The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Navanath Repe

Inspirational

0.4  

Navanath Repe

Inspirational

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर

5 mins
2.5K


"धन्य धन्य चोंडीगाव!

जेथे धुळीमाजी उमटले राजमातेचे पाव!!


महानायिका आहिल्याबाईंबद्दल शिवश्री गंगाधरजी बनबरे म्हणतात की, 'अहिल्याबाई ही या देशातल्या प्रत्येक संकटग्रस्त झालेल्या स्त्री आणि पुरूषाला ऊर्जा देऊन संकटाला उध्वस्त करून यशस्वी होण्याकरीता प्रेरणा देणारे एक महान असे टॉनिक आहे'. तर इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. त्या अहिल्याबाईंचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव आहे. शिवरायांचे रायगडावरील पहिले स्मारक झाले ते तुकोजीराव होळकर यांच्या पैशातून झाले तसेच जगाला शिवराचरित्र माहित व्हावे म्हणून कृष्णराव केळुसकरांनी इंग्रजीमध्ये पहिलं शिवचरित्र जे १९०६ साली लिहिलं ते प्रकाशित करून जगातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये गेलं पाहिजे म्हणून त्या काळी ३५ हजार रूपयांची मदत करणारे राजे म्हणजेच होळकर आहेत.

 

"वैदिक धर्म नाकारतो स्त्रीशिक्षण!

वैदिक भटांचे भेदभाव वेदपुराण!

मूलनिवासी रहावेत अज्ञान!

हेच भटांचे ध्येय असते!!"


त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना तसेच वैदिक धर्म स्त्रियांना शिक्षण नाकारत होता तरीही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले. राजमाता अहिल्याबाई होळकर बुद्धिमान, हुशार, चपळ, चाणाक्ष असे सर्वगुणसंपन्न होत्या. त्यांना मोडीलिपी वाचता व लिहिता येत होती.


आजच्या आमच्या महिलांना माहेश्वरी साडी माहित आहे पण ती निर्माण करणारी राजमाता अहिल्याबाईच माहित नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.

अहिल्याबाईंचा विवाह २२ मे १७३३ साली खंडेराव होळकर यांच्यासोबत झाला होता. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. ते अहिल्याबाईंना सांगत होते की तुला आधुनिक काळातली ताराराणी व्हायचे आहे. तुला जिजाऊंचा वारसा पुढे चालवायचा आहे. त्यामुळे ते अहिल्याबाईंना घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालविणे, डावपेच आखणे, करवसुली करणे, न्यायदान करणे या सर्व बाबींचे धडे त्यांना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी दिले होते.

 

"शूरवीर खंडेराव झाला पती!

जुळली खंडेराव अहिल्यांची नाती!!" 


त्यानंतर १२ वर्षांनी मल्हारराव होळकर हे मृत्यू पावले. तेव्हा वैदिक धर्मानुसार सती जावे लागत होते तेव्हा खंडेरावाच्या अकरा बायका सती गेल्या परंतु अहिल्याबाई सती गेल्या नाहीत व त्यांनी केशवपनही केले नाही. त्यावेळी त्यांना सासरे मल्हारराव होळकर व सासू गौतमीबाईंनी साथ दिली होती. शहाजी महाराजानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत तसेच खंडेराव गेल्यानंतर अहिल्याबाई सती गेल्या नाहीत आणि जोतिराव फुले गेल्यानंतर सावित्रीमाई सती गेल्या नाहीत. या महिला सती गेल्या असत्या तर इतिहासच बदलून गेला असता मग आम्ही आज कुठल्या तोंडान जय जिजाऊ आणि जय अहिल्या, जय सावित्री म्हटलं असतं. अशा या क्रांतीकारी महिलांनी वैदिक धर्मव्यवस्थेला छेद देऊन त्यांचे धर्मग्रंथ लाथाडण्याचे महान कार्य केलं आहे हे आजच्या आमच्या महिलांनी समजून घेतलं पाहिजे.


आमच्या बहुजन समाजाला फक्त अहिल्याबाई हातात पिंड घेतलेल्या तसेच त्या मंदिरे बांधणाऱ्या होत्या एवढेच माहित करून देण्यामागे या मनुवादी विकृतींचा सर्वात मोठा हात आहे. ही मनुवादी चाल आता आमच्या बहुजनांनी लक्षात घेतली पाहिजे. राजमाता आहिल्याबाईंचे त्या पलीकडेही कार्य आहे. अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार केला होता. ज्याप्रमाणे कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमध्ये उत्तम राजे होते तसेच अहिल्याबाई या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते, अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती. तसेच अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.


"अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. त्यांचे स्वतंत्र हेरखाते होते. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. एकदा अहिल्याबाई दरबारात बसलेल्या असताना चंद्रचुड आला आणि म्हणाला की, 'आता होळकरांच्या घराण्याला कोणी वंश उरला नाही माझी आपल्याला एक विनंती आहे की एक ब्राम्हण मूल दत्तक घ्यावं आणि हे राज्य पुढे चालवावं'. तेवढ्यात अहिल्याबाई सिंहासनावरून उठून चंद्रचुडवर कडाडताना म्हणाल्या की, 'मूर्खा तोंड संभाळ', 'ही होळकरांची रियासत आहे, ही होळकरांची रियासत कोणाची खुषमस्करी करून मिळवलेली नाही. तर ही मल्हाररावांच्या तलवारीच्या बळावर मिळवलेली रियासत आहे'. आणि या रियासतीचं काय करायचं दान करायची की कोणाला दत्तक घ्यायचं हे ठरवण्यासाठी मी अहिल्या स्वतः सक्षम आहे. हे राज्य निर्माण करणारा माझा सासरा मल्हारराव त्यांची मी सून आहे. माझा नवरा खंडेराव या राज्यासाठी मेला त्याची मी बायको आहे. माझा मुलगा मालेराव या राज्यासाठी मेला त्याची मी आई आहे. एकाची सून एकाची बायको आणि एकाची आई जिवंत असताना तुझी हिंमत कशी झाली हे राज्य बरखास्त करा म्हणण्याची. यावर चंद्रचुडची बोलतीच बंद झाली होती.


पेशवे काय आमचे मालक आहेत का? त्यांना काय अधिकार आहे आमच्या राज्यात ढवळाढवळ करण्याचा त्यांनी त्याच्या लायकीने राहावं हे शिवाजीचं राज्य आहे, हे माझे सासरे मल्हारावांनी तलवारीच्या बळावर कमावलेलं राज्य आहे आणि पेशवा कोण लागून गेला माझ्या राज्यात हस्तक्षेप करणारा त्याने त्याच्या लायकीने रहावं, हे उद्गार होते अहिल्याबाईंचे. म्हणजे किती जरब असेल जरा विचार करा. त्यांना कसं घडवलं होतं मल्हाररावांनी स्पष्ट दिसते. परंतु अशी अहिल्याबाई कोणी आमच्या बहुजन समाजाला सांगितलीच नाही, सांगितली ती फक्त पिंड घेतलेली आणि मंदिर बांधणारी आणि तेच आमचा समाज सत्य मानून बसला ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. 


त्या काळामध्ये ज्या धर्मग्रंथांनी स्त्रियांना त्यांचे हक्क व अधिकारापासून दूर ठेवलं होतं तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात स्त्रियांची स्वतंत्र पलटन उभी केली होती. भारत देशामध्ये महिलांची स्वतंत्र फौज निर्माण करणारी महाराणी अहिल्याबाई होती म्हणून त्यांना विरांगनाही म्हटले जाते. त्यांनी महिलांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी केवळ अर्ध्या तासात ५ हजार महिलांची फौज उभी केली होती. तसेच त्यांच्या अंगरक्षक ह्या सर्व स्त्रिया होत्या.


जगाला वंदनीय असं कार्य अहिल्याबाईंनी केलं. त्यात धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, भाषा, संस्कृती, युध्दशास्त्र कला - निती तसेच विविध कायद्यांची निर्मिती अहिल्याबाई होळकरांनी केली. त्यातील अनेक कायदे १९५५ पर्यंत आपल्या देशात लागू होते. जगाला अभेद्य होईल अशी आपली सून अहिल्याबाई घडवण्याचं कार्य हे मल्हारराव व गौतमीबाईंचे आहे म्हणून हे जगातले 'आदर्श सासू - सासरे' म्हणूनही पाहिलं पाहिजे.

 

अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५, इ.स. १९९६ या दिवशी एक डाकतिकिट जारी केले आहे. तसेच अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे. परंतु याच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाला महानायिका अहिल्याबाईंचे नाव देण्यासाठी मोर्चे आणि निदर्शने करावी लागताहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे.


आज आमच्या तरुण-तरुणींच्या पुढे जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्री यांचे चरित्र आयडॉल म्हणून समोर आणलं पाहिजे. ते तरूणांनी वाचलं पाहिजे. या विषयी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.' मात्र आमचे लोक महापुरूषांची चरित्रं न वाचताच नाचत बसतात आणि जयंती साजरी करतात. पण नाचण्याने अंगातून घाम येतो परंतु वाचण्याने ज्ञान प्राप्त होते हे आमचा तरूण विसरला आहे की काय? हा प्रश्न पडतो.


अहिल्याबाईंचे जीवनचरित्र म्हणजे आजच्या मनोरूग्ण झालेल्या, मानसिक आजारग्रस्त झालेल्या तसेच लाचार आणि दिनवाण्या झालेल्या बहुजन समाजामध्ये क्रांतीचा अंगार फुलवणारे जीवनचरित्र आहे म्हणून ते जीवनचरित्र प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजे हेच खरे राजमाता अहिल्याबाईंच्या जयंतीदिनी अभिवादन ठरणार आहे.


Rate this content
Log in

More marathi story from Navanath Repe

Similar marathi story from Inspirational