आंधळी भूतदया
आंधळी भूतदया
रवी जुन्नरमधील प्रथितयश शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला अत्यंत गुणी आणि हुशार मुलगा. लहानपणापासूनच घरात सर्व काही रेलचेल, नोकर-चाकारांचा राबता. मनात आणेल ती गोष्ट करू शकेल असे वातावरण. तरीही आबांनी म्हणजेच रवीच्या वडिलांनी त्याला काहीही कमी पडू दिले नाही पण काही झाले तरी तू कॉम्पुटर इंजिनिअर व्हायचेच असे पक्के सांगितले आणि रवि हि हुशार असल्याने तसे घडले सुध्दा. रवि मोठा इंजिनीअर झाला. त्याला मोठ्या पगाराची नोकरी अन “रेवाच्या” रूपाने छान छोकरीहि मिळाली. संसार कसा छान सुरु झाला...
रविचे संपूर्ण कुटुंब लेण्याद्रीच्या गिरीजात्मकाचे भक्त. कितीही काम असले तरी आठवड्यातून काही दिवस बाप्पाच्या दर्शनाला जायचे म्हणजे जायचे हा सर्वांचा शिरस्ता. रविच्या लग्नानंतर सुध्दा हा शिरस्ता तसाच सुरु राहिला. “रेवा” शिकलेली असली तरी धार्मिकही होती. बाप्पाच्या दर्शनाला जायला तिचीही कधीच ना नसायची...
लेण्याद्रीच्या पायऱ्या चढतांना तिथली झाडे, डोंगर, त्यावरील हिरवी नक्षी सारे काही विलोभनीय आहे. माणूस पायऱ्या चढताना लागलेला दम निसर्ग सौदर्य पाहून लगेच विसरून जातो. रवी, रेवा आणि कुटुंबीय तिथे वारंवार जात असल्याने त्या परिसरातील माकडे, त्यांची पूर्ण प्रजा रवीची लहानपणापासूनच ओळखीची होती. रविच्या लहानपणापासूनच रवी त्यांना वेफर्स, केळी, बिस्किटे असे काही-बाही दिल्याशिवाय पुढे जात नसे. आणि आता तर त्या माकडांच्या प्रजेला रवी आणि कुटुंबियांची इतकी सवय झाली होती कि रवी फक्त पिशवी दाखवायचा. माकडांची प्रजा पटापट डोंगर उतरून त्याच्या जवळ येऊन पिशवीतून खाऊ घेऊन जायची. रवी परत पायऱ्या उतरायला लागला कि परत माकड प्रजा हजर असे खुपदा झाले...
अशीच काही वर्षे लोटली. रविचे आई बाबा म्हणायला लागले, रवी घरात पाळणा हलत नाही. आपल्या बाप्पाला साकड घाल बाबा. घरात बाळ असलं तर घराला आनंद हाय | आता रवी आणि रेवा यांनी बाप्पाला नवस केला. आम्ही रोज तुझ्या दर्शनाला येऊ, घरात पाळणा हळू दे. रोज बाप्पाच्या दर्शनाला जायचं आणि माकडाच्या पिल्लांना भरपूर खाऊ घालायचं. हळू हळू माकडांची पिल्ले धष्टपुष्ट झाली. त्यांना माहिती होते कि रवी आणि रेवा आले कि आपल्याला खाऊ मिळणार त्यामुळे पिल्लांनी इकडे तिकडे फिरणे, झाडाच्या फांद्यांवर खेळणे सगळे बंद केले. स्वतःचे खाद्य स्वतः मिळवायचे त्यासाठी कितीही लांब चालावे लागेल, पळावे लागेल हे त्यांच्या मेंदूचे सेटिंग पूर्णपणे बंद झाले. हळू हळू माणसे आणि त्यांच्या जवळच्या खाऊच्या पिशव्या हेच त्या जीवांचे आयुष्य झाले. माणसाजवळच्या पिशव्या पळवणे हेच त्या माकडांचे उदिष्ट बनले. अनेक लोकांना त्यामुळे इजा झाली. काही माणसे पडली, जखमी झाली, कोणाची पर्स घेऊन माकडे पाळली, कोणाचे नुकसान झाले. तरीही माणूसही प्राणीच. स्वतःच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करताना प्रगती करताना पर्यावरणातील ह्या महत्वाच्या जीवांच्या आयुष्याशी खेळणे, त्यांचा होणारा त्रास ह्यात माणसाला मज्जा वाटायला लागली. सहलीला येणारी मुले, अष्टविनायक दर्शनाला येणाऱ्या व्यक्ती ह्याच्यामुळे माकडांच्या या सवयी वाढतच गेल्या. आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोफाशीपण झाली आहेत. त्यांना ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे मुश्कील झाले आहे...
