vaishu Patil

Inspirational

3.4  

vaishu Patil

Inspirational

तळमळ ...

तळमळ ...

3 mins
117


तळमळ… लॉकडाऊनमुळे लाडक्या भावाच्या लग्नाला न जाऊ शकलेल्या बहिणीची…


तुम्हाला वाटतं कधी हा विचार तरी केला असेल का आपण... की सगळं जग आहे त्या जागेवर थांबू शकतं... शिक्षण, व्यवसाय, नोकरी… शाळा, मनोरंजनाची साधने… सगळं, सगळं काही जागच्या जागेवर थांबलं आहे… एवढुशा आजाराने करून दाखवलं ते, सामान्यजनांच्या नजरेसही येणार नाही असे ते विषाणू... अख्ख जग त्रस्त करून सोडलं... या विषाणूने… वारेमाप जीव गेले... कुटुंबे उद्ध्वस्त झाली… या आजाराची भीती तर त्यापेक्षाही जीवघेणी...


पण हे जीवनच असं आहे... इथे आता एक नि पुढच्या क्षणाला काय असेल… आपण जीवंत तरी असू की नाही हेदेखील सांगू शकत नाही... विषाणूंचा जीवघेणा दुष्ट फेरा चालूच आहे… पण, लोकं यातही जगायला शिकलेत... शिकून घेतायत... कारण हे संकटं इतक्या लवकर पाठ सोडणाऱ्यातलं नाही…


जगतायतं आपल्याला परीने… सगळेजण... पण म्हणतात ना दुरून डोंगर साजरे... तशी गत सगळ्यांची… वेळ आपल्यावर येत नाही तोवर त्या वेळेचं महत्त्व... किंमत आपल्याला कळत नाही… मीच नव्हे सगळेजण… यातून जातायत...


सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे आज काल... विचारांची, गप्पा-गोष्टींची... खुशालीची, काळजीची… देवाणघेवाण करण्याचा एकच पर्याय म्हणजे सोशल नेटवर्क…


पर्यायी मीही असते इकडे... आपलं दुखणं, हसणं, रडणं सांगायला... आता यात ऐकून घेणारे किती आहेत… आहेत तरी की नाही विचार करण्याची गोष्ट आहे खरी... पण मी असते...


असंच, मग… लॉकडाऊनमध्ये... सोशल डिस्टन्सिंग पाळत…वधु-वर... लग्नाच्या बंधनात... जास्त गर्दी न करता, मास्कचा वापर करत, नवरा-नवरीचे लग्न यथासांग पार पडले... आणि या न्यूजबरोबर लग्न झालेल्या नवरा-नवरीचा फोटोदेखील… मी ते बघून खुश व्हायचे… बरं झालं खर्च वाचला…


वा वा... असं लग्न पुन्हा होणार नाही… मास्क लावून लग्न करायला पण भारी मज्जा राव…


माझे हे अतिशय उच्च कोटीचे विचार असले तरी जेव्हा वेळ आपल्यावर येते, खरं तर तेव्हा या गोष्टींचं महत्त्व काय आहे ते कळतं... आणि बरोबर माझ्या एकुलत्या एक लाडक्या भावाचं लग्न लॉकडाऊनच्या शुभमुहूर्तावर ठरलं… घे अजून मजा, दुसऱ्या लग्न झालेल्या मुलामुलींची… अशी माझी गत...


इकडे लॉकडाऊन... तिकडे कोरोना…

पडलं तरी लागणार, चाललं तरी लागणार…


बसलेय मग मी गप जिकडे आहे तिकडे… दुसरी बहीणही तिच्या सासरी आणि भाऊ आपला एकटा… चौदा दिवस क्वारंटाइन राहून करतोय एकटाच आपल्या लग्नाची तयारी…


ना मित्र, ना बहिणी, ना नातेवाईक… तो एकटा आणि लग्नानंतर घरी घेऊन येईल ती त्याची बायको...


ना लायटिंग, ना मंडप, ना बेंड बाजा... ना करवल्यांचा चिवचिवाट... ना मित्रांचा गोंगाट... ना बाई मी मोठा गजरा माळणार, हे आवाज... काहीच नाही… ना त्याला लावता येणारी हळद, ना त्याच्या अंगावर आमच्याकडून पडू शकणाऱ्या अक्षदा… 


सेम सिच्युएशन, जेव्हा धाकट्या बाळराजांचं लग्न तिकडे चालू असतं, नि शंभूराजे इकडे दुसरीकडे गडावर उभं राहून, येसूबाईंना म्हणतायत… या, आपण इथूनच टाकूया, बाळराजांच्या मस्तकी अक्षदा…


तो सीन बघतानाच्या भावना, आता समजतायत… येसूबाई एवढ्या व्याकुळ का होत्या… का जीव तुटत होता त्यांचा… 


आता मी रडूही शकत नाही, मंगल प्रसंगी... त्यामुळे डोळ्यात आलेले थेंब मागच्या मागे परतवावे लागतायत…


आज लग्न माझ्या भावाचं… २६ जुलै २०२०


काही चार शब्द त्याच्यासाठी...


खूप खूप खुश आहे भावा मी... प्रत्येक बहिणीचं स्वप्न असतं... आपला भाऊ आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखी राहावा... माझीही तिच भोळी-भाबडी इच्छा... जिथे तुझं सुख तिथे आमचं सुख... सोबत जरी नसले तरी मन मात्र तिथेच आहे तुझ्यासोबत, तुझी करवली म्हणून... तुझ्या हातावर मेहंदी काढायला, तुला हळद लावायला, मुंडावळ्या बांधायला...


माहीत आहे पुन्हा एकदा हक्काची करवली म्हणून मिरवण्याचा मान नाही मिळणार. पण आहे ती परिस्थिती स्विकार करणं गरजेचं आहे... बहिणी जवळ नाहीत म्हणून निराश होऊ नकोस माझ्या लाडक्या भावा... सर्व विधी यथासांग पार पडू देत... वहिनीला घरी घेऊन ये...काळजीने... प्रेमाने...


वातावरण निवळल्यावर भेट काय होईलच, नक्की... जवळ असते तर खूप काही देता आलं असतं, प्रेम, माया, जिव्हाळा, आठवणी... लांबून फक्त शुभाशीर्वाद…


आयुष्याच्या मंगलप्रसंगी तुझे जवळचे जवळ नसताना एकट्याने सर्व सांभाळणं मोठी कसोटी आहे. प्रत्येक प्रसंगी ठाम उभा राहिला, ही कसोटीदेखील तू ठामपणे पूर्ण करशील, खात्री आहे मला... सुखी राहा बाळा... खूप सारं प्रेम, खूप सारे शुभाशीर्वाद... अशा शुभप्रसंगी डोळ्यात अश्रू येऊ देणं चुकीचं आहे, पण हे अश्रू तुझ्या जवळ नसण्याचे आणि तुझ्यासाठी खुशीचे दोन्ही आहेत...


Lots of love my brave boy, miss u बहोत सारा… 


तुझीच ताई...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational