जागतिक महिलादिन आणि ग्रामीण भागातील स्त्रिया.
जागतिक महिलादिन आणि ग्रामीण भागातील स्त्रिया.
"स्त्री समानतेची आरोळी
कधीही जात नसते जिच्या कानी
ती असते ग्रामीण भागातील नारी."
"अंतरराष्ट्रीय महिला दिन."
किंवा "वुमेन्स डे" म्हणजे काय असा प्रश्न तुम्ही एखाद्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या एखाद्या मध्यमवयीन बाईला विचारा किंवा एखाद्या तरुणीला विचारा एकदोन बोटावर मोजण्या इतक्या मुली सोडल्या तर बाकी कुणालाही महिला दिन काय आहे,त्याचे महत्त्व काय आहे, आणि तो का साजरा केला जातो याविषयी माहिती नसते.. आणि त्यांना या सर्वांशी काही घेणेदेणे नसते.जणु काय "महिला दिन" हा त्यांच्यासाठी नाहीच आहे..
एकीकडे अंतरराष्ट्रीय महिला दिन जो संपुर्ण जगभरात महिलांच्या गौरवाचा दिवस म्हणून साजरा होतो..नारी समानता, समान हक्क आणि स्त्रीच्या आत्मसन्मानाच्या अधिकाराचा उत्सव आणि सोहळा म्हणून साजरा होतो .तर दुसरीकडे काही ग्रामीण भागात, खेड्यात,वाडी वस्त्यांवर आजही मुलींना शिक्षण घेण्याचा,शाळेत जाण्याचा अधिकार नाकारला जातो..
"चुल आणि मुल" याच मर्यादित कक्षेत मुलींना आणि स्त्रियां ठेवले जाते.. काही घरं अपवाद वगळता अन्य घरांमध्ये मुलींना जेमतेम प्राथमिक शिक्षण घेण्याची मुभा असते.. एखाद्या गावात दहावी पर्यंत हायस्कूल च्या शिक्षणाची सोय असली तर काही मुलींचे शिक्षण दहावी पर्यंत होते... मुलींमध्ये हुशारी असुनही त्यांना उच्च शिक्षण घेऊ दिले जात नाही.... मुली वयात येताच आईवडील त्यांची लग्न लावून देतात..
काही स्त्रियांना चुल मुलं,घर,वावर (शेती) यापलीकडे ही विश्व असते हे जणु काही माहितच नसते..नवऱ्याच्या शब्दापलीकडे, सासु सासऱ्यांच्या निर्णया पलीकडे. ही आपले स्वतः चे ही काहीतरी अस्तित्व आहे..ही गोष्ट या महिला मान्य करायला तयारच नसतात.. यांना महिला दिनाचे, स्त्री पुरुष समानतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न नेहमीच फोल ठरतो.. कारण आपल्या स्त्री जातीच्या मनावर, डोक्यावर हे पिढ्यान् पिढ्या बिंबवले गेले आहे, गिरवले गेले आहे आणि शिकवले गेले आहे की, स्त्री ची जागा ही चार भिंतींच्या आतच आहे.. आणि तिच्या आयुष्याचे निर्णय हे तिचे वडील,भाऊ,नवरा किंवा मुलगाच घेतील..तिला स्वतः चे मत मांडण्याचा अधिकार नाही.. आणि या सर्व विचारसरणीतुन बाहेर यायला ग्रामीण भानागातील स्त्रियांना वेळ लागतो आहे, आणि लागणारच..
आपण स्त्री मुक्ती च्या, "बेटी बचाव बेटी पढाओच्या" मोठमोठ्या चर्चा करतो. पण सुनेने डोक्यावरचा पदर कधीही पडु द्यायचा नाही.. एवढीही मुभा. खेड्यात राहणाऱ्या बाईला नाही..परंतु आजही ग्रामीण भागात, शेतकरी कुटुंबात आणि हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबात मुलींच्या शिक्षणाला तेवढे महत्त्व आणि प्राधान्य दिले जात नाही..मुलगा मुलगी भेदभाव, यासर्व गोष्टी आजही खेडोपाडी अगदी पुर्वीच्या काळात होत्या तशाच तंतोतंत पाळल्या जातात ही मोठी शोकांतिका आहे..
काही पालक जे शेतकरी आहेत, मोलमजुरी करणारे आहेत. ते आधुनिकतेच्या प्रवाहात आले आहेत.. त्यांना वाटते की, आपल्या मुलींने शिकुन मोठे व्हावे, स्वतः च्या पायावर उभे राहुन आपले भविष्य उज्ज्वल बनवावे.. आणि असेच काही पालक जे आपल्या मुलींना दहावी नंतर चे शिक्षण जे तालुक्याच्या गावी किंवा जिल्ह्यातील ठिकाणी असते तिथल्या शाळेत प्रवेश घेऊ देतात, शिकण्यासाठी जाऊ देतात.. मुलीही आपल्या पालकांचे आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज बसने प्रवास करत आपले कॉलेज गाठतात.सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास करत आपल्या गावी परत येतात..हा शिक्षणाचा प्रवास करणे त्यांच्या साठी तेवढे सोपे नसते जेवढे आपल्याला दिसते..या रोजच्या प्रवासात त्यांना अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते.. लोकांनी गच्च भरलेल्या गाडीतून कमीतकमी उभे राहण्यासाठी तरी जागा मिळवतांना रोजची कसरत करावी लागते..त्यातच वाईट प्रवृत्ती चे लोक, त्यांच्या वाईट नजरा या सर्वांचा सामना ही करावा लागतो..तर फक्त मोठमोठ्या ऑफीसमध्ये काम करतांनाच स्त्रियांना या प्रसंगांचा सामना करावा लागत नाही तर.. खेडोपाडी राहणाऱ्या आणि आपले कमीत कमी महाविद्यालयीन शिक्षण तरी पुर्ण व्हावे यासाठी धडपड करणाऱ्या छोट्या छोट्या मुलींना या सर्वांचा अगदी लहानपणापासून सामना करावा लागतो... महिलादिन एका दिवसापुरता साजरा करुन, महिलांसाठी मोठमोठे कौतुकाचे शब्द बोलण्यापेक्षा रोजच्या या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलींना, महिलांना आपण कशी मदत करु शकतो या गोष्टीचा विचार प्रत्येक मुलाने किंवा पुरुषाने केला. तरी महिला दिन साजरा करण्याचा खरा हेतु साध्य झाला असे म्हणता येईल..
जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव. खरं तर रोजचा दिवस आपला. प्रत्येक स्त्रीचा. तिच्या आत्मसन्मानाचा आणि तिच्या कसोटीचाही. केवळ ती स्त्री आहे म्हणून भोगाव्या लागणाऱ्या वेदनेचा आणि ती स्त्री आहे म्हणूनच अनुभवता येणाऱ्या सर्जनत्वाचाही...
महिला दिनाचे साजरीकरण प्रत्येकी साठी वेगवेगळे असते.. परंतु आजही ग्रामीण भागातील स्त्रिला या गोष्टीचे महत्त्व नाही, तिला तिच्याच स्वतः च्या कुटुंबाकडून तेवढे स्वातंत्र्य नाहीया गोष्टीची खंत वाटते..
असो तरीही सर्व स्त्री वर्गाला "अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"