मध्यंतरीच्या काळात बाप्पांचा नवस फळाला आला आणि रेवा गरोदर राहिली. त्यानंतर पुढचे काही महिने रविचे पूर्ण कुटुंब रेवाचे हवे नको ते बघण्यात व्यस्त झाले आणि रवी, रेवा चे बाप्पांचे दर्शन घेणे बंद झाले...
यथावकाश रेवा आणि रविच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा आनंद आला. रेवा बाळंत झाली. मुलगा झाला. बाळ सव्वा महिन्याचा झाल्यावर आज पुन्हा सर्वांनी लेण्याद्री डोंगरावर जाऊन बाळाला बाप्पांच्या पायाशी ठेवावे असे ठरवले. रवीने भरपूर खाऊ घेतला. रेवा बाळाला घेऊन असे सर्वजन डोंगर चढू लागले...
दरम्यानच्या काळात माकडांची संख्याही खूप वाढली होती आणि त्यांच्यातील स्पर्धाही. आज तर रवीने २५ पिशव्या खाऊ, आणि इतरही बरेचसे अन्न पदार्थ माकडांना देण्यासाठी आणले होते...
रवी आणि रेवाने डोंगर चढायला सुरुवात केली तशी त्यांना ओळखणारी माकडे सवयीने त्यांच्या जवळ आली आणि त्यांची पिल्लेही खाऊ ओढाताण करून घेऊन पळू लागली. मात्र रवी जवळचा भरपूर खाऊ पाहून २५-३० माकडांचा दुसरा जत्था त्याच्या जवळ आला आणि त्यांची पिल्लेही. मग सुरु झाले धुमशान. माकडा माकडांची प्रचंड मारामारी, खाऊसाठी ओढ-ताण, जोरात पळणे, अंगावर धावून येणे. रेवा खूप घाबरली, रडायला लागली. कधी नव्हे ते आज तिला खूप भीती वाटायला लागली. बाळाच्या दुधाच्या बाटलीची आणि पाण्याची पिशवीही माकडांनी पळवली तेव्हा मात्र रवी काठी घेऊन माकडांवर धावला. त्याचे ते अवसान पाहून माकडे सगळीकडे धूमठोकून पळू लागली. मात्र एक पिल्लू कावरे-बावरे होऊन इकडे तिकडे पाळायला बघत होते. झाडावरून उडी मारण्याचा पर्यंत करत होते. जीवाच्या आकांताने आवाज देत होते. घाबरून पिल्लाने मोठ्या झाडावरून डोंगरावर उडी मारली परंतु फोफाश्या झालेल्या त्या माकडीनीच्या पिल्लाची उडी डोंगरावर पोहोचलीच नाही तर मधल्या मोठ्या खोल दरीत पिल्लू खाली पडले कारण त्याला फांद्यांवरून स्वतःला बॅलन्सकरत पाळायचा अनुभव नव्हता...
एका बाळाला छान पांघरुणात झाकून बाप्पा जवळ नेले जात होते आणि एका बाळाला दरीत कुठे शोधू म्हणून माकडीणीचे काहूर चालले होते....
अपराध कोणाचा होता? पर्यावरण म्हणजे सभोवतालचा परिसर, निसर्ग, त्यातील प्राणी, पक्षी. “जीवो जीवस्य जीवनम्” या तत्वावर प्राण्यांचे जीवन चालते. मात्र मनुष्यप्राण्याने ह्या जंगलातल्या प्राण्यांना स्वतःचे अन्न खायला घालून निसर्ग नियमच मोडला. त्या प्राण्यांना विविध आजार जडले..
या घटनेने रवी वेडापिसा झाला. त्याला त्याची चूक कळून आली. रवीने आता लेण्याद्री येथे एक सामाजिक संस्था सुरु केली आहे ज्यात प्राणी, पक्ष्यांना कसे वाचवाल यासाठीचे प्रबोधन केले जाते.
प्राणी वाचवा, पक्षी जगवा – झाडे लावा, निसर्ग वाचवा | हे रविच्या संस्थेचे ब्रीदवाक्य बनले.