लिहिता लिहिता...
लिहिता लिहिता...
लिहिता लिहिता स्वतःमध्येच मंत्रमुग्धपणे रममाण होऊन जावेसे वाटते...
स्वतःमध्येच रममाण होता होता स्वतःमधल्याच स्वतःशी बिनधास्तपणे बोलावेसे वाटते...
स्वतःमधल्याच स्वतःची ओळख झाल्यानंतर मनाशी एक वेगळेच नाते तयार होते...
हे नाते सर्व नात्यांपेक्षा थोडे वेगळेच असते...
आपण कोण आहोत, कुठे आहोत, सर्व काही विसरून जातो क्षणार्धात...
तिथे असते स्वतःमधली स्वर्गसुंदर मनमोहक दुनिया...
येथे फक्त स्वच्छ, सुंदर, निर्मळ मनाचा असतो सहवास...
शुभ्र खळखळ वाहणाऱ्या झर्यासारखा हा शुभ्र सहवास कायम हवाहवासा वाटतो मनाला...
मनाचा मनाशी केलेला संवाद मनापासून आणि मनाप्रमाणेच असतो...
या नात्याला भय नसते कशाचे, ना खंत नसते कशाची...
हाच निरागस संवाद चालू असताना नकळतपणे आपण शिरतो मनाच्या खोल गाभाऱ्यात...
ना तिथे असते कसले टेन्शन, ना कसला राग, ना द्वेष, ना तिरस्कार...
तिथे नसते कोणत्याच भावनांची परीक्षा...
तिथे असते फक्त अन् फक्त शांतता, शांतता आणि शांतता...
हिच शांतता आवडू लागते स्वतःमधल्याच स्वतःला...
सदान् कदा तिथेच जावेसे वाटते मनाला...
म्हणूनच नेहमी लिहायला आवडते स्वतःमधल्याच स्वतःला...