विस्कटलेल्या पुस्तकांमधील अर्धवट राहिलेलं प्रेम
विस्कटलेल्या पुस्तकांमधील अर्धवट राहिलेलं प्रेम
एके दिवशी वाटेने जात असतांना वाटेच्या कडेला असलेल्या सुंदरशा घराच्या व्हरांड्यात तिच्या विस्कटलेल्या पुस्तकांना सावरतांना एका सुंदर सुशील आणि संस्कारी मुलीकडे माझी अवचित नजर पडली. स्वतःच्या विस्कटलेल्या पुस्तकांना सावरतांना तिच्या डोळ्यांमधील तळमळ पाहून सहज मनात आलं की या मुलीचं पुस्तकांवर कदाचित अपार प्रेम असेल म्हणून मी तिच्या समक्ष जाऊन या संबंधित विचारायचं धाडस केलं. मी तिच्या नजदीक जाऊन तीला म्हटलो “हाय मिस वर्ल्ड, तुझ्या समुद्रासम खळखळणाऱ्या डोळयांमधील तुझ्या विस्कटलेल्या पुस्तकांप्रती असलेली तळमळ तुझ्या सुंदरतेला आणखी वाढवत आहे.” यावर ती स्मिथ हास्य करीत म्हणाली, “तुझ्या प्रशंसनेचं मी आदर करते परंतु ही तळमळ या विस्कटलेल्या पुस्तकांप्रती नसून माझ्या प्रियकराने पुस्तकांमध्ये ठेवलेल्या प्रेमपत्रांप्रती आहे.”
एका 15 ते 16 वर्षाचा मुलगा आपल्या बाबांकडे बाईक चा हट्ट धरतो आणि बाबा ही त्याच्या या हट्टापोटी त्याला खेळण्यातील बाईक खरेदी करून देते. ती बाईक बघून त्या मुलाला कसं वाटलं असेल.......? अगदी असच काहीसं त्याक्षणी तिच्या त्या अनपेक्षित उत्तराला ऐकून वाटलं. खरं तर तिला बघताच क्षणी ते इंग्लिश मध्ये म्हणतात ना! Love at First Sight वैगेरे असं काहीसं मलाही वाटलं होतं. कारण तंत्रज्ञानाने ग्रासलेल्या या विश्वात विस्कटलेल्या पुस्तकांप्रती तिच्या डोळ्यांमधील तळमळ मला आकर्षित करीत होती. कारण प्रथमदर्शनी मी जे दृश्य पाहिलं त्यावरच मी डोळे मिटून विश्वास करायला लागलो. असो.......! मुळात प्रश्न हा मुळीच नाही की प्रथमदर्शनी पाहिलेल्या दृश्यांवर विश्वास ठेवावे अथवा नाही? मुळात प्रश्न तर असा आहे की, आमची तरुण मंडळी ज्या वाटेवर आज चालत आहे ती वाट योग्य आहे की नाही?
नाही नाही......! तुम्हाला जर वाटत असेल की, मी प्रेमाच्या विरुद्ध आहे तर तुम्ही पूर्णतः चुकीचे आहात कारण मी प्रेमाच्या विरोधात नाही परंतु असं म्हणतात की प्रेम हे योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीवर झालं तर प्रेमाशिवाय जगातील दुसरी कुठलीच सुंदर गोष्ट नाही. प्रियकर अथवा प्रेयसी ने ठेवलेल्या त्या पुस्तकातील कमीत कमी एक एक तरी पान रोज वाचत गेलो तर आपलाच प्रवास हा सुखमय होईल असं नाही का वाटत तुम्हाला? अहो! ज्या पुस्तकांवर आपल्याला प्रेम करायला पाहिजे त्याच पुस्तकांचा वापर आपण असले प्रेमप्रकरण घडविण्यासाठी करीत आहो. पुस्तकांवर प्रेम करणारे अब्दुल कलाम सारखे कित्येक थोर पुरुष आणि संत महात्मे पडद्याआड केले तरी देखील आजही आपण त्यांचा जन्म दिवस आणि मृत्य दिवस आठवणीने साजरा करतो परंतु प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल ज्या मुमताज च्या प्रेमापोटी बांधलं गेलं त्या मुमताज चा जन्म दिवस तर सोडा मृत्यू दिवस तरी कुणाच्या स्मरणात आहे का? आणि असेल ही कदाचित तर आपण तो दिवस स्मरणात ठेवून आठवणीने त्यांना पुजतो का? नाही ना....! कारण पुस्तकांवर प्रेम करून कुणाला अब्दुल कलाम होता नाही आलं तरी मात्र एक चांगला माणूस नक्कीच होता येतं आणि हे परम् सत्य आहे.
या विचारात मग्न असतांना अचानक “हे मिस्टर कुठं हरवलेत तुम्ही?” असा कोकिळेसमान मधुर असा त्या मघाशी भेटल्या त्या मुलीचा आवाज माझ्या कानी आला आणि मी शुद्धीवर आलो. तिला प्रतिउत्तर देत म्हणालो, “काही नाही गं ताई, आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या प्रत्येक वळणावर मी जरा विसावा घेतो आणि विचार करतो की आपली वाट चुकली तर नाही ना.....!” असं म्हणत मी पुढच्या प्रवासाला निघालो. जातांना मात्र मागे वळून एक नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरवली असता मला तिच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न चिन्ह आढळले. कदाचित माझ्या बोलण्यामागचा उद्देश तिला कळला नसावा. तुम्हाला कळला असेल तर मला नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतोय.
✍️आशु छाया प्रमोद (रावण)

