STORYMIRROR

Kavi Sagar chavan

Drama

3  

Kavi Sagar chavan

Drama

व्यथा

व्यथा

4 mins
300


गावच्या येशीवर निघालो. गावात नेहमीच असणारी तीच वर्दळ होती.. रस्त्याने चालत असताना पाठीमागून येणाऱ्या गाड्याचे हॉर्न वाजत कानावर कर्कश्श आवाज.. किती तरी वेळ जसेच्या तसेच वाजत होते. मध्येच एखाद्या गल्लीतून मोटारसायकल येऊन उभी राहायची त्याने वाजलेल्या हॉर्नमुळे अचानक गाडी अंगावर आल्याचा भास होत असे. त्याने गच्चकण मारलेला ब्रेक.. गाडी अगदी पायाजवळ येऊन थांबली की, काय की अंगावर आली असं वाटायचं चला नशीब जीव वाचला. त्याचं एक समाधान असे. देवाने शरीर दिल त्यात जीव टाकलं.. शरीर चालू आहे ते त्या देवामुळे.. पांडुरंग !पांडुरंग ! देव कधीही दिसला नाही. तो दिसावं असं खुपवेळा मनाला वाटायचं पण लोक सांगतायत तेच खरं असल बहुतेक शेवटच्या क्षणी स्वर्गात गेल्यावर देव भेटतो. जे सांगत होते. त्यांनाही नक्की माहिती नव्हती.. त्या फक्त पाप-पुण्याच्या भाकडकथा..


शेजारच्या आंनदानं सांगितलं होतं. एकदा स्वर्ग आणि यात तसं काही फारसा फरक नाही. इथेच आहे. आणि हा कलियुग हाय. सगळं खालीच भरावं लागतं. सुटका नाही. आनंदा गेला आणि जाणवलं म्हाताऱ्या आयुष्याचा किती हा पसारा काळ लोटला गेला. जवानी गेली तेव्हाची मस्ती अंगातली रग निघुन गेली.. आणि केव्हा हातात काठी आली… वाटलं अरे किती लवकर म्हातारे झालो आपण.. डोळ्याला लागलेला भिंगाचा चष्मा आणि काठी मोठा आधार वाटतो या वयात तेही खरंच आहे. म्हणा चष्मा नसला तर बाहेर जाणार कसं आणि काठीचा आधार नसेल तर रस्त्यावर चालणंच अवघड..?? 


रस्ता ओलांडत असता.. मागून एक चारशे सातवाला आवाज देत व्हता.. ये म्हाताऱ्या…. मागून एकाने हाताला धरून ओढत बाजूला केलं. बाबा रस्त्यावर बघत जावा की उडवलं असतं म्हणजे.. त्याचा जोडीदार बोलून गेला. म्हातारं बहीरं हाय वाटतं!!


काही वेळ काय झालं काहीच समजण्यापलीकडे होतं. जरा वेळ हॉटेलात बसून रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या किलकिल्या डोळ्यांनी पाहत.. येशीला केव्हा आलो समजलं नाय… काय करणार म्हातारं हाय व्हाय मी नाही म्हटलं तर हेच खरं होतं. आधार संपलेल्या फांदीसारखं आयुष्य.. हा दररोजचा नित्यक्रम सुख-दुःखाच्या साऱ्या गोष्टीचं गणित आणि जमा बेरीज येशीवर असणाऱ्या या मंदिराच्या ओट्यावर होत असे. थोड्यावेळ आराम केल्यानंतर पाराच्या दिशेने पाय आपसूक वळू लागले. पायानाही वळण लागलं मालकाला आपल्या ठरलेल्या जागेवर घेऊन जाणे हे त्यांचं काम अगदी अचूक असंच तेही वयाने थकलीच होती म्हणा पांडुरंगाचीच कृपा म्हणावी. 


पारावर आरं ये दादाजी किती उशिर केलास, आज आम्हास्नी वाटलं तू काय येत नाही.


