पेन्शन प्लॅन
पेन्शन प्लॅन


आजवरच्या आपल्या जीवनचक्रात उतार वय हे एक नात्याच्या बहारदार वृक्षाला आलेले सुंदर फुल आहे. त्यात दडलेलं एक खोडकर मुलं आहे. कधी त्यात काळजीची चाहूल आहे तर कधी त्यात मायेची भूक भागवणारी चूल आहे. वयाच्या या टप्प्यावर आता थोडी शांतता ही आवडते. थोडी गडबड ही होते. थोडा आराम ही हवासा वाटतो तर कधी लहानासोबत खेळताना उत्साह ही येतो. या वेळी फक्त नात्याची गुंफण सोबत हवी. त्यात लकेर थोडी नवी, रुसवा फुगवा, गप्पा गोष्टी आणि अनुभवांची शिदोरी हवी. फुललेल्या या वृक्षाला आलेला बहर पाहण हेच आजवरच्या जीवनाचं फलीत. तर याचा आस्वाद याची देही याची डोळा घेणं हे दुसरे बालपण म्हणजे वृद्धत्व.
काल खिडकीतून बाहेरची वर्दळ कमी अधिक झालेली पाहत होते. मला ते दोघे दिसले. आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहणारे आजी आजोबा. कधी मार्केट मध्ये जाताना दिसले. उडती भेट झाली तरी पंधरा वीस मिनिट बोलतात. पण आज थोडं वेगळेपण जाणवलं. दरवेळी मी त्यांना वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाताना पाहते. आज बऱ्याच दिवसांनी दोघे एकत्र येत होते. आज त्यांना एकत्र येताना पाहून डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. चित्रात आम्ही असेच सगळे नातवंड एकत्र पत्ते खेळत बसलो होतो. अंगणात मस्त वारा सुटलेला आणि त्यात बैठक मांडून वाऱ्याच्या वेगातच आमचा खेळ रंगत होता. तेवढ्यात आजोबा आले आणि आम्हाला त्याच्या शिक्षकी कारकिर्दीत त्याच्या अनुभवलेल्या गोष्टी सांगू लागले. बरेचदा त्याच्या शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांचे कोणकोणते प्रकार पाहिले ? त्यात त्यांनी कसे बदल केले ? किती रंग भरले ? आणि त्यांच्या या कार्यात किती कठीण परिश्रम होते हे अगदी रंगवून सांगत. त्यात त्यांच्या दयाळू आणि कनवाळू स्वभावामुळे त्यांना कसे फायदे किंवा नुकसान झाले यावर आजीने कितीदा चर्चा सत्र भरवली. विचारांची शृंखला लागली. गप्पांना रंगत आली.
तेव्हा बोललेले एक वाक्य आठवते. आपले गेलेले दिवस आपल्याला परत मिळत नाही. कधी कधी आपली माणस ही आपल्याला परत मिळत नाही पण तेव्हाच्या आठवणी आणि त्यासोबत मिळालेले काही अनमोल क्षण पुरेसे असतात. कधी तरी आपली थांबलेली गाडी पुढे नेण्यासाठी तेव्हा ते इंधन म्हणून काम करतात. ही वाक्य मला तेव्हा खिडकीतून त्यांना एकत्र जाताना पाहून आठवली. जग इकडचे तिकडे झाले तरी आपली मूठ अजूनही बांधलेली आहे, यात कुठेही सैल पडलेली दोर नाही की अविश्वासाचा मागमूस नाही म्हणून त्यांची गाडी आज ही एकत्र पुढे पुढे जात होती. याहून ते कोणते सुख. आपल्या रस्त्यावर आपला मार्ग दाखवणारा कोणीतरी आपल्या सोबत असतो आणि आजवर चाललेल्या रस्त्यावर आलेले अडसर दूर करून आज पुन्हा रि-युनाइट होण्याची संधी देतो. हा प्रवास किती काळ पुढे शिल्लक आहे हे खरतर तेव्हा कोणालाच माहीत नसत. त्यांना ही नाही. पण तेव्हा सोबत कोण कोण करणार हे आपले आधीचे आयुष्य ठरवते. कदाचित म्हणून उतार वयाला पेन्शन प्लॅन आपण म्हणूच शकतो. आपली आयुष्याची जमापुंजी...