ट्विस्ट अँड टर्न
ट्विस्ट अँड टर्न


सीरियल्सना कितीही नावं ठेवली तरी आपण सगळे सीरियल्स, डेली सोप बघतो. त्यात रमतो, कुणी चेष्टा करण्यासाठी बघतात तर काही जण आपापल्या दुःखांना विसरण्यासाठी बघतात. पण इथे तो विषयच नाहीये. इथे सीरियलच्या गोष्टीतली गोष्ट आहे. म्हणजे बघा ना सगळ्या सीरियलमध्ये त्या हिरो-हिरोईनला इतर पात्रांना दोन ते तीन वेळा चान्स मिळतो नव्याने आयुष्य सुरू करण्याचा. आणि तेही मेकओव्हरहित. बऱ्याच जणांना हे बघायलाच जास्त आवडतं. कारण खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही ना. पण सध्या घडतंय की, आपल्या सगळ्यांचं आयुष्य स्थिर झालं आहे एका ठिकाणी येऊन कुणीही पुढे जात नाहीये कुणीही मागे रहात नाहीये. सगळे फक्त जगण्याची उमेद धरून ठेवण्याची धडपड करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने कसल्या ना कसल्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करतोय. ह्यात कधीकधी चिडचिड होतेय... भांडणं, वादही होताहेत. पण ते सगळं बाहेरच्या नकारात्मक परिस्थितीशी जुळवून घेताना होणारच. असो
तर आपण बोलत होतो सिरियलसारख्या खऱ्या आयुष्यात आलेल्या ट्विस्ट आणि टर्नबद्दल. हा ट्विस्ट सध्या भरपूर बदल घडवतोय. काही गोष्टी काही माणसं नव्याने भेटत आहेत, कळत आहेत. स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत. आपल्या माणसांना पारखण्याची, ओळखण्याची एक संधीच आपल्याला मिळाली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे मागे रेलून बसत शांतपणे फक्त निरीक्षण करायचं आहे. सीरीयलसारखे एकामागे एक सीन समोर येत जाणार आपण मात्र त्यातून निरीक्षण करत हवं ते घ्यायचं आहे. आता कुणाला काय हवं हे तर जो तो ठरवणार त्यामुळे ते काही मी सांगत नाही. पण एक सल्ला मात्र देते सीरियलमध्ये कसं चांगलं घडावं म्हणून आपण वाट बघतो तसंच इथेही व्हावं ही एक इच्छा आपल्याला मनात सतत जागी ठेवावी लागेल आणि मग कदाचित आपल्या आयुष्याच्या डेली सोपची स्टोरी आपल्या मनाप्रमाणे लिहिली जाईल अन् ह्या ट्विस्टनंतर जो टर्न येईल ना तो अनपेक्षित असे चांगले अनुभव घेऊन येईल.
बघू या कितपत जमतंय ते... तोपर्यंत मनाला गुंतवा स्वतःच्या कथेत...