पुन्हा पाऊस पडतोय...
पुन्हा पाऊस पडतोय...
तुला माहितेय, आज पाऊस पडतोय...
तोही अखंड, विनाव्यत्यय...
सगळं कसं कोरडंठाक आहे. ही जमीन, हे भरून आलेलं आभाळ आणि हा सगळा भवतालही...
सारंच कसं अगदी कोरडं ठणठणीत...
आणि तरीही...
तरीही, मी मात्र भिजलेय...
अगदी मनसोक्त,चिंब भिजलेय...
एक क्षणभर वाटलं की तू असायला हवा होतास सोबतीला!
पण, मग वाटलं नकोच, तू नाहीएस इथे तेच छान आहे...
कारण, मग तुझ्यासोबतीनं तुझ्या आठवणींच्या पावसात नसतं रे! भिजता आलं...
तू एखाद्या सरीत न्हायला असतास आणि मी त्यात भिजण्याआधीच मला दटावलं असतंस...
'श्श... पावसात भिजायचं नाही, सर्दी होईल'...
मग राहूनच गेलं असतं माझं पावसात भिजणं...
खूप कमी वेळा तुझ्या सोबतीनं भिजता आलं मला,
आपल्या आठवणीत...
आज तू इथे माझ्याजवळ नसताना मी ह्या संधीचा फायदा उठवतेय...
तोही अगदी पुरेपूर...
माझ्या छताला मी पन्हाळी नाही लावल्यात त्या याचसाठी...
सगळ्या एकत्र येऊन त्याचं नुसतं उधासलेलं पाणीच होतं...
त्यापेक्षा या पागोळ्याच मला जास्त जवळच्या वाटतात...
माझया मनात साठलेला तू; त्या पागोळ्यातून ओघळून पुन्हा ओंजळीत येतोस...
आणि ओंजळीचा पसा होईतो त्यातून पसार होतोस...
आठवणींच्या सरी टपटपत असतात...
थेंबांच्या तुषारांनी मी सुखावत राहते...
तू सोबत नसताना तुझी सोबत अनुभवून घेते...
पण, मध्ये मध्ये गाराही पडतात बरं का!...
आपल्याच जखमांच्या...
वादांनी झालेल्या...
तुला भेटणारच नाही, नंबरही डिलीट करतो, म्हणजे इच्छाही होणार नाही...
असं म्हणत तुसडेपणा अंगावर भिरकावणाऱ्या गारा...
विध्व पक्षिणीसारखी मी त्या घायाळपणाला बुजवु पाहत असतानाच जाणवतं की,
तुझ्या प्रेमाचं बर्फ पुन्हा भुरभुरतंय...
अलवार मऊ, रेशीमस्पर्श घेऊन माझ्या अंगोपांगी झुलतयं...
मी म्हणते, ' थांब, जाऊ नकोस...
मला अशी तृषित ठेऊन जाऊ नकोस...'
तू म्हणतोस, ' आलोच मी...
जातोय कुठे? इथेच तर आहे. तुझा भवताल व्यापून उरलोय मी...
तुझ्यात थोडा...
माझ्यात थोडा...'