मेरा भाई तू मेरी जान हे...
मेरा भाई तू मेरी जान हे...
भाऊ... शब्दच असा आहे ना हा... ज्यात एका मुलीचं... एका सासुरवाशिनीचं... एका भावावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणीचं पूर्ण विश्व सामावलेलं असतं... जेव्हा कोणी नसतं ना... तेव्हा हा भाऊच असतो, जो खंबीर उभा असतो बहिणीच्या पाठीमागे... मग कितीही मोठे संकट असो... आई-वडिलांच्या माघारी हा एकच दुवा असा आहे जो आपल्या नाळेशी जोडला गेला आहे... प्रत्यक्षरीत्या वा अप्रत्यक्षरीत्या खूप साऱ्या बहिणी आपल्या भावावर जीवापाड प्रेम करत असतात आणि भाऊ दाखवून नाही देत पण बहिणीपेक्षा जास्त प्रेम तर तो करत असतो तिच्यावर... आणि बहिणींनो आज रक्षाबंधन... घरी गेलात ना पहिलं आई-वडिलांचे आभार माना... त्यांनी आपला पाठीराखा आपला भाऊ दिला आपल्याला... जेव्हापासून मी समजतेय ना माझ्या भावाला, मनात बस हाच विचार येतो... पहिलं आईचे आभार मानावेत... नाहीतर भावा-बहिणीतलं गोड नातं समजलंच नसतं... म्हणतात ना काही गोष्टी कळण्याचं एक वय असतं... ते वय आलं की सगळं आपोआप समजत जातं... निदान माझ्याबाबतीत तर हेच आहे... माझ्या वयाचे टप्पे जसे पुढे पुढे जातायत तसं तसं अक्कल वाढतेय म्हटलं तरी चालेल... आणि माझ्या भावाच्या प्रेमाच्या बाबतीत पण हेच आहे.
खरंतर लहानपणापासून मी केव्हा नव्हतेच आई-पप्पाबरोबर... ना भाऊ-बहिणीबरोबर... आता खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आयुष्यातला थोडा तरी काळ मला त्यांच्याबरोबर राहता यायला हवं होतं... तेवढंच अजून प्रेम केलं असतं मी माझ्या भावावर, बहिणीवर... चुलते बाहेरगावी असतात त्यांच्याकडे पाठवलं होतं मला शाळेला... मग अनायासे माझं प्रेमही त्यांच्या मुलांवर जास्त... मला तर आठवतही नाही जेवढं मी काकांच्या मुलांना जवळ घेतलं तेवढं माझ्या भाऊ-बहिणीला घेतलंही असेल... पण कितीही लांब असेल जरी प्रेम जास्त नसेल तरी रक्ताचं नातं आपोआप जवळ ओढलं जातं... तसंच काहीसं झालं माझ्या बाबतीत... दुसऱ्या डिलिव्हरीवेळी मला आईकडे जाता नाही आलं... काही पर्सनल प्रॉब्लेममुळे... नंतर आठवड्याने मी सासरी आले छोट्याशा बाळाला घेऊन... तिथे दोन-तीन दिवस राहून मी जाणारच होतें आईकडे... तरीही तो आला...
