खोड मोडली
खोड मोडली
(सायंकाळचे पाच वाजले आणि आरोही ने लॅपटॉपची स्क्रीन ऑफ करत मनात म्हंटलं चला आणखी एक दिवस भरला. गेले काही महिने ती वर्क फ्रॉम होम करत आहे, तासंतास लॅपटॉप समोर बसून सहा महिन्यांच्या आताच चष्म्याचा नंबर पुन्हा वाढला शिवाय साहित्याचं ही काम वाढत होतं. लोकडाऊनच्या काळात आरोहीसाठी तिचं साहित्याचं तिला सकारात्मक ऊर्जा देत होतं, इतक्यात दारावरची बेल वाजली दाराच्या पलीकडे शेजारची मैत्रीण होती. आरोही ने दार उघडलं)
रिटा: हाय कशी आहेस
आरोही: अगं ये ये आत ये, काय म्हणतेस आज चक्क माझी आठवण कशी झाली? बस मी चहा ठेवते
रिटा: सहजच ग घरी बसून कंटाळ आला म्हंटलं भेटू तुला आणि शनिवार आहे तर आमच्या वर्क फ्रॉम होमला पण सुट्टी शिवाय माझा आज स्वयंपाक बनवायचा ही mood नाही आम्ही रात्री बाहेरच जाऊ जेवायला तर ते ही टेन्शन नाही. आता जस्ट चहाची तलप आली पण एकटं चाहा प्यायचा कंटाळा आला नवऱ्याला ऑफिस मधून यायला उशीर आहे म्हणून आले. बाकी तुझं कसं सुरू आहे?
आरोही: समर्थ कृपा सर्व उत्तम आहे, जॉब मध्ये थोडे challenges आहेत पण ते काय सगळीकडेच असतं बाकी तर सगळं ठीक. साहित्यसेवे सोबत समाजसेवा आध्यात्म ही छान सुरू आहे खरंच खूप छान वाटतं आणि या लोकडाऊन मध्ये स्वतःची कला जोपासायला वेळ मिळाला ते एक बरं झालं आणि बाकी तर दिवसभरात इतकी कामं असतात की दिवस कधी सरतो पत्ताच लागत नाही. स्वयंपाक, क्लिनिंग, जॉब, संस्था यात सगळा वेळ जातो आणि फावल्या वेळात वाचन, लिखाण करण्यात तो वेळ सार्थकी लावते
रिटा: तू ना अगदी टिपिकल भारतीय महिला आहे, नवऱ्याला पण सांगायची काही कामं सगळं काय स्वतःवर ओढून घेतेस, तुला कोणी बेस्ट वाईफचा अवॉर्ड देणार नाही, आणि इतकं काय ग साहित्य साहित्य त्याने काय पोट भरतं का? असं पण मराठी लेखक/कवींना कितीशी रॉयल्टी मिळते की त्यासाठी इतकी धडपड करते आणि समाजसेवा करून आजपर्यंत कोणाचं भलं झालं आहे? त्यापेक्षा आहेस तरुण तर घे मज्जा करून जाशील मरून तेव्हा टाकतील तुला पुरून. आणि श्री हरी श्री हरी म्हणायचं हे काय वय आहे का. परदेशात आहोत आपण इथं कोण आहे आपल्याला बघायला. तू म्हणजे ना काकूबाई आहेस वेळेच्या आधी म्हातारी झालेली. आणि प्लॅंनिंग चं काय यंदा तरी चान्स घेणार आहेस का? आम्ही प्लॅन करत आहोत या वर्षी. मुलं लवकर लहान वयात झाली की ते मोठे होईपर्यंत आपण तरुणचं दिसतो शिवाय ते कमला लागले की आपण पुन्हा एन्जॉय करायला मोकळे
आरोही: अरे बापरे तुला तर माझ्यापेक्षा माझ्या आयुष्याची चिंता लागली आहे, अगं किती प्रश्न. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी एक एक करून देते, तू चहा घे आधी. तू म्हणालीस मी टिपिकल भारतीय महिला आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद हो मी टिपिकल भारतीय महिला आहे माझ्यासाठी माझ्या देशाची संस्कृती, परिवार आणि आपली परंपरा हे top priority आहे सो आहे मी टिपिकल भारतीय महिला. तुझा दुसरा प्रश्न 'नवऱ्याला सांगायची ना काही कामं' त्याचं उत्तर माझ्या नवऱ्याला कामं कर असं सांगायला तो घरी तर पाहिजे तो site वर असतो फक्त दोनच दिवस घरी येतो आणि या गोष्टीसाठी मला कुठला अवॉर्डची गरज नाही. तिसरी गोष्ट 'साहित्याने काय पोट भरतं का' तर मी म्हणेल हो भरतं ना, प्रेक्षक जेव्हा आमच्या कवितेवर टाळ्यांचा कडकडाट करतात ना तेव्हा समाधानाचा ढेकर येतो, जेव्हा एखादी कविता किंवा लेख लिहतो ना तेव्हा छप्पन भोग जेवल्यासारखं वाटतं आणि जेव्हा आमचं साहित्य प्रकाशित होतं ना तेव्हा आई झाल्यासारखं वाटतं. माझ्यासाठी माझं साहित्य म्हणजे माझं बाळ आहे आणि ते जन्मयला येण्या आधी समर्थ उत्तम विचारांचे बीज माझ्या अंतरात रोवतात मग ते काही दिवस डोक्यात फिरत राहतात आणि शेवटी कागदावर जन्म घेतात खरंच आई होण्याची अनुभूती आहे माझ्यासाठी माझं साहित्य. चौथा प्रश्न 'मराठी साहित्यिकांना अशी कितीशी रॉयल्टी मिळते', तर त्यावर मी असं म्हणेल की आत्मिक सुखातून मिळालेल्या धनाची तुलना होऊच शकत नाही आणि शिवाय माझं संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे पण मराठी भाषेत जो आपलेपणा आहे तो कुठेच नाही म्हणून मी मराठीतून लिहते. पाचवा प्रश्न 'समाजसेवा करून काय मिळणार' तर त्यावर माझं असं उत्तर आहे की मी माणूस म्हणून जन्माला आले तर माझी काही कर्तव्य आहेत मला समाजाचं देणं लागतं, समाज आपल्याला काय देतो यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो असा जर विचार केला तर ते जास्तं चांगल नाही का आणि मी तर तुला म्हणेल की आहेस तरुण तर घे परमार्थ करून जाशील मरून तेव्हा समर्थचं नेतील उधरून. आणि काय म्हणालीस होतीस बरं 'प्लॅंनिंग, यंदा तरी चान्स घेणार आहेस का? तर रिटा मॅडम मुळात 'चान्स घेणार का' हे वाक्याच मला पटत नाही, मुलं होणं आई होणं हा चान्स म्हणून का बघता आणि तू का टेन्शन घेते त्याचं, मला नाही घ्यायचा असला स्वार्थी चान्स. मी प्रयत्न करून पाहिला होता माझं miscarriage झालं नंतर सलग दीड वर्ष depression मध्ये काढली माझा मायग्रेन वाढला या सगळ्यातून बाहेर पडले तेव्हा गुडघ्याचा त्रास सुरू झाला तर मला माझे limitations माहीत आहेत आणि मला माझ्या बाळावर माझ्या आजारपणामुळे लक्ष देता आले नाही तर काय उपयोग म्हणून शेवटचं सांगते मी नाही प्लॅंनिंग करत त्यापेक्षा समाजात जी गरजवंत मुलं आहेत त्यांना मी मदत करेल, माझा वेळ मी त्यांना देईल.
रिटा: बापरे मी साधे पाच प्रश्न विचारले होते तू मला पूर्ण गाथा ऐकवलीस, धन्य आहे तू .
आरोही: हरकत नाही असे चांगदेव आम्हाला प्रत्येक पायरीवर भेटत असतात, म्हणून कवींशी नडायला जाऊ नका आणि तो कवी किंवा कवयित्री माझ्यासारखी मकर राशीची असेल तर त्यांच्यापासून शंभर फूट लांब त्यांना चुकूनही ज्ञान पाझरायला जाऊ नका कारण ते आधीच खूप खडतर आयुष्य सहन करून दगड झालेले असतात, ते खूप काळ ऐकून घेतील, अपमानही सहन करतील पण जर का त्यांच्या सहनशीलतेची मर्यादा ओलांडली तर सुनामी आलीच म्हणून समजा, तुमच्या भूतकाळातील चुका काढल्या जातील आणि मुद्देसूद अपमान केला जाईल हे नक्की. बरं झालं पाचचं प्रश्न होते आणखी असते तर रात्र ओलांडली असती.
रिटा: बरं चल मी निघते आमचे येतील आता इतक्यात, आणि थँक्स फॉर द टी.
आरोही: ओके बाय, ये परत निवांत कधी. पुन्हा रंगवू चहा सोबत चर्चा, काळजी घे.
(आरोहीने दार बंद केलं, गेले खूप वर्ष ती रिटाची खोचक बोलणी आणि स्वार्थी व्यवहार फक्त मैत्रीण म्हणून सहन करत होती आणि आज अखेरीस ती बोलली.)