम्ही यशस्वी आहोत ही भावना व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत.
मु.घ.एक चालतं, बोलतं विद्यापीठ.चांगली माणसे विचारांचा ठेवा ठेवूनजातात. जुन्या काळातल्या घटनांच, माहितीचच, ज्ञानाचं भांडारच जणू
जुन्या काळातलं गुगल.संस्कार पेरणारा अवलिया.एक हुशार बागायती पिढी तयार करणारा, हाडाचा शिक्षक.विशिष्ट ध्येयाने जगणारा,तत्वाने जगणारा.
अशी माणसें आता आणायची कोठून? आता फक्त ती आठवायची.
कविता ही नुसती शिकवायची नसते, तर आस्वादायची गोष्ट असते, हे कविता शिकवताना ते स्वतः गाऊन दाखवायचे, स्वतःपेटी वाजवायचे.
संस्कृतचे ज्ञान,अफाटवाचन,गायन, अध्यापन,प्रशासन,राजकारण,इतिहास,विज्ञान,अध्यात्म यांच ते माहिती केंद्र होते. आयुष्याच्याा शेवटच्या टप्प्यावर बंगाली साहित्य वाचायचे म्हणून बंगाली शिकण्याचा प्रयत्न करणं. हक्कांंच्या माणसांना दुर्मिळ पुस्तके आणण्यास सांगणं.चित्रपट कसा पहायचा,पत्रलेखन,सुबक हस्ताक्षर,कला, छंद,त्यांच्या जवळ काय न्हवतं ?
असे शिक्षक आज का नाहीत?
ते असे होते,तर त्यांना घडवणारे कसे असतील? मेंदूचं प्रत्यारोपण करता येत नाही,पण संस्काराच प्रत्यारोपण करता येतं,ते त्यांनी केलंय. त्यांचे विद्यार्थीही ते करतीलच.
कोणतीही म्हण त्यांना लागू पडते.साधी राहणी,उच्च विचारसरणी पासून, मरावे परी किर्ति रुपी उरावे पर्यंत.
माणसे जातात, पण आठवणी पेरून जातात.आठवणीचे वृक्षच मायेची सावली देतात, जिवन सुसह्य करतात.जिवंत असतानाच काही माणसे इतिहास निर्माण करतात,पुढच्या पिढीसाठी हमरस्ता तयार करतात.असा शिक्षक होणे नाही याचेच शल्य आहे.सांगा मुकुंद असा कोणी पहिला का ?
अब्राहम लिंकन ने मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रातील सर्व गोष्टी मुलांना त्यांनीअधिच शिकवल्या.
पुस्तकातील प्रतिज्ञा त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुस्तकातून मस्तकात भिनवली. मुल्ये रुजवणारे शिक्षक संपले.मुलांना शिकवणारे शिक्षक आहेत.
मुलांना शिकू देणारे शिक्षक कुठे आहेत?शिक्षक गूगल झाले आहेत,माहितीच भांडार, माहितीचा माराकरणारे, तो ही एकतर्फी.गुरुकुल पद्धती जाऊन कुलगुरू पद्धती आली. आचार जाऊन भ्रष्ट आचार शिष्टाचार झाला. झिजलेल्या चपलेवरून चितळे मास्तर ओळखू यायचे.आता टाचा झिजलेले चितळे मास्तर शोधायचे कुठे? पण मु.घ. तर शोधता येतात.
एक व्यक्ती एकाच वेळी चांगले वडील, आजोबा,शिक्षक,आस्वा दक,समीक्षक,वाचक,लेखक असं बरच काही असू शकतो,याचे उदाहरण म्हणजे मु.घ.
आपण गुरूच्या मनांत, मर्जीत आहोत ही भावना फार सुखावह असते,आणि तीही एका शांत,सुस्वभावी,विद्वान, सुसंस्कृत व निरपेक्ष व्यक्तीच्या मनांत, ही विद्यार्थ्यांच्या साठी फार मोठी पर्वणी आहे.माणसे व्यक्त होतात तेव्हां फार आतून व्यक्त होतात.आपल्या नकळत आपले काही आदर्श असतात. त्यात मु.घ. वरच्या स्थानावर आहेत.आपण कुणासाठी तरी दखलपात्र आहोत हीच जगण्याची शिदोरी असते. माणसात देव शोधता आला की, मंदिर बंद असलं तरी चालतं.