माझं माहेर आणि सासर खूप लांब लांब आहेत... उन्हातून... बाईकवरून मित्राला घेऊन... तो असंही म्हणू शकला असता, ती येणारच आहे ना मग इथेच भेटू... पण तो आला... हाच क्षण मनाला कलाटणी देऊन गेला माझ्या... एवढे दिवस लांब होतो... म्हणजे मी असेन मनाने... बस या एका गोष्टीने... एवढा आदर एवढं प्रेम निर्माण केलं त्याच्याविषयी माझ्या मनात... मी असेपर्यंत संपणार नाही ते... खूप हायसं वाटलं तो आल्यावर... त्याला बघून... मग मनात विचार येतो... नसताच जर मला भाऊ मग कोण आलं असतं मला एवढया लांबून भेटायला... मला सगळेजण म्हणतात बस झाल्या दोन पोरीं... मला स्वतःला माहितीय मला खूप त्रास सहन करावा लागणारेय... पण मग... माझ्यासाठी जसा माझा भाऊ धावत आला... माझ्या पोरीसाठी कोण येणार मग... हीच गोष्ट आहे जी मला विचार करायला भाग पाडते... एवढ्या बाबतीत मला कमनशिबी म्हणावं लागेल आयुष्यातील 28 वर्षात बस चार-पाच वेळाच मी राखी बांधली असेल माझ्या भावाला... आता पाठवतेच की त्याला राखी न चुकता पण जवळून बांधणं आणि पाठवणं यात खूप फरक आहे... पण चला मनात खंत तर राहत नाही की मी त्याला एक राखीदेखील पाठवू शकत नाही... राखी न चुकता पाठवण्यामागेही एक कारण आहे... सासरी एकत्र कुटुंब... जावा भावा... मग स्पर्धा तिने केलं, मी पण करणार...
एक वर्ष मी त्याला राखी पाठवलीच नाही... म्हटलं मी नाही पाठवणार मग या दोघीदेखील नाहीत पाठवायच्या... स्वार्थ खरा माझा होता... मनात पाप माझ्या आलं... पण माझ्या असं वागण्यामुळे माझ्या भावाला किती वाईट वाटलं असेल याचा विचार मी केलाच नाही. रक्षाबंधन दिवशी मी फोन केला त्याला... म्हटलं, सॉरी अरे मी राखी पाठवली नाही... तुला... हे सगळं का... तर तेव्हा एवढी कनेक्ट नव्हतेच मी त्याच्याबर. प्रेम काकांच्या मुलावर केलं ना... हा म्हणाला ठीक आहे नाही पाठवली... पण वाईट खूप वाटलं अगं... "दोन दोन बहिणी असून हातात एक पण राखी नाही..." असले काळजात गेले ते शब्द...
मला वाटलं याला काही फरक नाही पडणार मी त्याला राखी नाही पाठवली तरी असं बोलूनही दाखवलं त्याला... पण त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं असणार... त्याच्यापेक्षा जास्त मला... स्वतःचा एवढा राग आला... कसली बहीण मी स्वतःच्या भावाला एक राखी नाही पाठवू शकत... बस आजतागायत... मी चुकले नाही... त्याला राखी पाठवायला... हा एक धागाच तर आहे... जो बांधून ठेवतो... एकमेकांना अगदी घट्ट... अजून एकदा एका राखीला मी होते गावी... हा अजून जॉबला नव्हता लागला... मी राखी बांधली... त्याने पाच रु. चा सिक्का ठेवला ताटात... म्हणाला जेव्हा कमविण तेव्हा हवं ते माग घेऊन देईन... त्याने ते करूनही दाखवलं... बहिणीच्या लग्नात असली छान पैठणी घेतली त्याने मला... आणि ब्लाऊजची शिलाई पण त्यानेच दिली... आणि हो तो सिक्का अजून जपून ठेवलाय मी माझ्याजवळ... यासाठी की ती पहिली ओवाळणी होती माझ्या भावाकडून मला आणि दुसरं... त्या सिक्याला मला दाखवायचंय...
खूप मोठा झालाय माझा भाऊ आता... तुझ्यासारखे हजार सिक्के देईल तो मला आता ओवाळणीत... कमी समजू नकोस तू त्याला... एवढं सगळं मी लिहितेय... पण याहीवेळी नाही तो माझ्याजवळ... मी कुठे... तो कुठे... याहीवेळी नाही बांधू शकणार मी राखी त्याला... हो पण आठवणीने राखी पाठवलीय मी त्याला... छोट्या बहिणीकडून बांधून घे म्हटलेय... आणि मला त्याला "भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना" पण नाही म्हणायचं... कारण मला माहितेय... माझ्या म्हणण्याआधी तो माझ्यासाठी उभा असणार आहे... माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत... खूप सारं मिस यू माझ्या लाडक्या... एकुलत्या एक भावा... तू आहेस तर मी आहे... आय लव्ह यू...