Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

स्त्रीजन्मा तुझी कहाणी

स्त्रीजन्मा तुझी कहाणी

4 mins
669


"सकाळी सकाळी काय झालं आता तुला तोंड पाडायला? कोणी काही बोललं का? की तुला कोणाच काय खटकलं? तुमच्या बायकांचं काही कळतच नाही...कधी हसता.. कधी रडता..अचानकच काय होत तुला अस उदास बसायला..काय कमी आहे का तुला घरात? सगळं मागेल ते एका शब्दावर मिळत तरी डोळ्यात आसवं आणायची भारी हौस तुम्हा बायकांना. एवढं चांगलं सासर मिळालं,सासू सासरे अगदी फुलासारख जपतात...मागे सर पण म्हणत नाहीत. नवरा तर जोरू का गुलामच झालाय की तरीही तुम्हाला काय खुपत ते कळायला मार्ग नाही. जाऊदे मला ऑफिसला उशीर होतोय...मी निघतो. संध्याकाळी मला तुझं हे पडकं तोंड बघायचं नाही तेव्हा हसत स्वागत कर आल्यावर."  नाही वाटत कधी कधी कोणाशी बोलावसं..वाटत शांतच राहावं. काही कमी असते म्हणूनच माणूस असा उदास असतो का? आठवणींवर कोणाचा ताबा असतो... आज आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस... मागच्या वर्षी मी तिथे होते तर किती आनंदाने साजरा केला होता. बहीण, भाऊ सगळंच कुटुंब एकत्र येऊन छोटासा कार्यक्रम केला होता. सकाळपासून त्याच आठवणी दाटून आल्यात... नाही मन लागत कामात म्हणून बसले शांत तर त्यावर किती काय बोलून गेला सुमित.. इतकं सोप्प आहे का जन्मदाती माणसं कायमचं सोडून नवीन घरात राहणं.. राहिलो तरी या आठवणींना तिलांजली देणं तरी इतकं सोप्प आहे का? पण ज्यांना स्वतःचाच घर, आई वडील, बहीण भाऊ, जिव्हाळ्याची माणसं कधीच सोडून जावं लागतं नाही त्यांना बायकांचं दुःख काय कळणार.. माहेर म्हणजे काय कुठे कळणार. जाऊ दे किती काही झालं तरी घरातल्या बाईला हसरा चेहरा ठेवूनच रहावं लागतं... तरच ती सुखी असं समजलं जातं. अशा आठवणींना, कधी बरसून येणाऱ्या भावनांना हसण्याआड बांध घालावाच लागतो असं आई म्हणायची ते अगदी खरं...आता पटतंय.   


"कशा आहात मॅडम...हसतेस म्हणजे मूड बरा झाला वाटत. खर आहे हा बायकांचं मन काही केल्या समजणं महाकठीण."    

"काही नाही झालेलं मला..जरा घरची आठवण आलेली म्हणून"  

"तुला तर सासूरवास नावाचा प्रकारच नाही... तसूभरही त्रास नाही. अगदी आनंदात नांदतेस की तरी माहेरची आठवण येते.."   

"जाऊ दे ना तुम्हा पुरुषांना ते दुःख नाही कळणार... आठवण यायला सासुरवासच होणं गरजेचा नसतो. बर रविवारी आई बाबांकडे ताई,दादा बाकीचे सगळेच येणार आहेत..आपल्यालाही बोलावलंय"   

"बर जाऊया...चार दिवस जाऊ चांगले... तुला बर वाटेल... मीही राहतो चार दिवस."

सुमितचं हे वाक्य ऐकून तर माझे डोळेच मोठे झाले. पहिल्या दिवाळीला ज्याने एकच रात्र कशीतरी बायकोच्या माहेरी काढली तो आता चार दिवस राहणार होता... मी पण आनंदाने लगेच बॅग भरली. शनिवारी पोहचलो माहेरी. सगळा गोतावळा बऱ्याच महिन्यांनी एकत्र आलेला... नुसता धुडगूस. लहानपणीच्या आठवणींपासून एकमेकांच्या खोडयांपर्यंत सगळ्याची उजळणी चालू होती. सुमित आई बाबांना फोन करून लवकर झोपला. रविवारी मी माहेरात असल्यामुळे मनासारखी झोप घेऊन उशिराच उठले. सुमित मात्र पहाटे उठून मॉर्निंग वॉक करून नाश्ता करून बसलेला. आई बाबांना फोन करूनही झालेला सकाळी सकाळी. रात्री पार्टीमध्ये सगळे गुंग होतो. मजा, मस्ती, गप्पा चालू होत्या. सुमित मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता. वरवरचं हसणं त्याच आता दिसू लागलं होतं. सगळ्यांच्यात असूनही एकटा होता. बाहेर एकटाच बसलेला म्हणून त्याच्याशी बोलायला गेले तसं त्याने माझाच हात हातात घेऊन म्हणाला, "तू खरं बोलत होतीस माहेर म्हणजे काय आम्हा पुरुषांना कधीच नाही कळू शकत. दोन दिवसच झाले मी इथे आहे तर माझ्या घराची, आई बाबांची सगळ्यांचीच खूप आठवण येते. कधी एकदा स्वतःच्या घरी जातोय अस झालंय.. इथे काही त्रास तर नाहीच गं पण जिथे जन्म घेतला आणि ज्यांनी हे जग दाखवलं, ज्या घरात खेळलो, पडलो, हसलो रडलो त्या घरापासून जास्त काळ लांब राहता येत नाही. खरंच तुम्ही स्त्रिया जन्मापासून ज्या घरात वाढला, रक्ताची नाती जगली त्या नात्यांपासून एकदम अनोळख्या घरात अनोळखी लोकांसोबत कसं राहता हाच विचार करतोय कधीपासून. अनोळखी घरी जाऊन त्या माणसांना आपलं करणं, नाती जपणं, सगळ्यांची मर्जी राखणं वरून कधीकधी बोलणीही ऐकावी लागणं, काही घरात तर माहेरच्यांचाही उद्धार केला जातो ते सहन करणं पण हसत राहणं, आई वडिलांचं सुरक्षित मायेचं छत्र सोडून स्वतःचा संसार स्वतःच्या हिमतीवर उभारणं सगळं करण्याची क्षमता फक्त तुमच्यातच. कोणीतरी अगदी बरोबर म्हटलय "दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी स्वतःच हक्काच घर सोडण्याची शक्ती फक्त स्त्रियांतच असते". या आठवणींच्या दुनियेने तुझा जीव कधीतरी कासावीस का होतो...कधीकधी तू फक्त शांत का असतेस ते आज कळालं. आम्ही मुलं कामानिमित्त बाहेर राहिलो तरीही आपल्याच घरी परत जाणार असतो..पण तुम्ही तुमचं नवीन घर, नवीन कुटुंब तयार करत असता. खरं आहे एका स्त्री जन्मालाच हे जमू शकतं."     


"सुमित या दोन दिवसांच्या घरापासून दूर राहण्याच्या अनुभवाने तुला कळलं, की हे फक्त स्त्रियांनाच जमू शकतं... पुरुष नाहीत स्वतःचं घर सोडून असं नवीन घर, नवी माणसं जोडून तिथलाच होऊ शकत. बरं झालं पुन्हा कधी माझं तोंड का पडलं असं तू म्हणणार तरी नाहीस. पण बरं वाटलं स्त्री मनाचा या अनुभवातून तू विचार केलास... प्रत्येक पुरुषाने असा विचार केला तर त्या स्त्रीला खूप आधार मिळेल पतीचा. माहेर काय त्याला कळू शकत नाही पण समजून तर नक्कीच घेऊ शकतो."   


 सुमितला तर भावना समजल्या.. तिचं माहेरपण समजलं पण सगळ्याच पुरुषांना ही परिस्थिती समजतेच असं नाही.. तुला काय कमी आहे का असंच म्हणून दुःखावर फुंकर घालण्याऐवजी डोळ्यात आसवे आणणारेच जास्त असतात. काहींना कळतं पण वळत नाही. बोलावं तर वाटतं पण पुरुषार्थाआड सगळेच शब्द मागे फिरतात. स्त्रीकडे माया, ममता, प्रेम जसं ओतप्रोत भरलंय तस सहनशक्ती आणि माहेर सोडण्याची शक्तीही तिला उपजत मिळाली. तेवढी हिंमत स्त्री सोडून कोणामध्येच नाही.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational