मानवतेचा दिवा- अनमोल ठेवा
मानवतेचा दिवा- अनमोल ठेवा
अगं पल्लवी तुझी पहिली दिवाळी ना यंदा काय केले तूला सासूबाईंनी..पल्लवीच्या काकूने अगदी खोचटपणे विचारले..
पल्लवी आणि प्रथमेश यांचा प्रेम विवाह.. प्रथमेशच्या घरची परिस्थिती तशी बरी होती.. पण सोन्याचा हव्यास नव्हता कि दागदागिने यांची आवड..
सासू सासरे दोघेही पेशाने डॉक्टर.. पण समाजसेवेची एवढी आवड होती की, फी जास्त घ्यायचे नाही की कसली लुटालुट नाही.. कोणाची परिस्थिती नसेल तर त्याच्यावर उपचार देखील मोफत करत होते..
प्रथमेश डॉक्टर होता, त्याने मोठ्या प्रमाणावर काहीतरी कराव असे पल्लवीला वाटायचे.. तिने लॅबचा कोर्स केला होता, स्वतःची लॅब ती चालवत होती..
प्रथमेशचे आई बाबा दोघेही अगदी साधे, प्रेम आहे समजल्यावर त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला.. डॉक्टर मुलगी मिळाली असती, घाई केलीस अश्या एका शब्दानेही तक्रार केली नाही त्यांनी..
पल्लवी हळू हळू घरात रूळत होती.. पण तीच्या आवडी-निवडी यांच्या समाजकार्याच्या आवडीपुढे मागे पडत होत्या.. सुरवातीला तिची चिडचिड व्हायची.. पण आपल्या सासू-सासरे यांनी जी माणसांची श्रीमंती जमवली होती ती किती लाखमोलाची आहे तें तिला हळू हळू समजत होते..
लग्न झाल्यावर प्रत्येक सणावाराचे एक वेगळेच रुप तीच्या सासूबाईंमुळे बघायला मिळत होते..
संक्रातीला त्यांनी आरोग्यविषयक जागॄतीसाठी दिलेले पुस्तकरूपी वाण.. तर आदिवासी पाड्यावर जाऊन सॅनिटरी पॅड यांच वाण म्हणून वाटप करताना त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.. होळीच्या निमित्ताने ज्यांच्या आयुष्यात विधवारूपी पांढरा रंग पसरलाय ज्यांच्या आयुष्यात या समाजाने रंगाना बेदखल केलंय अश्या विधवा आश्रमात जाऊन साजरी केलेली होळी.. त्यांनी बचतगटातून तयार केलेल्या वस्तू क्लिनीक बाहेर विकण्यासाठी ठेवणे.. तसेच त्या बायकांना विविध रंगाचे रिळ देऊन दवाखान्यात लागणार्या वस्तू शिवायला सांगणे...
वटपौर्णिमेचे निमित्ताने फांदी न तोडता वडाची झाडे लावुन साजरी केलेली आगळी-वेगळी वटपौर्णिमा..
गौरी-गणपतीत तर जवळच असलेल्या वॄद्धाश्रमांना भेट देणं, तिथल्या वॄद्धांसोबत गणेशोत्सव साजरा करून त्यांच्या सोबत पत्ते खेळणे.. पारंपारिक गाणी म्हणणे..
नवरात्रीत नऊ दिवस आपला संसार नीट चालवा म्हणून कठीण परीस्थितीवर मात करत ऊभे राहून जीवापाड कष्ट करून संसारचं रहाटगाडगे चालवणार्या आदिशक्तीचे रूप असलेल्या स्त्रीयांचा योग्य तो सत्कार करणे..
सुरवातीला पल्लवीला ह्या सर्व गोष्टींचा राग यायचा, दिखावा वाटायचा.. पण हळु हळू तिला सुद्धा या गोष्टी आवडायला लागल्या..
दिवाळीत तर काय करतायत ह्याची उत्सुकता होती तिला.. सासू सासरे यांनी जवळच असलेल्या अपंग मुलांच्या शाळेत जाऊन त्यांनी तयार केलेले आकाश कंदील आणि रंगवलेल्या पणत्या यांची खरेदी केली. विधवा आश्रमातील महिलांनी तयार केलेला फराळ आणि काही शोभेच्या वस्तू खरेदी केल्या.. जवळच असलेल्या अनाथआश्रमात दिले तसेच आदिवासी पाड्यावर जाऊन स्वतः वाटप केले.. दिवाळीचे चार दिवस वेगवेगळ्या प्रकारची समाजसेवा करून दुसऱ्यांचे आयुष्य तेजोमय करणारी दिवाळी पाहून तिला खूप आनंद झाला...
