कुळवाडी भूषण :छ. शिवाजी महाराज
कुळवाडी भूषण :छ. शिवाजी महाराज


प्रबोधनकार ठाकरे म्हणत की , नुसते शिवारायांचे नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते. त्या शिवरायांचा जन्म दि. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी या निजामशाही किल्ल्यात मोगल साम्राज्याला सर्वात मोठे आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.
महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतरही, तथाकथित जास्त खपाच्या कँलेंडरवर १९ फेब्रुवारीच्या रकान्यात 'शिवजयंती, शासन निर्णयानुसार' असे लिहले जाते व फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी कँलेंडरवर 'शिवजयंती, तिथीनुसार व मान्यवरांच्या मतानुसार' असे लिहून कोणत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले जात आहे. आज ग्रामपंचायत , शाळा, महाविद्यालय , सरकारी कार्यालयातील कार्यभार तिथीनुसार चालतो की तारखेनुसार, जर तो तारखेनुसार चालत असेल तर मग शिवजयंतीचा ऐवढा अट्टहास तिथीनुसार का ? हा साधा प्रश्न बहुजनांच्या तरूणांना का पडत नाही. मात्र आमचे तरूण हा मनुवादी विकृतींनी केलेला शिवजयंतीचा घोळ समजून न घेता दोन वेळेस शिवजयंती साजरी होते यामध्येच खुष होतात तर मनुवादी विकृतींचा डाव संपन्न करण्यास मदत करतात.
शिवरायांची किर्ती ऐकून १८६९ जेम्स डग्लस नावाचा इग्रंज पर्यटक शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर आला. या संदर्भात प्रा. नामदेवराव जाधव लिहतात; "महाराजांचे दर्शन मिळावे म्हणून त्याने अनेक दिवश रायगडाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत अनेक वेळा चकरा मारुन महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या पदरी अपयश आले." शेवटी सर्व मेहनत वाया गेली म्हणून जेम्स डग्लसने खिन्न मनाने आणि रिक्त हस्ताने रायगड सोडले. तो पुण्यास आला आणि शिवरायांसारख्या युगप्रवर्तक महामानवाची समाधी सापडत नासल्याची शोकांतिका त्यानेक्ष'टाइम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली. हा लेख महात्मा जोतिराव फुले यांच्या वाचनात आला. त्यांना शिवरायांचा अपमान झोंबला त्यामुळे ते रायगडावर गेले त्यावेळी तिथे काय घडले याविषयी महात्मा फुले लिहतात , "पुण्यास आलो व शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन रायगडी जाण्यास निघालो. समाधिची जागा शोधण्यास दोन - तीन दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडुपे कु-हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्मोत्सव साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. ही सर्व हकीकत तेथील ग्रामभटास कळताच तो वर आला आणि उद्गारला "कुणबट शिवाजीच्या थडग्यास देव केला. मी ग्रामजोशी असता दक्षिणा शिधा देण्याचे राहिले बाजूला. केवढा माझा अपमान ! असे म्हणून लाथेने समाधीवरील फुले उधळून दिली." तो पुढे म्हणतो "अरे कुणबटा तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पुजा केलीस ? तो शुद्रांचा राजा त्याची मुंजसुध्दा झाली नव्हती."
हा सगळा प्रकार पाहून जोतिराव लिहतात, "मी रागाने वेडा झालो. ज्यांच्या जीवावर पेशव्यांना राज्य मिळाले त्या शिवप्रभूंची पुजासामग्री ह्या भटाभिक्षुकाने पायातील पादत्राणाने लाथाडावी का ? मी संताप वायुने वेडा होऊन गेलो. त्यांचे स्मारक म्हणून मी अल्प काव्य केले आहे. ते त्यांना समर्पण करतो." ही माहीती २७ मे १९३८ च्या दिनबंधूमध्ये प्रकाशित झाली होती.
महात्मा फुले यांनी सन १८६९ मध्ये शिवाजी महाराजा
ंवर सुमारे एक हजार ओळींचा पोवाडा रचला व प्रसिध्द केला." याविषयी पुरूषोत्तम खेडेकर लिहतात; "छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा शोध आपल्या देशात प्रथम जोतिबांनी घेतला." तर प्रसिध्द लेखिका गेल आँम्वेट यांनीही "शिवरायांकडे प्रथम लक्ष वेधण्याचे काम ब्राम्हणेत्तर पुढारी जोतिराव फुले या महान व्यक्तीने केले.
