लोकमान्यांची काठी
लोकमान्यांची काठी
गणेश मंडळातर्फे अकरा दिवस गणेशाची मूर्ती बसवण्यात आली होती. मनोरंजनाचे कार्यक्रमही ठेवण्यात आले होते. गणेशाची मूर्ती सिंहासनावर विराजमान होती. मंडळाची माणसे फेटे बांधून रुबाबात वावरत होती. आपलेच मंडळ सगळ्यात भारी असावे ह्या त्यामागचा हेतू. असेच दोन दिवस गेले. तिसऱ्या दिवशी आयटम साँग स्पर्धा ठेवली होती. रात्री नऊ वाजता सुरु होणार होती. सातलाच काहींनी खुर्च्या बळकावल्या होत्या. आठपर्यंत मंडप पूर्ण भरून गेला होता. नऊला निवेदकाने स्पर्धा सुरु होण्याची ललकारी दिली. डॉल्बीच्या आवाजात एकएक करून स्पर्धक आले आणि स्पर्धा रंगात आली. काही प्रेक्षक नाचत होते. काही शिट्या मारत होते. अखेर साडेअकराला स्पर्धा संपली. मंडप खाली झाला. थकूनभागून मंडळाची माणसे तिथेच झोपी गेली. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. एवढ्यात त्यांना काठीचा आवाज आला. सगळयांची नजर त्या दिशेने गेली. काळोखातून एक व्यक्ती प्रकाशाच्या झोतासह येताना दिसली...
"कोण रे तिकडे झोपायलाही देत नाही."
"माझी झोप उडवून तुम्ही शांत झोपाल."
"आम्ही तुमची झोप उडवली कोण आहेस तू"
"मला नाही ओळखलं... मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. माझ्या विचारांची तुम्ही झोप उडवली."
"आम्ही... आणि लोकमान्य तुम्ही काहीपण..."
"हो मी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. विचार केला की तुम्हाला भेटावे. तुम्ही ह्या गणेश मंडळाची माणसं ना..."
"हो आम्ही बघा ना कसा सजवला आहे मंडप आणि मूर्ती सगळ्या मंडळापेक्षा भारी ना."
"भारी... तुम्ही लोकांनी ना ह्या उत्सवाचा खेळ केलाय. आपले मंडळ सगळ्यात कसे वर येईल ह्यासाठी तुमची स्पर्धा असते. त्या विघ्नहर्त्यालासुद्धा तुम्ही ह्या शर्यतीत उतरवलं. काय चालू आहे. काही वर्षांपूर्वी मी हा उत्सव लोकांच्या एकतेसाठी आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी सुरु केला. पण तुम्ही तर त्याचा चेहराच बदलला. मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्ही ठेवता. आज तर मी दुरून सगळे पाहत होतो. आत येण्याची लाज वाटत होती. गणेशोत्सवाचा मंडप कमी मद्यालय वाटत होतं. तुम्ही त्या छोट्या पिढीला काय सांगू इच्छिता, असे त्यांना नाचवून आणि असे नाच दाखवून त्यांच्यावर काय परिणाम होणार... चांगला की वाईट... गणेश ही बुद्धीची आणि विद्येची देवता. त्याच्या विचाराचा प्रसार व्हायला नको... आज असेच कार्यक्रम आवडतात असेच तुम्ही म्हणाल. मग बदल कोणी करायचा. सगळेच जण असेच करत राहिले तर माझ्या उद्देशाचे काय होईल. ज्या उद्देशाने मी हा उत्सव सुरु केला, हा फक्त भक्तीचा उत्सव नसून विचारांचा आणि आचरणाचा उत्सव आहे. तुम्ही भावी पिढीने चांगले पाऊल टाकले तर देश घडेल नाहीतर विचार करा... येतो मी..."
टकटक... काठीचा आवाज येत राहिला. लोकमान्य दिसेनासे झाले. सगळे अवाक होऊन पाहत राहिले.