कविता लिहावी वाटते...
कविता लिहावी वाटते...
कविता लिहावी वाटते....
कारण इथे शेतकऱ्याचं दुःख
कष्ट शब्दात मांडता येतं.....
फक्त सोबत असावी लागते
अनुभवाची झळ अन पोटात
उठणारी भुकेची कळ...
कविता लिहावी वाटते ....
कारण कवितेत गाळता येतात
बलात्कार, विनयभंग, छळ
अन झालेल्या वेदनांचे अश्रू
फक्त असावी लागते जाणीव
आपल्याला जन्म देणाऱ्या
आई, बहिण आणि बायकोची....
कविता लिहावी वाटते.....
कारण कवितेत दिसते मैत्री
कवितेत असतात नाती....
कवितेत अनुभवता येतो संसार
कविता ठरते दिशा आपली,
कुटुंबाची, समाजाची अन....
म्हणून कविता म्हणू का?
जगण्याचं शिक्षण देणारं विद्यापीठ?
कविता लिहावी वाटते....
कारण इथे ओढता येतात ताशेरे
सरकार आणि व्यवस्थेवर.....
अन्याय, भ्रष्टाचार, अविचार
आणि असामाजिक धोरणांवर....
आपली बुद्धी तेवढी तार्किक, मार्मिक
अन् सुपीक असायला हवी.....
कविता लिहावी वाटते......
कारण कवितेत लिहिता येतं
सुख, दुःख, जीवन अन
बरंच काही अगदी मृत्यू सुद्धा...
कवितेतून मागता येतो न्याय,
पन खंत मात्र एवढी की तो
बंदिस्त झालाय न्यायालयात.....
कविता लिहावी वाटते......
कारण कविता शिकवते
कविता घडवते, कविता जागवते
अन् कविता जगण्याचं साधन होते
वाटते कवितेने इतकं समृद्ध व्हावं
तिचा शब्दन शब्द प्रमाण ठरावं.....