आरं हो नाही कसा नाही आलो तर सारा दिवस कसा जायचा इथे आलो की बरं वाटतं बघ.. आणि या म्हाताऱ्याला आता तुमच्याशिवाय आधार आहे का?? कुणाचं! नाही म्हटलं तरी पाय आपसूक घेऊन येतायत मला इथंवर, गोविंदा हा पार म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो. आपली स्वतःची अशी हक्काची जागा. आपल्याला सुख-दुःखाचा साक्षीदार. आणि आता आपलं दुःख कोण आपुलकीने वाटून घेणार आहे. प्रत्येकाला आपली वेगळीच दुःख मग आपल्या मनाचं बांध आपणच भक्कम करायला हवा. नाही का? हो बरोबर या वयात जाणवणारा एकांत खूप भयानक असतोय रे..! अख्खी रात्र ही अपुरी पडते. भूतकाळातल्या आठवणी जेव्हा डोळ्याभोवती पिंगा घालतात ना.. त्या अंधारात गालावर ओघळणारे अश्रू केव्हा सुकून जातात. नाही कळत. आतापर्यंत आपलीच वाटणारी ती माणसंही परकी झालेली असतात. वाटतं कुणाचा आधार असावं. माझं असलं आयुष्य मी रंडका खोड मुलं मुंबईला. रात्रीचे बारा वाजलेत की… सगळं शांत असतं. आजूबाजूला गल्लीतली कुत्री तेव्हडी ओरडत असतात. घश्याला कोरड पडली की कोणी तांब्याभर पाणी द्यावं. पण नसतं रे कोणी... त्या अंधारात उशाला ठेवलेला चष्मा लगबग करीत शोधत काठीचा आधार घ्यावा लागतो. हा रोजचाच नित्यक्रम असतो. बघ गल्लीतली ती कारटी दुरूनच पाहून ओरडत असतात. ते  बिना बायकोचं रंडक म्हातारं आलं… त्यात त्यांचा काय दोष म्हणा.. ती नादान निरागस मुलं आई-वडील म्हणतात तसंच बोलतात ती. दादाजी आपल्या गावी एकटाच राहत होता. अचानक काळाने घाव घातला आणि सारंच चक्र फिरलं सखवारबाई दादाजीची बायको गेली दहा वर्ष अंथरुणात होती. एक दिवस दादाजीला सोडून देवाघरी निघुन गेली. दोन मुलं तेही कामानिमित्त मुंबईला असतात. तिकडेच स्थायिक झाली. दोघं काही दिवस मुंबईला होती. तिकडचं हवामान दादाजीला जमलं नाही. शिवाय गावात आपुलकीने विचारपूस करणारी आपली माणसं मुंबईला नव्हती. बायकोला घेऊन दादाजी जो गावी आला तो परत गेलाच नाही. त्यानंतर अवस्था खूप ब

िकट होत गेली. 


एरवी दादाजी घरी लवकर येत आज संध्याकाळ झाली तरी घरी यायची चिन्हं दिसत नव्हती. शेजारीच राहत असलेला गणा दादाजी आला नाही. म्हणून आईला सांगू लागला.. तिलाही आश्चर्य वाटलं आज म्हातारं इतका वेळ कुठं असेल. म्हणून.. पण गण्याला सगळी ठिकाण परिचित असल्यामुळे बरोबर शोधून आणत असे… दादाजी म्हातारा झाल्यामुळे शेती करणं जमत नव्हतं अन मुलंही करत नव्हते. त्यामुळे गण्याला ठोक्याने शेती देऊन टाकली. गण्या दादाजीची जमीन पिकवत. दोघांनाहीं एकमेकांचा आधार होता. मुलं फोन करून विचारत काही दुखलं तर पैसे पाठवित असे. सगळीकडे अंधार होत चालला होता. सकाळी शेतावर गेलेली माणसं, गुरं, आपापल्या घरच्या दिशेने येऊ लागल्या. दिवे लावणीची वेळ झाली होती. तसंही आज पिठोरी अमावस्या आणि उद्या पोळा त्यामुळे काहींनी आपल्या बैलाला कामावर लावलं नाही. तिकडून येताना स्वच्छ घासून अंघोळ करून आणुया काय फरक पडतोय म्हणा. गाण्याची आई सावित्री दादाजीला खूप जीव लावत. तिन्हीसांज होऊनही म्हातारं घरी न आल्याने काळजीत पडली. देवघरात दिवा पेटवला आणि देवाला सांगितलं देवा, म्हातारं व्यवस्थित घरी येऊ देरे बाबा उद्या सण हाये.. नको काही विपरीत घडायाला.. देवाला हात जोडून बाहेर तुळशीजवळ दिवा लावला आणि… गण्या दादाजीला घेऊन येताना दिसला. दादाजी सावित्रीला म्हणत, सावित्री बघ देवाने मला लेक नाही दिली गं.. मला लेक पाहिजे होती… तुला बघितलं की देवाने माझं मागणं ऐकलं तुझ्या रूपात पोरगी मिळाली.. लेकीला जेव्हडी काळजी असते ना तेव्हडी मुलांना नाही. म्हणून म्हणतो प्रत्येकाला एक तरी लेक असावी. देवाची देणी खूप अपार असते. त्याच्यावर आपली श्रद्धा असायला हवी करता करविता तोच तर आहे. कोणाची कमी कुठे पूर्ण करावी हे त्याच्यापेक्षा जास्त कुणाला ठाऊक असेल बरं… पांडुरंगा..! सर्वांना सुखी ठेव बाबा. 


सावित्रीच्या घरी चहा पिऊन म्हातारं आपल्या घरी आलं. घर अगदी स्वच्छ दिसत होतं. पाण्याचा माठ भरलेला होता. अंथरूण व्यवस्थित घडी घालून ठेवलं होतं. बायकोचा फोटो पुसलेला.. सावित्री किती करतेस गं… दिवसभर शेतात राबते.. पुन्हा घरातलं मुलांचं.. आणि त्यात मी एक.. सावित्रीचा हा नित्यक्रम होता. एक दोन दिवसाआड वेळ मिळेल तसे दादाजीचं घर स्वच्छ करत असे. काय होतं आपल्या बापासारखाच हाय.. मलाही कुठं बाप आहे अन त्याला मुलगी.. 


बाहेरून आवाज आला दादा.. दादा… गाण्याचा आवाज होता. काय रं पोरा जेवण आणलंय.. आज तुम्हाला आवडते म्हणून मसाला भात अन् कढी बनवली आईने असं व्हय.. दादाजीला कढी खूप आवडत कधी मन झालंच तर अगदी हक्काने सावित्रीला बनवायला सांगत असे. आज मात्र तिने स्वतःहून बनवली होती. जेवण देऊन गण्या घरी गेला. दादाजी जेवायला बसला.. मोठ्या आनंदाने वाटी तोंडाला लावली.. एक घोट घेतला अगदी तृप्त झाल्याचं समाधान वाटलं.. समोर भिंतीवर असलेल्या फोटोकडे लक्ष गेलं. समोरून सखू पाहत होती.. नऊवारी साडीत काढलेला तिचा तो फोटो खूपच सुंदर दिसायचा… बराच वेळ दादाजी सखूकडेच बघत कढीचा एक एक घोट घेत राहिला. दोघाची जोडी खूपच सुंदर अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा होता. सखूच्या हातची कढी म्हणजे अमृत वाटायचं दादाजीला जेव्हापासून सखू देवाघरी गेली.. कढी दुरापास्त झाली होती.…. जेवताना भिंगाचा चष्मा धूसर होऊ लागला. डोळ्याच्या कडा भरून वाहू लागल्या.. दादाजीला आता कढीचा राग आला तसा त्याने वाटी भिंतीवर भिरकवली.. आणि ढसाढसा रडायला लागला.. सखू नकोय मला हे अमृत.. माझ्याशी बेईमानी केलीस तू अमृत पाजून निघून गेलीस व्हय गं! मला एकट्याला सोडून.. एक एक दिवस अवघड होत चाललंया मला.. पांडुरंगाला रोज सांगतो मी उचल बाबा मला.. नाही सहन होत आता.. मरण दे रे मला.. सखूला भेटायचं रे… 


दादाजीचा आवाज ऐकून शेजारी धावत आले… तशी सावित्रीहीी धावत आली… 


दादा…. काय झालं कामून रडताय तुम्ही..सावित्रीच्या खांद्यावर मान ठेवून दादाजीचे अश्रू वाहत होते.. आज सगळ्यांनाच रडू आलं.. दादाजीच्या तोंडात एकच शब्द पुन्हा पुन्हा येत होत.. सखूला भेटायला जाणार मी… म्हातारपण नाही सोसवत सावित्री.. पांडुरंगा उचल रे! मला. 


सावित्रीने दादाजीची समज काढली. 

मात्र सावित्री त्या अंधारात बसून होती. बराच वेळ तिच्या डोळ्यातून अश्रूचे बांध वाहत होते. 

सकाळ झाली.. सगळीकडे गजबज सुरू होती… दादाजी अजून उठला नाही…. गण्या बाहेरून आवाज देत व्हता… शेतावर पोळ्याचे बैल सजवायला जायचं होतं. सावित्रीही आवाज देऊन थकली.. 

सावित्रीने टाहो फोडला, दादा…


दादाजी मात्र अनंतात विलीन झाले होते. आपल्या सखूच्या भेटीला.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama