kanchan chabukswar

Crime

4.6  

kanchan chabukswar

Crime

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. “

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. “

11 mins
1.1K


दिवाळीचे दिवस, पंढरपूर दिवाळी म्हणजे खूपच मजा असायची, त्यातून पाटलांच्या श्रीमंत बंगल्यामध्ये, बँक मॅनेजर गांधी यांचे घरोब्याचे संबंध. पंढरपूरच्या बँकेमध्ये गांधी मॅनेजर म्हणून आले, तेव्हापासून अण्णा पाटील यांच्याबरोबर त्यांचे फारच घनिष्ठ संबंध झाले. त्याचं कारणही होतं, पाटलांचा मोठा मुलगा श्रीरंग आणि गांधीचा मुलगा राहुल एकाच वर्गात शिकत होते. तसेच पाटलांची मुलगी रागिनी आणि गांधीची मुलगी अंजली या पण एकत्र शिकत होत्या, विजू ताई पाटील शाळेत जायचा तेव्हा गांधी ची सौभाग्यवती सोनिया यांच्याबरोबर त्यांची फारच मैत्री झाली. गांधी तसे सज्जन, मनमिळावू स्वभाव, गोड बोलणे, बँकेच्या अधिकाऱ्याला योग्य. तर अण्णा पाटील पक्के मुरलेले राजकारणी, भरपूर शेती, साखर कारखाना, आणी बराच काही पसारा, अण्णा पाटलांचं पंढरपुरात वजन होत. विठ्ठलाची साग्रसंगीत पूजा त्यांच्या हातून बऱ्याच वेळेला होत असे, तसेच दानधर्म, अनाथालयाला देणगी, पंढरपुरातली लायब्ररी, पाटलांच्या घरून घसघशीत दान दिले जात असे. बँकेचे तर बँकेच्या मॅनेजरला तर घरचाच नातेवाईक समजून पाटील यांच्याकडे कायमच जेवण, हुरडा पार्टी, आणि असे काही ना काही तरी कार्यक्रमाचे आयोजन करून बोलावणे असे. नवीन येणाऱ्या मॅनेजरला नाही म्हणायचं काहीच कारण नसे.

विजू ताई सोनिया साठी भारी भारी भेटवस्तू आणत, भारी पर्स, मेकअपचे सामान, मिठाईचे बॉक्स, तसेच पाटील कुटुंब कुठे फिरायला गेले तर सगळ्या ओळखीच्या व्यक्तींसाठी काहीना काही भेटवस्तू जरुर आणणार. विजू ताई फार सज्जन, अंगावर हिऱ्या-मोत्याचे ना दागिने घालून मिरवत. 5 वर्षानंतर गांधी यांची पंढरपूरहून बदली झाली.

 श्रीरंग आणि राहुल पुण्याला होस्टेलमध्ये शिकायला गेले, त्यामुळे त्यांची तर फारच दोस्ती झाली, आणि विजू ताई आणि सोनियांची पण मैत्री कायम राहिली. दसरा-दिवाळी, संक्रांत, कायम भेटवस्तूंचा आदानप्रदान होत. बऱ्याच वेळेला सोनिया पंढरपुरात महिना पंधरा दिवसात राहायला जात.

 रागिनी आणि अंजली दोघेही मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला गेल्या. अण्णा पाटलांनी रागिनी प्रमाणेच अंजलीची पण काळजी घेतली.

 श्रीरंग इंजिनीयर झाल्यावर मॅनेजमेंट करून अण्णासाहेबांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली होती. राहुल इंजिनियर झाल्यावर दुबई ला निघून गेला. त्याला चांगल्या नोकरीची संधी तिकडे मिळाली आणि तो आता चार-पाच वर्ष, दुबई, व इतर ठिकाणी काम करत होता.

 रागिनी आणि अंजली दोघीही डॉक्टर झाल्या होत्या आणि एमडी ची तयारी करत होत्या.

सुट्टीच्या वेळेला अंजली देखील रागिनी बरोबर पंढरपूर येत होती.

दोन्ही कुटुंब दिवाळी एकत्र साजरी करत. भावाभावांमध्ये सख्य नसेल एवढे एवढे गुळपीठ पाटील आणि गांधीं कुटुंब झाले होते. त्याचं कारणही होतं आणि सोनिया आणि विजू ताई यांनी आपले संबंध फारच चांगले ठेवले होते. कायम होणाऱ्या भेटी, नाहीतर फोन वर गप्पा, विजू ताई सोनियाला आपली धाकटी बहीण समजत होत्या. राहुल दुबईला गेल्यानंतर त्यांना एकटे वाटू नये म्हणून विजू ताई हक्कानी दिवाळीला गांधीं कुटुंबीयांना पंढरपूरला बोलवत. इतके की त्यांची लक्ष्मीपूजन देखील सगळे दागिने एकत्र ठेवून होत असे.

दिवाळीला एकत्र असणं हा दोन्ही कुटुंबांचा एक पायंडाच पडला. आणि दिवाळी पंढरपूर मधल्या पाटलांचा नवीन बंगल्यावर साजरी व्हायची. लक्ष्मीपूजनाचा थाट तर और असायचा .

 धनत्रयोदशीला मध्यरात्री कारभाराच्या सगळ्या चोपड्या, काही मोजके दागिने अशी पूजा चालायची.

या वर्षीची दिवाळी पण विशेष आनंदाची होती, अंजलीला पाटील कुटुंब सून करून घेणार होतो. अंजली आणि श्रीरंग विशेष आनंदात होते. राहुल नुकताच दुबईहून परत आला होता, येताना त्यानी 12 सोन्याची बिस्किट आणली होती.

धनत्रयोदशीला मध्यरात्री चौरंगावर सगळं काही मांडून विशेष आनंदात पूजा झाली.

भीमा गड्याला अण्णासाहेबांनी सांगितले “ पहाटेच उठून पाणी तापवण्यासाठी तयारी कर “कारण दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी होती.

अण्णा पाटलांचे भाऊ, सदाशिव, वहिनी प्रमिलाबाई, त्यांचा मुलगा आनंद आणि गोपाळ तसेच अण्णांची धाकटी बहीण, रुक्मिणी तिचे पती यांच्याबरोबर आलेली होती.

अण्णांचा मोठा बंगला, बंगल्याच्या मागे ोकर्‍यांच्या खोल्या, मोठी सरपणाची खोली, चौकीदार, आणि दोन शिकारी कुत्री. गोठ्यामध्ये चार गाई आणि म्हशी देखील .

      अण्णांच्या बंगल्याची रचनादेखील काहीशी वेगळी होती, माडीवरती अण्णा, श्रीरंग आणि अजून दोन, एकंदर चार शयनकक्ष होते. माडीवर जाण्यासाठी जिन्यामध्ये एक भरभक्कम लोखंडी दार होते जे रात्री अण्णा लावून घेत. अण्णांची खोली आणि श्रीरंगाच्या खोलीच्या मध्ये भिंती मध्ये एक अदृश्य , मुख्य तिजोरी होती. जडजवाहीर, पैसा-अडका, दोन्ही तिजोरी यांमध्ये विभागून ठेवल्या जात.

खालच्या मजल्यावरती, पाहुण्यांसाठी तीन खोल्या, प्रशस्त देवघर, मागील बाजूस प्रचंड मोठे स्वयंपाक घर, जेवण घर, दोन हॉल, आणि चार बाथरूम.

तळमजल्यावरती अण्णांची विशिष्ट खोली होती, बँकेच्या लॉकर सारखी भरभक्कम होती. तळमजल्यावर ती दोन प्रचंड हॉल आणि अण्णांचे ऑफिस दप्तर होते.


उशिरा पूजा झाल्यामुळे, मंडळी झोपण्यास गेली.

विजू ताईंनी नरकचतुर्दशीच्या आंघोळीची तयारी, फराळाचे डबे वगैरे तयारी ठेवूनच झोपायला गेल्या.

रात्रीचे अडीच वाजले होते, अचानक कुऱ्हाडीने लाकडे तोडायचा आवाज यायला लागला. अण्णा साहेबांना जाग आली, त्यांना वाटलं भीम गडी आंघोळीची तयारी करण्यासाठी लाकडे तोडत आहे. त्यांनी काही लक्ष दिले नाही. त्याच्यानंतर त्यांना गाढ झोप लागली.

गांधी ,राहुल आणि सोनिया, देवघराच्या बाजूच्या खोलीमध्ये झोपले होते. लाकडे तोडण्याच्या आवाजांनी गांधी यांना जाग आली, पण कुत्रे ओरडले नाहीत, भुंकले नाहीत त्यामुळे त्यांना वाटले की गडीमाणसं आंघोळीची तयारी करत आहेत.

तोंडावर पांघरूण घेऊन गांधी परत झोपले. अंजली आणि रागिनी वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये झोपल्या होत्या. त्यांना काय झालं समजले देखील नाही.

सप सप, लाकडे तोडायचा आवाज येऊ लागला. बाहेरचा अंगणामध्ये फटाक्यांची लड उठले उठली. फटाके मध्ये मध्ये लक्ष्मी बॉम्ब आणि त्याच्याबरोबर लाकडे तोडायचा आवाज.

अचानक अण्णांचा बंगला हादरला. बाहेरच्या लक्ष्मी बॉम्ब बरोबर अजून एक धमाका झाला होता.

तरीपण सारी मंडळी त्यामुळे उशिरा झोपल्यामुळे झोपेतच होती.

 

      बाहेरच्या फटाक्यांच्या आवाजामुळे हिरा आणि मोती कोई कोई आवाज करत ओरडू लागले आणि नंतर गप्प झाले.


सोनिया बाथरूमला जाण्यासाठी उठली, देवघर ओलांडून बाथरूम कडे जाताना तिला स्वयंपाक घरात हालचाल जाणवली.

" मी येते बरं , मदतीला विजू ताई," असं म्हणत बाथरूम मध्ये घुसली.

     अचानक घरातले दिवे गेले. सोनिया बाथरुम मध्ये अडकून पडली. ठोक !ठोक ! दरवाजा ठोकला, बाहेर पळापळ जाणवत होती. पण कोणी दार उघडलं नाही. खालच्या मजल्यावर चा ओरडा ऐकून, अण्णासाहेबांनी आपल्या खोली मधला सीसीटीव्ही चालू केला. घरात चाललेल्या परिस्थितीचे त्यांना कल्पना आली, त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला. दरोडेखोरांना हे माहिती नव्हतं वरच्या मजल्यावर विजेचे कनेक्शन वेगळे आहे.


        ½ तास गेल्यावरती अचानक सायरन चा आवाज बाहेर झाला. घरातले दिवे लागले होते. कोणीतरी बाथरूमचं दार उघडलं, सोनिया बाहेर आली, पुढचं दृश्य बघून तिची दातखीळ बसली. भोवळ येऊन ती खाली पडली. 

बंगल्याच्या पुढचा दरवाजा कुऱ्हाडीचा वाराने तोडला होता.

गांधीं आणि राहुल यांचे डोके धडावेगळे झाले होते. दोघही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

सदाशिवराव तसेच अनंतराव जबरदस्त जखमी होते. फटाक्याच्या आणि लाकडे तोडण्याच्या आवाजामुळे सदाशिवराव आणि अनंतराव दोघे जागे झाले होते, पाच-सहा दरोडेखोर, काळे कपडे आणि माकड टोप्या घालून घरात शिरले होते.

सदाशिवराव यांना कोपऱ्यात पकडून तिजोरी चा पत्ता मागत होते. ओरडणाऱ्या त्रिंबक रावांना डोक्यात दंडुके मारून बेशुद्ध पाडले होते. रुक्मिणी आणि प्रमिला चा नाकापुढे रुमाल पकडून दोघींना कोठी च्या खोलीमध्ये नेऊन बांधून ठेवले होते. अंगावरचे दागिने घेऊन , चोरांनी त्यांना मुका मार दिला होता, त्यामुळे

 रुक्मिणीबाई आणि प्रमिलाबाई बेशुद्ध पडल्या होत्या. रात्री झोपताना दागिने काढून ठेवायची पद्धत असल्यामुळे काकू आणि आत्याच्या अंगावरती फारसे दागिने नव्हते.


बंगल्यावर दरोडा पडला होता. धनत्रयोदशीला ठेवलेले पूजेतली सगळे सामान नाहीसे झाले होते. दरोडेखोरांनी दोन्ही कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालून झोपवले होतं. भीमा गडी हात पाय बांधलेल्या अवस्थेत वृंदावनाच्या मागे पडला होता.

प्रतिकार करणाऱ्या सगळ्यांना दरोडेखोरांनी कुर्‍हाडीने मारले होते. गोपाळने अण्णासाहेबांना हाक मारल्यानंतर, खालची गडबड ऐकून, श्रीरंगाने आपले पिस्तुल काढलं, पळून जाणाऱ्या गुंडांवरती त्यानी गोळीबार केला, त्यातल्या एकाच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो खाली पडला आणि गोपाळ आणि श्रीरंगाने त्याला खाली पाडून पकडून ठेवले.

हाताला लागेल ते सामान घेऊन दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण श्रीरंग नी त्यांच्यापैकी एकाला पकडले. बाकीचे सगळेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. बंगल्याच्या मागच्या बाजूला त्यांनी आपल्या मोटर सायकल तयार ठेवल्या होत्या. त्याच्यावर बसून ते फरार झाले.

पोलिसांनी जखमींना ताबडतोब पंढरपूरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. झालेल्या गोष्टीचा पंचनामा करून, एका दरोडेखोराला ताब्यात घेऊन पोलीस परत गेले.

दरोडेखोराच्या तोंडावर असलेली माकड टोपी पोलिसांनी वर केली, तेव्हा अण्णासाहेबांना अतिशय धक्का बसला.


राहुल बरोबर आलेल्या मित्रांपैकी तो अली खान होता.


राहुलच्या बरोबर आलेले चार मित्र अण्णासाहेबांना अजिबात आवडले नव्हते. दिवाळी हा कौटुंबिक सण होता, त्यातून त्यांचे बंधू आणि धाकटी बहीण पण घरी आलेली होती. गांधीं कुटुंब जरी नवीन नात्यात बांधले जाणार होते तरीपण अचानक आलेले पाहुणे अण्णा साहेबांना आवडले नव्हते.

राहुल चे मित्र कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यापेक्षा, अण्णासाहेबांचा बंगला हिंडून बघण्या मध्येच मग्न होते. कुठे दरवाजे आहेत कुठे खिडक्या आहेत, सुरक्षेची काय काळजी आहे, आणि अण्णासाहेब किती श्रीमंत आहेत, याची जणू काही चौकशी करत होते. दुसऱ्या दिवशी राहुल आणि श्रीरंग बरोबर त्यांचा शेतावरती जायचा पण बेत होता. मित्र तर रात्री बंगल्यातच राहायचा प्रयत्न करत होते, पण अण्णासाहेबांनी निक्षून नाही म्हटले होते, म्हणून राहुल आणि श्रीरंग ने त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली होती.


            सोनियांच्या समोरून सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलेले भविष्य तरळून गेले.

"तुमच्या मुलीच्या भविष्यामध्ये सगळ्यात मोठी अडकाठी तिचा भाऊच करणार आहे." हे जेव्हा सहस्त्रबुद्धे म्हणाले होते तेव्हा सोनियांच्या डोळ्यापुढे काळोख दाटला होता.

अंजली च लग्न श्रीरंग बरोबर ठरलं होतं आणि तुळशीच्या लग्नानंतर पहिल्याच मुहूर्ताला लग्न होणार होतं. पण………….


         पंढरपूरचे पोलीस इन्स्पेक्टर अजिंक्य इनामदार घरी आले. त्यांनी सांगितलेली माहिती अतिशय धक्कादायक होती.

बंगल्याच्या मुख्य दरवाजा आतून उघडाच होता. त्याअर्थी घरातल्याच कोणीतरी रात्री दरवाजा उघडा ठेवला होता.

श्रीरंगच्या सुरक्षा नियमानुसार मुख्यदरवाजा श्रीरंग ने स्वतः बंद केला होता.

 मोती आणि हिरा हे दोघेही कुत्रे विषारी बिस्कीट खाऊन झोपले होते. तर भीमा गड्याला डोक्यावरती दंडुका मारून बेशुद्ध केलं होतं. नोकरांच्या सर्व खोल्यांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या.

त्यांनी राहुल च्या सामानाची संपूर्ण झडती घेतली. सामान्यांमध्ये अक्षेपार्ह बऱ्याच गोष्टी होत्या. राहुलच्या बॅगमध्ये वरच्या भागांमध्ये ड्रग्स लपवले होते. तो कुठल्यातरी भलत्याच रॅकेटमध्ये सापडला होता. त्याच्याबरोबर आलेले चार मित्र हे मित्र नसून त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी आले होते. अण्णासाहेब पाटलांकडे गडगंज दौलत असल्यामुळे त्या पाच जणांनी दरोडा घालण्याचा प्लॅन केला होता. कोणीही साक्षीदार सापडू नये म्हणून राहुलच्या मित्रांनी त्याचा खात्मा केला होता.

राहुल ने आणलेली बिस्किटे, आणलेले पैसे हे सगळे फक्त भुलवण्यासाठी होते.



राहुलच्या मनामध्ये लहानपणापासूनच श्रीरंग , रागिनी यांच्याबद्दल सुरुवातीला कुतुहूल आणि नंतर असूया निर्माण झाली होती. गांधीं बँक मॅनेजर म्हणजे जणूकाही बाकीच्यांच्या पैशावरती असलेले गुरखा किंवा रखवालदार. नुसतच तळ राखायचं. इंजिनीअरिंग करताना त्यांनी ठरवलं होतं की परदेशात जाऊन भरपूर पैसे कमावून घ्यायचे. पैसे कमावण्याच्या नादात मध्ये राहुल सचोटी जोडून वाममार्गाला लागला होता. पण त्याच्या आई-वडिलांना याची सुतराम कल्पना नव्हती . राहुल ला नेहमी वाटे अण्णासाहेब त्याच्या आई-वडिलांना नोकर समजतात. सोनिया तर विजू ताईन कडे गेल्यावर इतके काम करे जणू काही एखादा नोकर. सोनिया प्रेमाने जरी काम करत असली तरी राहुलला ते आवडत नसे.

कॉलेजमध्ये असताना श्रीरंग कडे असणारा भारी आयफोन, भारी मेक बुक, त्याची महागडी मोटर सायकल. महागडे कपडे, घड्याळ राहुलल्I फार असूया वाटे.


सलमान खानच्या जाळ्यामध्ये राहुल तेव्हा केव्हाअडकला हे त्याचे त्यालाच समजले नाही.. नोकरी करताना सलमान खान बरोबर पण काम करून त्याच्या हातून काही चूक झाली, चुकीची भरपाई म्हणून आता त्याला जवळजवळ पन्नास लाख रुपये सलमान खान ला द्यायचे होते. एवढी रक्कम देणे त्याला शक्यच नव्हतं. पैसे नाही दिले तर सलमान खानची कायमची गुलामी त्याच्या नशिबात लिहिलेली होती.

गांधीं यांनी जेव्हा जेव्हा त्याला अंजली आणि श्रीरंग यांच्या लग्ना बद्दल सांगितलं तेव्हा आनंद वाटून राहुलच्या डोक्यामध्ये एक वेगळाच किडा वळवळला.

   50 लाख इथेच वसूल करण्याचा त्याच्या मनामध्ये बेत ठरला. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाला अण्णासाहेब त्यांची तिजोरी उघडून पूजा करत हे त्याने लहानपणापासूनच पाहिले होते. तो भारतात नसतानादेखील अण्णा साहेबांकडे पद्धत कशी तशीच असेल असा त्याचा समज होता त्याने मनाशी बेत आखला आणि पैसे वसुलीसाठी सलमान खान चे चार गुंड बळजबरीने त्याच्या बरोबर पंढरपूर कडे रवाना झाले...

 खरं म्हणजे लुटीचा दिवस लक्ष्मीपूजनाचा ठरला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीरंग आणि अंजली यांचा गंध अक्षत कार्यक्रम ठरवण्यात आला. त्यामुळे बरेचसे पाहुणेमंडळी अण्णासाहेबांच्या घरांमध्ये येणार होती. अशा वेळेस जर काही दरोडा वगैरे घातला तर अंगलट येईल असा विचार करून राहुल ने धनत्रयोदशीचा मुहूर्त पकडला.

गांधीं कुटुंबाला अण्णासाहेबांच्या घरांमध्ये मुक्तहस्त वावरण्याची संधी असे. तळमजल्यावर ती अण्णासाहेबांचे मोठी तिजोरी होती तिथे फक्त बाहेरच्या माणसांना जायची बंदी होती. तरीपण राहुल न काहीतरी काम काढून श्रीरंग बरोबर तळमजल्यावर जाऊन तिजोरीची बित्तंबातमी काढली होती.


अण्णासाहेबांच्या शयनकक्षात मात्र कोणालाच घ्यायची आत यायची परवानगी नसे.


श्रीरंग नेच वरच्या मजल्यावर ची सुरक्षितता नवीन पद्धतीचे करून घेतले होते, काही गुप्त कळ, तसेच वरून लाकडी दिसणारे पण भरभक्कम दरवाजे, याचा मात्र कोणाला थांगपत्ता नव्हता. श्रीरंग आणि अण्णासाहेब दोघांच्याही कडे सीसीटीव्ही नेटवर्कचे मॉनिटर होते. दोघांच्याही कडे बंदुकीचे परवाने होते.

ही नवीन घडामोड राहुलला माहिती नव्हती. अंजली आणि रागिनी एमबीबीएस होण्यामध्ये एवढ्या दंग होत्या बाकी कुठल्याही गोष्टीत काहीच रस नव्हता. गांधीं बाबा तसे सज्जन गृहस्थ त्यामुळे नको त्या भानगडी मध्ये नाक खुपसायला त्यांना पण आवडत नसे.


   सोनियाच्या तोंडून विजू ताई कडील दागिन्यांची माहिती काढली होती बऱ्याच वेळेला सोनियाला विजू ताईंचे काही दागिने घालायला ही मिळत. नाही का श्रीरंगच्या मुंजीच्या वेळेला सोनिया तशीच गेली होती. प्रवासात दागिन्यांची जोखीम नको म्हणून. तेव्हा समारंभाच्या वेळेला विजू ताईने तिला भरपूर दागिने घालायला दिले होते. 5 लाखाचा हिर्‍याच्या बांगड्या, 12 लाखाचा नेकलेस, असे बरेचसे त्यांनी आपल्या मुलांसाठी करून ठेवले होते.     


राहूल च्या डोक्यात जणू सैतान शिरला होता. सलमान खानने त्याला एवढे किडले, पिडले होते ,त्याला असे झाले होते की तेव्हा तो त्याच्या तावडीतून सुटतो


घरातल्या मुलांना आणि त्याच्या बहिणीला हात लावायचा नाही या बोलीवर राहुल या सगळ्या दिव्या साठी तयार झाला होता. 50 लाखाचा फटका त्याला फारच मारत होतं.

बाकीचे पोलीस अलीकडून बाकीची माहिती काढत होते. थर्ड डिग्री मारा ला लवकरच कंटाळून 

अलीने खरी काय ती माहिती दिली.

 

अर्जुन इनामदारांच्या माहितीनुसार, राहुल न पंढरपूर मध्ये बरोबर पेरणी केली होती. बरोबरच्या\ गुंड लोकांसाठी साठीत्यांनी पुण्याहून मोटर सायकल चोरल्या होत्या. दरोडा झाल्यानंतर चारी जणांनी वेगवेगळ्या दिशेला जाऊन, दुसऱ्या दिवशी दुबईला निघुन जायचे असे ठरले होते. 

राहुल कल्पनाच नव्हती की त्या चार गुंडांनी त्यांच्याबरोबर अजुन दोघा जणांना आत मध्ये घेतलं होतं.  ठरल्याप्रमाणे राहुल न दरवाजा आतून उघडा ठेवला होता. दरोडा दिसला पाहिजे म्हणून गुंडांनी कुर्‍हाडीचे घाव दरवाजावर घातले होते. सहा जण आत आल्यावरती त्यांच्यामध्ये आणि राहुल मध्ये बाचाबाची झालीत्यांनी धमकी दिली, पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर राहुलच्या बहिणीला उचलून नेतील. आता मात्र राहुल 

घाबरला. त्याचा आवाज ऐकून सोनिया जागी झाली. ती बाथरूम मध्ये जात असताना राहुल तिच्या मागे गेला आणि तिला बाथरूम मध्ये बंद करून टाकले.