भाऊबीजेसाठी माहेरी आली असता, काकूने खोचकपणे विचारलेला हा प्रश्न ऐकून तिने हे चार दिवस तसेच लग्न झाल्यावरचे ११ महिने आठवून काकूला अगदी हसत उत्तर दिले. सोन,नाणे, पैसा अडका ह्यांनी सुद्धा कोठार भरणार नाही एवढी माणसांची श्रीमंती आहे माझ्या सासरी.. त्यांनी मला माणुसकी जतन करण्याचा अनमोल ठेवा दिलाय.. जो कायम अक्षय असेल, अशी श्रीमंती जी कधीच संपणार नाही..
आईला आज लेकीच्या चेहऱ्यावर आलेले समाधानाचे तेज बघून वेगळेच समाधान मिळाले.. पण आनंदात मीठाचा खडा टाकावा म्हणून काकूने परत कुत्सितपणे टोमणा मारला, देताय म्हणून माणसे आहेत.. देण बंद झालं की कसे पाठ फिरवतील बघ.. माणसाची जात कधी ना कधी उलटी फिरणारच...
पल्लवीने शांत रहाणे पसंत केले.. काहीच बोलली नाही..
काही दिवसांनी पल्लवीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आई, बाबा यांच्या सोबत काकू, काका आणि त्यांचा मुलगा मुद्दामून तिच्या घरी आले.. काकूला मुलगा असल्यामुळे आजीनं पहिल्यापासूनच लाडावून ठेवले होते त्यामुळे पल्लवी आणि तिच्या बहिणीला काकू पाण्यात बघायची.. मुलाच मात्र फार कौतुक...
संध्याकाळी आई सोबत काकू मुद्दाम थांबली.. काका आणि त्यांचा मुलगा जायला निघाले, संध्याकाळची वेळ शेतातील पाखरे खूप त्रास द्यायची. पल्लवीने सांगून बघितलं.. पण ऐकेल तो विकी कसला...
विकी गाडी चालवत होता, काका मागे बसले होते.. डोळ्यात पाखरू गेले आणि गाडीवरचा ताबा सुटला.. दोघांच्या डोक्याला खूप मार लागला. आजूबाजूला असणारी माणसे स्वतःच्या गाडी बाजूला ठेवून धावून आली. कोणीतरी एकाने त्यांना ओळखले.. पल्लवी वहीनींचा भाऊ म्हणून सर्वानी मदत केली.. मदतीचे एवढे हात पुढे आल्यावर सर्व गोष्टी कशा पटकन झाल्या..
काकूला समजल्यावर काकू मटकन खालीच बसली.. समाजसेवेची आवड असल्यामुळे एवढ्या ओळखी होत्या की कशाची कमी पडली नाही, प्रथमेशने प्राथमिक
उपचार करून शहरात पाठवायचे ठरवले.. ओळखीने सर्व अगदी पटापट झाले. आज काकू पल्लवीच्या सासरच्या माणसांची श्रीमंती पाहून थक्क झाली.. तिला तीच्या विचारांची लाज वाटली..
तिने चार दिवस साजरी केलेली दिवाळी ऐकून तिला लावलेले बोल तिला ह्या दवाखान्यात घालवलेल्या आठ दिवसात सारखेच आठवत होते. ती खूप खजील झाली..
तिने पल्लवीची माफी मागितली, पोरी.. मी चुकले.. मी तूला सणावारी रोखून बोलले.. पण मी वेडी दिवाळीचे ते चार दिवस फक्त माझ्या घरातला अंधार दूर करत बसले.. मनातल्या अंधाराच काय?
तू मात्र तुझ्या सासरच्या माणसांसोबत जो माणुसकीचा दिवा लावलास त्याच्या तेजाने आज खरच माझ्या मनातला वाईट विचारांचा अंधार दूर पळून गेला...
पल्लवीने काकूचा हात हातात घेतला आणि म्हणाली, झाल तें झाल काकू आता अशी बसू नकोसं.. माणसांची श्रीमंती इथून पुढे नक्की जप.. अनमोल ठेवा असतो तो...!!!