रेशमी बांगड्या
रेशमी बांगड्या
गणपती आणि गौरीचा सण कुटुंबाबरोबर मोठ्या आनंदात पार पडला. हा हा म्हणता माझाच जायचा दिवस उजाडला, मुले पण रडत होती, सासूबाईंच्या चेहऱ्यावर प्रचंड काळजी आणि चिंता दिसत होती. गालावरून हात फिरवून मला म्हणाल्या, "काळजी घे हो, हे सर्व जण आहेत, आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून राहू, तू तिथे एकटी आहेस, काळजी घे. आणि लवकर परत ये." मला पण भडभडून आले. जीवन-मरणाचा आता प्रश्न असल्यासारखे वाटले. असं वाटलं, सोडून द्यावी ही नोकरी, मग वाटलं, मुलांची शिक्षणं कशी होतील? सासऱ्यांचे औषध-पाणी कसे जमेल? नवीनच बांधलेल्या बंगल्याचे हप्तेदेखील जात होते, पाय जड झाली झाले.
भरलेल्या डोळ्यांनी, आणि जड पायाने मी घर सोडले, औरंगाबाद स्टेशनला येऊन ट्रेनची वाट बघत उभी राहिले. पहाटेची जनशताब्दी फलाटाला लागली, मी एसी डब्यामध्ये शिरले, बघते तर काय, माझ्याशिवाय डब्यामध्ये फक्त एकच स्त्री होती. थोडीशी भीती वाटली, हे काय? असाच का प्रवास करायचा? मला तर बोलायचं फार नाद होता, सहप्रवासी असले तर प्रवास पण मजेत पार पडतो, हो की नाही?
ट्रेनने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला, दौलताबाद गेले तसा तिकीट चेकर डब्यामध्ये आला. त्याला विचारले, "काय आम्ही दोघीच का?"
तिकीट चेकर हसून म्हणाला, "हो तुम्ही दोघीच, जर भीती वाटत असेल तर दोन डबे सोडून बायकांचा जनरल डब्बा आहे तिथे आहे चार-पाच बायका. दोघीजणी जाऊन बसा." मी मनात म्हटलं बघूया नक्की कोणी तरी अजून येईल, पण मला माहिती होतं, कोरोनाच्या दिवसात प्रवास कोण करणारे मरायला. त्यामुळे रिकाम्या डब्यातच प्रवास करावा लागणार, बाप रे बाप, छाती धडधडायला लागली लागली. टीव्हीवरचा क्राइम पेट्रोल नजरेसमोर यायला लागले.
माझ्याकडे भरपूर सामान होतं, एक मोठी बॅग, एक खांद्यावरची बॅग आणि मोठी पर्स. एवढं सगळं घेऊन चालत्या ट्रेनमध्ये कुठे जायचं जनरल डब्यात! असा विचार केला आणि गुपचूप बसून राहिले.
काही वेळ गेल्यानंतर, एक छोटी मुलगी माझ्या दिशेने आली, गोड हसून म्हणाली, "मावशी तुम्ही कुठे चाललात?" एवढी लहान एकटी मुलगी बघून मला नवलच वाटलं, तेवढ्यात, "प्रिया प्रिया अशी हाक आली" आणि तिची आई तिला शोधत माझ्या दिशेने आले आली. प्रियाची आई एक तरुण मुलगी होती, दिसायला सुरेख पण रडल्यामुळे डोळे लाल झालेले होते. नवल म्हणजे लहान मुलीबरोबर प्रवास करताना पण तिच्याकडे काहीच सामान नव्हते. ना मुलीसाठी खाऊ, ना कपड्याची बॅग. माझ्याकडे बघून ती मलूल निराशेने हसली आणि म्हणाली, "बरं झालं तुम्ही आहात." मग ती माझ्याच लाईनमध्ये दुसऱ्या बाजूच्या खिडकीकडेच्या सीटवर जाऊन बसली. प्रिया आमच्या दोघींशी आलटून-पालटून बोलत राहिली. दहा-पंधरा मिनीट गेले, प्रियाची आई खिडकीकडे बघून रडू लागली.
