Shital Thombare

Inspirational Others

4.0  

Shital Thombare

Inspirational Others

एका चाकावर चालणारा संसार

एका चाकावर चालणारा संसार

3 mins
11.6K



'रमे ये रमे आगं झालं का नाही तुझं आगं उशीर झाला की तो मुकादम्या खाऊ की गिळू करतोया...आटपं की लवकर...'


'आले आले झालचं गं किती घाई करतीस चंदे ...बोंबलू दे त्या मुकादमाला खातोय का? मी हाय न्हवं संगतीला मंग का उगा घाबरालिया?'


व्हय व्हय त्यो मुकादम तुझ्या घरचाच न्हवं...तू उशीरा आलीस तरी न वरडायला...


यखादा दिशी उशिरा गेलं तर चालतयां की यवढ काय आभाळ कोसळतयं व्हयं...


चालतय चालतय बाई बर आता चल लवकर न्हाई तर तो मुकादम घरीच येईल आपल्याला घ्यायला...


अन दोघीही हसू लागल्या...कारण हा संवाद रोजचाच होता...रमाला घरची कामं आटपता आटपता रोजच उशीर होई...कशी बशी कामावर पोहचे...ती राहत असलेल्या झोपडपट्टीच्या मागच्या बाजूलाच इमारतींच बांधकाम सुरु होतं...


रमा अन चंदी सारखेच झोपडपट्टीतील इतरही अनेक बायका,पुरूष तिथे आपली रोजी रोटी कमवायला जात होते...


तिथल्या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता...रमाच्या कुटुंबात ती एकटीच कमवणारी...आणि खायला दहा तोंडे...सासू ,सासरे ,लहान दीर ,ननंद...


या समद्यांचीच जिम्मेदारी रमा वर होती...तुम्ही म्हणाल रमाचा नवरा...तो कुठे आहे??? तो आहे पण आणि नाही पण...


रमा अठराच वर्षांची होती जेव्हा आईबापाने तिच लग्न राकेशशी लावून दिलं...अजून पुरती समजही न आलेली रमा ...तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली...


रमाचा स्वभाव अत्यंत मनमिळावू...ती ह्या झोपडपट्टीत रहायला आली अन सगळ्यांशी नाती जुळवली...कोनी दादा,काका,मामा,काकू,मावशी,मामी..तर कोणी जीवाभावाची मैत्रीण झाली...


सुरुवातीचे काही दिवस बरे गेले...पण हळूहळू राकेश चा खरा स्वभाव रमाच्या लक्षात येऊ लागला...राकेश घरी असताना शेजारपाजारची एकही मुलगी किंवा बाई तिच्या घरात येत नसे...रमाला याच आश्चर्य वाटे..पण कधी कोणाला काही विचारायचं धाडस नाही झालं....


राकेश एका शाळेच्या बसवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता...एके दिवशी पोलिस राकेश ला शोधत झोपडपट्टीत आले...रमा तर पुरती घाबरली होती...काय झालयं..


चौकशीअंती समजले...राकेश ज्या बसवर काम करत होत्या..त्या बसमध्ये प्रवास करणार्या एका शाळकरी मुलीचा त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला...


रमाच्या तर पायाखालची जमीनच सरकली...आपला नवरा तो ही या थरावर जाऊ शकतो तिला विश्वासच बसेना...अश्या नीच माणसाबरोबर आपण संसार करतोय याचीच तिला किळस वाटू लागली...


दोन दिवसांनंतर तिला समजले...पोलिसाच्या हाती तो सापडला आहे...त्याला भेटायला जाण्याचीही तिला इच्छा नव्हती...यापुढे राकेशचा आणि आपला संबंध संपला असं तिने कुटुंबासमोर जाहीर ही केलं...


राकेशच्या आईवडिलांचा आपल्या मुलासाठी जीव तुटत होता..पण त्याच्या कर्मानेच त्याने रक्ताची नाती गमावली होती...रमा ने सासू सासर्याला सांगितले...तुम्हाला जर मी या घरात रहावी असं वाटत असेल तर यापुढे राकेश शी कोणताही संबंध ठेवायचा नाही...तो मेला आपल्यासाठी कायमचा...


राकेश च्या आईवडिलांना राकेश नंतर रमाचाच आधार होता...पोटच्या पोराचे हे दुष्कृत्य पाहून त्यांनीही रमाचीच साथ दिली...


त्यादिवसानंतर रमाच आपल्या कुटुंबाचा आधार बनली...


तिच्याशी आपुलकीच नातं असणारयांनी तिला दूसरं लग्न करण्याचा सल्ला दिला...एकटीच आहेस मूल गाठीला असतं तर ठिक होतं...पण आता काय गरज आहे इथे रहायची..तू तुझं भलं बघ...लग्न करून सुखी हो...राकेश च्या घरच्यांची जबाबदारी काय तुझी एकटीचीच आहे का??


तो तर बसलाय तिथे जेल मधे जाऊन...मग तू कशाला खपतेस त्याच्या घरच्यांसाठी...त्यांच ते बघून घेतील की...


पण रमा ने ठाम नकार दिला...'माझं लगीन राकेश शी झालं तेव्हाच त्याच कुटुंब माझं झालं...आता या अडचणीच्या दिसात मी त्यांना यकटं कसं सोडू...??


संसाराची गाडी दोन चाकावर चालते असं म्हनत्यात ...पण एक चाक निखळलं तर दुसरया चाकाची जिम्मेदारी असती गाडीला सांभाळायची...मग मी तरी माझा यकटीचा इचार कसा करून चाललं...


आता हा संसार एकाच चाकावर चालणारं...


अनं खरेच त्या दिवसापासून रमा ने काबाडकष्ट करून आपलं कुटुंब सावरलं...सगळ्यांना आधार तिला...घरच्यांनी ही तिच्या त्यागाची जाणीव ठेवली...तिच्या भावनांची कदर केली...राकेशची साथ कायमची सोडली...


पण रमाचा हा प्रवास तितकाही सोपा नव्हता...अनेक संकटांना सामोरं जावं लागलं तिला...कोणाच्या वाईट नजरा पडल्या..त्या चुकवत स्वत: च शील सांभाळत ती जगत होती...लढत होती...


  राकेश ची बायको म्हणून लोकं तिला काम नाकारत होते...तिचा काही दोष नसताना...पण तीने हार नाही मानली...


आज तिला तिने कमवलेली नाती कामी आली...त्यांच्या सहकार्याने तिने आयुष्याला नव्याने सुरुवात केली...


लोकांचे टोमणे सहन करत होती...तिचा संघर्ष सुरु होता...त्याच्या कुटुंबा साठी 


तो मात्र तीची सुखी संसाराची सारी स्वप्न पायदळी तुडवून गेला...तिला एकटीला सोडून...ती मात्र ओढत होती...आपला एका चाकावर चालणारा संसार...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational