हिशोब
हिशोब
कधी नव्हं ते दुष्काळात आभाळ बरसलं,
रानातल्या पिकाला त्याने जोमात पोसलं।
पोत्यामधी धान्य भरताना चार मुठी मास चढलं,
गाडीत ईकायला नेताना परतेकाचं डोळं चमकलं।
वाटेमधी नकळत मनात हिशोब सुरू झाला,
चालू भावासंग आपुल्या पोत्यांचा ताळेबंद फिरू लागला।
अमका-अमका भाव भेटला तर चांगले पैशे व्हतील,
देणेदारांचे हिशोब व्याजासगट चुकते व्हईल।
वाटेत देवळाला नकळत जोडले गेले हात,
बराबर भाव भेटू दे, बोलला गेला नवस।
येकवीस नारळ फोडीन, गाठीतो खूनगाठ मनाशी,
फकस्त लेकरं माझी, झोपू नग देऊ उपाशी।
मार्केटमधी जाताना का कनु जीव घाबरा झाला,
आक्रीताचा अपशगुण टोचून मोकळा झाला।
बळीराजाचं नशीबच फुटकं, नको तेच घडलं,
लेकरागत मोठं करेल धान्य, मातीमोल ईकलं।
सायबाने देयल कागद पाहून त्यो मटकन बसला,
भाड्याचे बी सुटले न पैशे पाहून ढसाढसा रडला।
आठवला लगीच आस लागलेला पोरांचा चेहरा,
काय सांगू त्यांना? कशा झेलू नजरा?
कसा लावू हिशोब, कसं सुटायचं कोडं,
कधी जुळल काय माहीत, कष्टाचं अन नशीबाचं जोडं ।
सुटला आता धीर, सुटला आता ध्यास,
डोळ्यापुढे दिसू लागला आता फक्त लटकलेला फास।