शिवाजी महाराजांचे दोनच गुरू त्यात त्यांच्या आई जिजाऊ माँसाहेब व शहाजी महाराज तसेच त्यांना आध्यात्माची प्रेरणा देणारे जगतगुरू संत श्री. तुकाराम महाराज.
छत्रपती शिवरायांचा इतिहास हा लोककल्याणकारी राजाचा इतिहास आहे. सतराव्या शतकात रयतेच्या शेतीचे रक्षण करणारा पहिला राजा म्हणून शिवरायांना ओळखले जाते. शेतक-यांच्या भाजीच्या देठाला तसेच शत्रुपक्षातील व शेतकरी रयतेच्या बायका - मुलांना हात लावू नये असे शिवरायांनी मावळयांना आदेश दिले होते. शिवरायांच्या काळापुर्वी शेतक-यांचे जीवन वतनदारांच्या लहरीवर असे. मात्र शिवराज्यात उत्पन्नाचा आदमास पाहुन रयतेवर कर बसवला, जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिका-यास सक्त ताकीद असे तसेच दुष्काळाच्या काळात शेतसारा कमी व माफ केला. जनावरांकरीता कर्जाची सोय, मोफत बि - बियाणे व अवजारे , शेतक-यांना कर्ज पुरवणारे व कर्ज माफ करूण व शेतक-यांचे हित जपणारे मध्ययुगीन कालखंडातील एकमेव राजा ते म्हणजेच छ. शिवाजी महाराज. मोगलांचा इतिहासकार खाफीखान याने त्याच्या ग्रंथात एके ठिकाणी नोंद केली आहे. शिवरायांना शेतक-यांच्या मुलाबाळांविषयी व स्त्रियांविषयी अत्यंत आत्मियता होती. शेतकरी हा देशाचा खरा मालक आहे. अशी शिवरायांची धारणा होती. म्हणून शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना 'कुळवाडी भूषण' हा किताब दिला व आपल्या पोवाड्याची सुरूवात करताना लिहतात, 'कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा. तर शिवरायांविषयी श्रीपाद अमृत डांगे म्हणतात, 'जनतेच्या ध्यासातील आदर्श राजा शिवाजीच्या रुपाने अवतरला.
आम्हाला आजपर्यंत शिवाजी महाराज हे फक्त 'ढाल - तलवार' अथवा शिवाजी महाराज व मुसलमान यांच्या केवळ रक्तबंबाळ प्रसंगाची उग्र व भावनिक मांडणी म्हणजेच शिवचरित्र ! अशा प्रकारची अनेकांनी मांडणी केली व ती
वरंवार आमच्या समाजमनावर शेकडो वर्षापासून बिंबवलेले आहे. त्यापलीकडेही शिवराय व त्याचे कार्य आहे हे कोणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही, जर कोणी शिवराय व इतिहासाविषयी सत्य सांगत किंवा लिहत असेल तर त्यांच्या छातीवरती गोळ्या घातल्या जातात मात्र खोटा व विकृत इतिहास करणाला पुरस्कार दिले जातात. आज धाडसाने इतिहासाचे पुर्नेलेखन करून जर कोणता बहूजनवादी विचारवंत माहिती सांगत असेल तर त्यावर आमच्या लोकांचा विश्वास बसत नाही, का तर आजपर्यत ते कथा, कांदबरी, पोवाडे, नाटक यात सांगितलेला इतिहास खरा मानुन बसलेत फार मोठी शोकांतिका आहे.
आजही आमच्या घराघरातील महिलांना शिवाजी महाराज जन्माला यावे वाटतात पण ते दुस-याच्या घरात. तेव्हा आता आमच्या घराघरात जिजाऊ जन्माला घातली पाहिजे तेव्हा शिवाजी खराघरात जन्म घेईल. तसेच तरूणांनी रयतेचे राजे कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही नाचून साजरी न करता ती शिवरायांचे व इतर महामानवांचे विचार आत्मसात करून व विचारांची पेरणी करत करत साजरी केली पाहिजे तेव्हाच खरे शिवराज्य येईल .