सर
सर
तुला आठवले असेन का मी आज ?
आणि आठवीन का उद्या ?
जेव्हा हिंदोळ्यावर तरंगत असेल आयुष्य
आणि प्रत्येकाला सापडलेली असेल आपापली लय ...
तेव्हा आठवीन का मी ?
की मी नुसतीच राहीन
तुझ्या मनाच्या खोल गाभाऱ्यात
आठवणींच्या कुपीत !
मात्र त्यातला सुगंध दरवळेल का
तेव्हाही ?
तू कुठेतरी दूर आणि मी इथे माझ्या देशी
मात्र कुठलीतरी पुसटशी रेघ
आपल्याला जोडून आहे
आजही !
कधी कधी गर्दीत
अनोळखी चेहरा
ओळखीचा वाटून जातो
तुझ्या माझ्या क्षणांना
पुन्हा उमाळा दाटून येतो.
अशातच
एक सर
कुठूनतरी कोसळते
तुझ्या माझ्या असण्याला
गहिरा अर्थ देऊन जाते ...
तेव्हाच मी चिंब भिजून घेते
कोरडं रहाण्यासाठी
माझ्यातलं शहाणपण
वर येतं
अशा वेळेस
कुठून तरी ...