मी तिला विचारले काय झाले? माहेरून आलीस का? आईची आठवण येते का? आणि तुझं सामान कुठे? इथेच घेऊन ये माझ्याजवळ बस. माझ्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता प्रियाची आई फक्त रडत राहिली.
रोटेगावला ट्रेन थांबली आणि काही चहावाले आत शिरले शिरले, मी दोन चहाचे पैसे दिले आणि एक प्रियाच्या आईला दिला. तिने मुकाट्याने चहा प्यायला, माझ्याकडे बघून थँक्स म्हणाली.
परत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. तिने काहीच उत्तर दिले नाही, नुसतीच रडत राहिली. पुढे लासुर स्टेशन आलं, इथे गाडी थोडावेळ थांबत होती. एक मध्यमवयीन उलटा पदर घेतलेली बाई डब्यांमध्ये शिरली, तिच्या अवतारावरून चुकीचे डब्यात शिरलेली दिसत होते. तिच्याजवळ नुसतं गाठोड होतं. मी तिला म्हटलं, बाई गं, हा एसी डब्बा आहे, बायकांचा डबा पुढे आहे.
ती हसली आणि म्हणाली, डबा रिकामाच आहे तुम्हाला पण सोबत होईल असं करता करता डब्यामध्ये अजून चार बायका शिरल्या, त्यांच्या अवतारावरून त्यांनी एसीचे टिकीट घेतलं नव्हतं.
प्रियाच्या आईचं रडणं चालू होतं. उलटा पदर घेतलेली स्त्री (सुशीला) म्हणाली, का रडतेस बाळ?
प्रियाच्या आईची कथा ऐकून अंगावर काटा आला. तिचं नाव कविता. या महामारीच्या दिवसांमध्ये, कविताच्या नवऱ्याचे काम सुटलं, त्याला वाईट व्यसन लागलं, घरामध्ये सासू-सासरे, भरीसभर आजारी मावशी. हळूहळू सगळे पैसे संपून गेले, एवढेच काय कविताच्या अंगावरचे दागिनेदेखील बाजारात मोडले गेले. एके दिवशी तर कहरच झाला, कविताच्या नवऱ्याचा जुना शेठ एके रात्री घरी आला आणि पाच हजार रुपये देऊन कविता बरोबर रात्र घालवून गेला. सासू-सासरे मावशी यांना कविताच्या अपमानाचं काहीच वाटलं नाही, त्यांना हा धंदा फार बरा वाटला, त्यादिवशी घरामध्ये शिरा-पुरी झाली. वरती तोंड करून कविताचा नवरा म्हणाला, "प्रिया मोठी झाल्यावर तिला तर खूपच किंमत मिळेल."
भविष्य जाणवलं तशी संधी साधून कविता आणि प्रिया घराबाहेर पडल्या, तडक स्टेशन गाठून, दिसेल त्या ट्रेनमध्ये बसल्या.
कविताने सुशीलाला विचारले की, सुशीला कुठे जाणार आहे? सुशीलाच्या नवऱ्याचं छोटेसे दुकान बंद पडलं होतं, सुशीला आपल्या भावाकडे मुंबईला चालली होती, बाबाची मदत घेऊन ती परत कपड्यांचा व्यवसाय करणार होती. काहीच शाश्वती नव्हती, पण मनात जिद्द होती. सुशीलाची कथा ऐकून मागे बसलेली नीता पुढे आली. तिचे डोळे पण रडून लाल झाले होते. चांगल्या घरची शिकलेली नीता आपल्या सहा महिन्याच्या मुलाबरोबर, गाडीमध्ये शिरली होती. नीताची कथा पण तशीच होती. तिचा प्रेमविवाह होता, सुरुवातीला सुजय तिचा नवरा तिचं फार कौतुक करायचा, पण कौतुक थोडक्यातच संपलं. आता सुजयला तिच्या प्रत्येक कामामध्ये चूक आढळून येत होती. तिने केलेला स्वयंपाक, तिने आवरलेलं घर, तिची मुलाला सांभाळण्याची रीत, सगळ्यांवरून सुजय नीताला बोल बोल बोलत होता. इतकं की आलेल्या पाहुण्यांसमोर देखील तो नीताचा पदोपदी अपमान करायचा. काल तर कहरच झाला होता. नीतावरती भलताच संशय घेतला होता, सगळं सहन करणारी नीता हा अपमान सहन करू शकली नाही, आणि तिने आपल्या बाळाला उचलून घर सोडले. डब्यात शेवटी शिरलेली शीला अंग चोरत आमच्यापाशी येऊन उभी राहिली, शीला तर जेमतेम 18 वर्षांची होती, नुकतीच दहावीची परीक्षा देऊन कम्प्युटर कोर्स करत होती. अंगावरती लाल रंगाचा चमचमणारा सलवार-कमीज घातला होता, हातात लाल बांगड्या होत्या, तोंडावर भडक मेकअप होता. शीलाबरोबर तर काहीच सामान नव्हतं. शीला माझ्यापाशी आली आणि म्हणाली, “मावशी मला तुमचा साधा ड्रेस घालायला देता का? या कपड्यांमध्ये मी लगेच ओळखू येईल आणि माझा बाप मला परत घेऊन जाईल.”
ही गोष्ट ऐकताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला, सगळ्यांनी तिला विचारलं, शीलाची कथा परत तशीच, तिचा दारुडा बाप तिला तीस हजार रुपयांमध्ये एका श्रीमंत अरब माणसाला विकत होता, शीला आणि तिच्या आईच्या लक्षात शिलाच्या दारुड्या बापाचा डाव लक्षात आल्यावर शिलाच्या आईने शीला सकट घराबाहेर पळ काढला, आणि तडक स्टेशन गाठले. शीलाला मुंबईच्या ट्रेनमध्ये ढकलून, तिची आई परत घरी गेली.
शीला, नीता, कविता, सुशीला सगळ्याजणी परिस्थितीने गांजलेल्या होत्या, त्यांना स्वाभिमानाने जगायचं होतं.
आमच्या बँकेचे काही डॉक्टर पण ग्राहक होते, मी त्यांच्यापैकी दोघांना फोन केला, कविता आणि शीला यांची परिस्थिती सांगितली, त्याबरोबर दोघाही डॉक्टरांनी आपल्या घराचा पत्ता देऊन मुलींना त्यांच्याकडे पाठवायला सांगितले. डॉक्टर विश्वासाचे होते, मुलींना ते आपल्या दवाखान्यात काम देणार होते आणि त्या दृष्टीने मुलींचा संरक्षण होणार होतं. नीता चांगली शिकलेली होती, तिने ठरवलं होतं की आई-वडिलांवर भार न पडू देता ती काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करणार होती, तिने घर सोडण्यापूर्वी स्वतःचे भविष्य आखून ठेवलं होतं. सुशीलाला मी बँकेच्या कर्जाबद्दल सांगितलां आणि दोन दिवसांनी बँकेत यायला सांगितलं.
गाडी जशी कल्याण स्टेशनमध्ये आली तशी माझ्या ओळखीची बांगडीवाली डब्यामध्ये शिरली.
माझ्याकडे बघून हसून म्हणाली, "मॅडम चालला का परत ड्युटीवर?" मी हसून हो म्हटलं, आणि दोनशे रुपयाची नोट काढून तिला सांगितलं, “या सगळ्या बहिणींना चांगल्या रेशमी बांगड्या दे.“
सगळ्यांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितले, मी त्यांना म्हटलं, "जुनाट बुरसट विचारांच्या आणि रुढींच्या बेड्या तुम्ही तोडल्या आहेत आणि आता एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहात म्हणून या रेशमी बांगड्या."
दादर स्टेशन आले. शीला आणि कविता यांना पैसे देऊन मी डॉक्टरांचा पत्ता दिला आणि टॅक्सीत बसवलं. नीता सुशीला आपल्या आपल्या ठिकाणी गेल्या, जाताना मला टाटा करताना त्यांच्या हातातल्या सुरेख रेशमी बांगड्या चमकल्या.