प्रगती झाली की अधोगती
प्रगती झाली की अधोगती
‘तो’(बदल) आला आणि आणि ‘ते’ (आपली माणसं ,एकत्रितपणा,(समाधान) गेले,
‘ती’ (वीज)आली म्हणून ‘तो’ (टीव्ही)आला...
परंतु ‘ती’(वीज) आणि तो (टीव्ही) येताच ‘ते’ (एकोपा)सर्व पुन्हा गेले.....
म्हणून म्हणतो नक्की प्रगती झाली की अधोगती झाली हेच कळेना झाले....
म्हणून थोडा भूतकाळात जाऊन डोकावेसे वाटले अणि..
चार शब्द आपल्या पुढ्यात मांडावेसे वाटले...
आठवतात ते दिवस, पुन्हा पुन्हा जगावे असे वाटतात ते दिवस...
थंडगार शेणाने सारवलेल्या अंगणातून, मस्त आकाशातील चांदण्या मोजत बसायचे...!!
आठवतात ते दिवस, दिस मावळताच तुझी भाकर माझी चटणी घेऊन अंगणात पंगत बसायची..!
थंडगार वारा, त्यात आजीच्या गोष्टींचा सहारा, कधी गवळण तर कधी भारुडांचा मारा,
टाळ मृदंगचा आवाज दूर कोपऱ्यातून निनादणारा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल कानावरी पडता मन तृप्त करून देणारा,..!!
तुझ्या माझ्या सुखाची-दुःखाची ओझरणी करून एकमेकांत साथ देणारा.. !!
सकाळी सकाळी सूर्य उगवतीस भारुड गात भारुडी येणारा...!
वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणत सूर्यनारायणाला जागं करायला..!!
सुरू व्हायची लगबग सडा मारायची, झाडून काढायची आणि आणि रानात जाण्यास शिदोरी बनविण्याची..!
राब राब राबायचं, राम राम म्हणत घरला पुन्हा पोहोचायचं ...!
सायंकाळला चहाचा घोट घेत पारावर बसायचं..
तुझं काय, माझ काय, सुखदु:खाच्या गप्पा मारायचं..!
कोणाचा तर लगीन जुळवायचं, सोयरीक जुळायची नाती जुळायची..!!
पोस्ट ऑफिस उघडे म्हणत टपाल पत्र घरोघरी पोहोचायची..
लगीन लावाया आख्ख गाव सोबत असायचं.. !!
पंगतीच्या पंगती उठवत.. मुलीस निरोप द्यायचं..
तर कोणाची तरी मुलगी वाजत गाजत गावात आणायची...!!
आता हे सर्व हरवलं ...,
आता, फोन आला मोबाईल आला, इंटरनेट आले.
दुनियेन ५ जी, ४जी स्पीड धरली....!!
माणसं क्षणात फोनवर भेटू लागली, व्हाट्सअप द्वारे सण साजरा करू लागली... !!
अहो आता तर सगळं कसं वर्चुअल झालं आहे..!!
स्मशानभूमी व्हिडिओ कॉल वरच आली...RIP म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली वाहू लागली..!!
प्रगतीच्या नावाखाली खरंच का अधोगती झाली...?.
हात जोडून सांगतो रायांनो आठवतील कधीतरी दिवस पुन्हा एकदा तुमच्या मनाला ..
लिहून पहा एक पत्र आपल्या नजिकच्यांना....
लिहून पहा एक पत आपल्या नजिकच्यांना !!