मोडलेला संसार-कथा
मोडलेला संसार-कथा
सुप्रिया चांगल्या व श्रीमंत कुटंबात वाढलेली मुलगी होती. त्यामुळे तिला उच्च शिक्षणाची पुरेपुर संधी मिळाली होती. लहान वयात लाडात वाढलेल्या सुप्रियाला दु:ख व कष्टाची जराही जाणीव नव्हती.त्यामुळे स्वतंत्र विचारशैली असलेल्या सुप्रियाला अनेक मित्र व मैत्रीनींचा सहवास लाभला होता.लहानवयात असलेल्या सवयी मोठी झालेली असताना देखील तशाच होत्या.
सुप्रियाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियरची पदवी संपादन केली होती. त्यामुळे तिला वराकडून गर्भश्रीमंत व उच्चशिक्षित लग्नाची स्थळे येऊ लागली. त्यातील एक अतिश्रीमंत स्थळ तिला लग्नासाठी पसंत झाले. वर मुलगा सिव्हिल इंजिनियर होता. गाडी,बंगला सर्व ऐश्वर्य तिच्या पायाशी लोळत होते. सासरची माणसे
संस्कारीत,सुसंस्कृत होती. वर मुलगा सुंदर व स्वभावाने छान होता.मे महिन्याचा मुहूर्त शोधला.तीन मे ला साखरपुडा झाला आणि पंधरा तारखेला त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. हनिमूनसाठी खास विमानाने गोवा टूर वर गोव्याला पोहचले. गोव्याचे आलिशान लॉज त्यानी दहा दिवसासाठी बुक केले होते. त्या ठिकाणी वेज नॉन वेज दोन्ही प्रकारचे जेवण होते.सुंदर समुद्र किनार्यावर सकाळच्या सूर्यकिरणांचा सुंदर समुद्र सोनेरी रंगानी शोभून दिसत होता. दहा दिवस खूप मजेत गेले.
नंतर परतीचा प्रवास परत विमानानेच झाला. मुंबईत असलेल्या आलिशान बंगल्यात त्यांचे वास्तव्य होते. तेथे आल्यानंतर ते एकत्र आले. थोड्याच दिवसात तिचा पती रवी एका सरकारी खात्यात नोकरीला लागला. सुप्रियाच्या आनंदाला पारावार उरला नाही.तिचा सुखी चाललेला संसार ती नेहमी मोबाईलवरून आपल्या वडिलांना सांगत होती.अशाप्रकारे दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते. तिलाही एका लिमिटेड कंपनीत नोकरी मिळाली. त्यामुळे एक आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटूंब झाले होते. पहिल्यापेक्षा दोघांचा पगार येऊ लागल्याने त्यांचे जीवन सुखी समृद्ध झाले होते. तिचे कंपनीत नियमित चालू झाले होते. त्यातच तिच्या मनमोकळा स्वभाव सर्वांना आवडू लागला होता. तिचे हासणे,बोलणे सर्वांना आवडू लागले होते. तिच्या कंपनीत असलेले तिचे वरीष्ठ व्यवस्थापक यांच्या ती अगदी मनात भरली होती. त्यानी तिला आपली सहाय्यक म्हणून ठेवले होते.त्यामुळे तिचे नेहमी बॉसकडे जाणे येणे होऊ लागले होते. दोघांचे विचार,स्वभाव एकमेकाना आवडत होते. त्यातूनच नकळत त्यांची मैत्री जडली. दररोज एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तिला आपल्या घरातील सहवास नकोसा वाटू लागला होता. तिचा नवरा म्हणजे नकोसी असलेली व्यक्ती वाटू लागली. त्यातून तिचे हळूहळू त्याच्यावरील प्रेम कमी होऊ लागले. त्यातून भांडणे, तिरस्कार सुरु झाला होता. दोघानाही आता एकमेकांबद्द्ल प्रेम,आदर ऊरला नव्ह्ता.
शेवटी भांडण एव्हढे विकोपाला गेले की ते घटस्फोटापर्यंत गेले आणि वर्षाच्या आतच दोघांचा घटस्फ़ोट झाला. ही गोष्ट बॉसच्या पत्नीच्या कानावर पोहचली होती. तिने तिच्या नवर्याची कानउघाडणी करायला सुरुवात केली होती.परंतू प्रेमात धूंद झालेले तिचे पती कोणाचे काही ऐकत नव्हते.त्यांच्या लग्नाला वीस वर्षे झाली होती. तिनेही त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. दोघांचे, सुप्रिया आणि रमेशचे प्रेमप्रकरण कंपनीत चर्चेचा विषय बनला होता. आता दोघांनी ही चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. ते पुण्यात जाऊन नोकरी करू लागले होते.पण प्रेम एव्हढे पक्के होते की तिला त्याच्यापासून एक अपत्य झाले व ते सुखी संसार करू लागले होते.
त्यांच्या दोघांमुळे रमेशची पत्नी दु:खी झाली होती. रवीचा संसार अर्ध्यातच मोडला होता.