1972 चा दुष्काळ
1972 चा दुष्काळ
1972 हे साल महाराष्ट्राला मोठे कठीण होते. दुष्काळाने गाजवले.
पाऊसच पडला नव्हता, शेती कोरडी ठक्क होती. सरकारने जागोजागी रोजगार हमी योजना राबवली होती तसेच आमच्या गावाजवळच्या डोंगरापाशी पाझर तलावाचे काम सुरू झाले .गावातील भलेभले मालदार मंडळी देखील हतबल झाले. कोणाकडे काही उसने मागण्याची सोय नव्हती . माझ्या पायात घुंगरा चे पैंजण होते .मी जेमतेम सहा वर्षाची असेन एक दिवस आहे माझ्या पायातील पैंजण काढून घेतले मी खूप रडले मला याबाबत काही कळत नव्हते. नंतर मोठी झाल्यावर समजलं ,दुष्काळामुळे ते पैंजण देखील मोडले होते घरात दोन टाईम जेवण मिळण्यासाठी वडील पाझर तलावावर कामाला जाऊ लागले. त्यांना अशी शारीरिक कष्टाच्या कामाची सवय नव्हती ,एकाजागी शिलाई धंदा थोडीफार शेती आणि भिक्षुकी त्याच्या जीवावर आमचे कुटुंब चालले होते पण आता तलावाच्या कामावर खडी ने भरलेली घमेली उचलावी लागत होती. सर्वच अठरापगड जातीची माणसे दुष्काळाच्या कामावर जात होती .दुपारची भाकर एका जागी बसून खात होती. गावात एक मांगाचा माणूस होता तो रोज घरावरून जाताना वडिलांना आवाज द्यायचा "काका चला! वडिलांनी घरातून कोण आहे? विचारलं तर "मी मांग आहे !असं तो सांगत असे
मात्र कामावरती महार, मांग ,रामोशी या मंडळींनी वडिलांना खूप मदत केली त्यांच्याच्याने जास्त वजन उचलत नसे. वडिलांना फक्त अर्ध घमेल भरून खडी देत असायचे ,जोडी जोडीने काम करतानादेखील त्यांना मदत करायचे.
त्यावेळी रेशन वरती तांबडी ज्वारी ज्याला मिलोज्वारी असे म्हणतात ती आणि मका मिळायचा त्याची तांबडी लाल भाकरी बघून खायची इच्छा व्हायची नाही. एकदा बहिणीचा वाढदिवसाला आला तर मक्याचा रवा काढून त्याचा शिरा केला होता तसेच वडिलांना कामावरून येताना डब्यात सुकडी मिळायची म्हणजे भाजलेल्या तांदळाची व डाळी ची साखर घातलेली भुकटी. कधीतरी त्यात पण आळ्या निघायच्या असे ते 1972 चे वर्ष कसेबसे निघाले.. त्या काळात वडिलांनी घरात कधी चिडचिड केली नाही , की आदळ आपट केली नाही किंवा आम्हाला मारहाण केली नाही .उलट त्यांची विनोदबुद्धी जागृत होती ते म्हणायचे आता घरातल्या बायका असे म्हणतात
"आन मिलो सजना" सजना एक किलो मीलो घेऊन ये
त्या वयात पण मला परिस्थितीची जाणीव होते मला असं वाटायचं त्यांचं काहीतरी काम हलकं करावं म्हणून मी त्यांना आणायला अर्ध्या रस्त्यापर्यंत आणायला जात असे, व येताना त्यांचा डबा घेऊन येत असे.
त्याच काळात एकदा आईचा उपास होता बहुदा एकादशी असावी सर्वांचाच उपवास असावा घरात काही खायला नव्हते. दुपारी तीन वाजता आईचे वडील आप्पा घरी आले. येताना खजूर आणि शेंगदाणे घेऊन आले होते त्यांना जसे कळले की आपला जावई कामावर उपाशी गेला आहे. त्यांनी मला बरोबर घेतले व जेथे काम चालू होते तेथे आम्ही गेलो. वडिलांनी खजूर आणि शेंगदाणे खाल्ले ते पण उगाच थोडेसे खाल्ले व त्यावर तांब्याभर पाणी प्याले व तेवढ्यावरच आपली भूक भागवली येताना मी आणि आप्पा पोतभर काशाचा गवत घेऊन आलो. काशा म्हणजे एक प्रकारचा जाड गवताचा प्रकार त्याचा चुलीत सरपण म्हणून उपयोग केला जातो आप्पानी ते पोते डोक्यावर घेऊन आम्ही दोघे घरी आलो.
असे होते दुष्काळाचे दिवस .