घाईघाईने त्यानी तळमजल्यावर ती जाऊन तिजोरी दाखवली. सगळ्यात कहर म्हणजे तिजोरी उघडीच होती. काही रद्दी पेपर शिवाय तेथे काहीच नव्हते. खालचा आवाज ऐकून सदाशिव आणि त्र्यंबक जागे झाले. त्यांनी गोपाळ आणि आनंदला अण्णा साहेबांना उठवण्यासाठी वर पाठवले. तळमजल्यावरच्या तिजोरीमध्ये काहीच मिळाले नाही म्हणून गुंड चवताळले. एवढी मेहनत करून त्यांना काहीच हाताला लागले नव्हते.

वाटेमध्ये दोन गुंडांनी त्यांच्यावर ती कुर्‍हाडीचे वार करून  गोपाळ आणि आनंदला बेशुद्ध केले. ते बघून सदाशिव आणि त्रंबक चवताळले. त्यांनी त्या दोघांवरती भरपूर प्रतिकार केला. बाकीच्या दोघांनी धनत्रयोदशीची पूजा देवघरातून उचलली. याच्यामध्ये थोडेफार दागिने,पैसे राहुलने आणलेली बिस्किट आणि सोनिया ने केलेले नवीन दागिने होते. धनत्रयोदशीच्या पूजे मधले सर्व सामान चांदीची भांडी, पैसे, दागिने फटाफट उचलून ठरल्याप्रमाणे ते बाहेर पडणार होते. यांच्यामध्ये आणि राहुल मध्ये भयंकर बाचाबाची झाली . पूजेमध्ये ठेवलेले सामान फक्त राहुल आणि सोनियांचे होते. त्यामुळे पण राहुल ला दरदरून घाम फुटला.

बाहेर  सायरनचा आवाज ऐकताच राहुलने दगाफटका केला आणि आता तो माफीचा साक्षीदार बनू नये म्हणून त्याच्यावरती ुर्‍हाडीचे घाव घातले, राहुल ला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या बाबां वरती पण दुसऱ्या गुंडाने धारदार शस्त्राने वार करून गुंड फरार झाले. 


नरकचतुर्दशीच्या पहाटे हे सगळे भयानक नाट्य अण्णासाहेबांच्या बंगल्यामध्ये घडत होते. कारण कोण तर राहुल.

सगळ्या जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, राहुल आणि त्याचे बाबा मृत म्हणून घोषित करण्यात आले, तर सदाशिव आणि त्र्यंबक जबर जखमी झाल्यामुळे आयसीयूमध्ये भरती झाले. गोपाळ चा धाकटा भाऊ आनंद पण त्याच्यावर झालेल्या जखमांना सहन करू शकला नाही, अति रक्तस्त्रावामुळे, त्याचा आठ दिवसांनंतर मृत्यू झाला.

 या सगळ्यातून मिळालं काय?      

सर्वात जास्त नुकसान सोनियाचा झालं होतं. तिचा नवरा आणि मुलगा या हल्ल्यांमध्ये मरण पावले होते. तिच्या आयुष्याची सगळी जमापुंजी धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडली होती ते लुटारू घेऊन गेले होते. दुःख आणि लाज त्याच्यामुळे सोनिया मरणयातना भोगत होती.

 दिवाळीच्या दिवशी झालेल्या नुकसान, घरामध्ये झालेले मृत्यू, आणि एकंदरीतच अजिंक्य इनामदारांच्या चौकशी वरून राहुलच या सगळ्या घटनेचा सूत्रधार होता हे कळल्यानंतर अण्णा साहेबांना अतिशय वाईट वाटले. इतक्या वर्षाची कुटुंबाची जवळीक त्यांना दिलेले प्रेम माया याचा परतावा त्यांना धोका देऊन केल्यामुळे अण्णासाहेब आणि विजू ताई पार दुखावल्या गेल्या. असंगाशी संग झाल्यामुळे प्राणाशी गाठ पडली होती.

असल्या कुटुंबातील मुलगी वधू म्हणून घरी करून घेणे आता त्यांना शक्यच नव्हते. अंजली चा काहीही दोष नसताना सहस्त्रबुद्धे शास्त्रींची भविष्यवाणी खरी ठरली होती अण्णा साहेबांनी श्रीरंग आणि अंजली चे लग्न मोडल्याचे जाहीर केले.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime