Sarita Sawant Bhosale

Inspirational

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

दिल तो बच्चा है जी

दिल तो बच्चा है जी

4 mins
450


सध्या कोरोना आजारामुळे रोज धावपळीच्या जगात व्यस्त असणारी मंडळी घरातच बसून आहेत. आता क्वारंटाईन टाईममध्ये टीव्ही,मोबाईल, वेब सिरीज, वाचन किंवा इतर टाईमपास तरी किती करणार. त्यात रोज काम आणि काम भरलेल्या डोक्यात काहीतरी नवीन आयडियाज येणारच ना... असंच काहीतरी टाईमपास व्हावा म्हणून फेसबुक वर आपल्या मित्रमैत्रिणीचे जुने फोटो वर काढून त्यावर मजेशीर कमेंट करायचा खेळ कोणीतरी सुरू केला.. कमेंट पण मग चारोळीत असावी किंवा कविता पण मजेशीरच. एक दिवस तर हे काय नवीन चाललंय हे कळण्यातच गेला पण मग मीही त्या खेळात सहभागी झाले एक गंमत म्हणून. आपले जुने फोटो समोरच्याने उकरून काढले की आपण पण त्याचे काढायचे नी करायची कमेंट. यातून झालं असं की बरेचसे आपलेच फोटो जसे विस्मृतीत गेले होते तसे रोजच्या व्यस्त जीवनात आपलेच सखे सोयरे मित्रही मागे राहून गेले होते ते पुन्हा भेटले. जणू खूप वर्षांनी ऑनलाईन का होईना पण गेट टूगेदरच झालं असंच वाटू लागलं. निदान या खेळानिमित्ताने भुतकाळात जुळलेले सूत जे भूतकाळातच जमा झालं होतं आज नव्याने जुळत होते.


चारोळीच्या कमेंट्समधून एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी हसत खेळत बाहेर पडत होत्या. फोटोसंबंधीच्या गंमती जमती नी आठवणी आपसूकच ओठांवर येत होत्या आणि त्यातून हास्याचे कारंजे फुलत होते.  या निमित्ताने काही क्षण का होईना पण कोरोना नावाचं वादळ जे डोक्याभोवती चोवीस तास घोंगावतय त्यापासून सुटका झाल्यासारखं वाटू लागलं. जुनेच पण नव्याने भेटलेले मित्र मैत्रिणी ऑनलाईन कट्टयावर धमाल करत होते. पण हे सगळ्यांनाच पटत असतं अस नसत ना...काहीजण यालाही अपवाद असतात. अशीच एक अपवादात्मक व्यक्ती मला म्हणाली "अगं काय हा बालिशपणा... हे अशा कॉमेंट करायला, असले खेळ खेळायला आता काय लहान आहे का आपण आणि ज्याच्यावर कंमेंट करतोय त्याचा तरी विचार करावा जरा.. काय वाटत असेल किंवा नसेल. आपलं वय काय नी आपण करतोय काय बघ जरा". बापरे काही क्षण मला वाटलं मी म्हातारी वगैरे झाली का काय. आता हा खेळ काही ठराविक वयासाठी किंवा कोणासाठीही बंधनकारक नव्हता त्यामुळे ज्याला स्वतःहून सहभागी होण्याची इच्छा होती ते तसे होत होते. आनंदाने ज्याला पटेल तोच हा खेळ पुढेही नेत होता त्यामुळे कोणाला काय वाटत असेल हा प्रश्नच नव्हता.    


आता राहिला प्रश्न बालिशपणाचा... तर ते माझ्यासाठी सत्तरी आली किंवा शेवटचा क्षण आला तरी आम्ही "दिल तो बच्चा है जी" असेच काहीसे असणार. उंचावरून कुठे कधी पडलो, ढासळलो तर स्वतःवरच फिदीफिदी हसणारं मन माझं त्यावेळी त्या क्षणाचा फक्त आनंद घेत असतं... मग माझं वय काय आणि कसं वागावं याच मापन करत बसत नाही. मजा, मस्ती, खोड्या हे सगळे प्रकार लहान वयातच करावेत असा काही नियम आहे का.. नाही ना... नसावाच मुळात. वय वाढत चाललं म्हणून माणसाने स्वतःत लपलेल्या लहान मुलाला कोंडून ठेवू नये. दुःख, ताणतणाव, संकट, वादळ वारे, भूकंप, अंधार, कष्ट, या लाटा जसे मोठे होत जाऊ, कळते होत जाऊ, वय वाढत जाईल तशा आपल्यावर रोज नव्याने आदळतच राहणार आणि या परिस्थितीत आपण मात्र गंभीर, वयाने नाही पण मोठे झालो या विचाराने सुरकुत्याग्रस्त झालेला चेहरा आरशात पाहात बसायचं. तोंड पाडून बसायचं... काय मिळत यातून? परिस्थिती बदलते का? नाही ना मग हसून पाहावं जरा... कधी वाटलं उड्या माराव्या तर मारून घ्याव्या... नाचावं वाटलं नाचून घ्यावं... एकट्यालाच वाटलं फुगे उडवावे तर उडवून घ्यावे... बागडावं की मनसोक्त हवं तसं. याने परिस्थिती नाही बदलणार पण आपल्यात सकारात्मकतेची ज्योत नक्की पटेल. चिंतेने दाटलेल्या सुरकुत्या हास्याला घाबरून पळून नक्की जातील. मित्र मैत्रिणींसोबत जुन्या आठवणींना उजाळा देऊन मनाचा थकवा नक्कीच दूर होईल. किती दिवसांनी आपण असं हसलो... नाही का! असं आपसूकच तोंडातून बाहेर पडेल आणि आपल्याच अल्लडपणावर, बालिशपणावर पुन्हा प्रेमात पडाल.    


कितीतरी व्यक्ती दृष्टीस पडतात ज्यांना मागे वळून पाहताना एक खंत सतावत असते ती म्हणजे त्या निश्चित परिस्थितीतही मी जरा बालिश होऊन जगायला पाहिजे होतं... पाऊस पडत होता चिंब भिजायला पाहिजे होतं... लहान मुलांसोबत चिखलात माखायला पाहिजे होतं. मित्राने ऐकवलेल्या जोकवर खळखळून हसायला हवं होतं.. खरंच या वयात हे शोभत का असं म्हणण्यातच फार जगायचं राहून गेलं असेही म्हणतात. का कोंडमारा करा मग आपल्या भावनांचा?? ते वयाचं, पैशाच, श्रीमंतीच किंवा लोक काय म्हणतील याच स्टेटस बाळगून आपल्यातील लहान मूल आपणच मारत असतो... आतल्या आत रडतही असतो पण हे आपल्याला शोभत नाही या लेबलखाली होणारी घुसमट मात्र जिवंत ठेवतो. आपलं तर एकच ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे "आयुष्य पुन्हा लाभणार नाही मग मस्त जगायचं, हसायचं, बागडायचं... बालपण जिवंत ठेवूनच." बालपण त्या स्वच्छंद बागेत फिरणाऱ्या फुलपाखरा सारखं असतं... आजूबाजूला फक्त देखणं सौंदर्य, त्यात फक्त रममाण व्हायचं, मनसोक्त हिंडायचं, उडायचं आणि स्वतःसोबत इतरांच्या चेहऱ्यावरही हसू फुलवायचं. त्यालाही माहीत असतं की आपलं आयुष्य फार कमी दिवसांच आहे पण म्हणून ते हिरमुसून कोपऱ्यात नाही ना बसत. फुलपाखरू बनून जगण्यात वेगळीच मजा आहे. आपल्यातल्या बालिश मुलाला वेळोवेळी सोबत घेऊन जगण्यातच जीवनाचं खरं सौंदर्य आहे. बाकी सुख दुःख मानण्यावर असतंच तसं कोणत्या परिस्थितीत आपण दुःखाला कवटाळतोय की सुखाला जवळ करतोय हे ज्याने त्यानेच ठरवायचं. पण "दिल तो बच्चा है जी" असं म्हणणारा माणूस सुरकुत्यांसोबत जगण्याऐवजी चिरतरुण नक्की राहील.    


मग जगताय ना दिल तो बच्चा है जी म्हणतं... जगलंच पाहिजे. कोणी काही म्हणो "हम तो ऐसे है भैया, ये आपण स्टाईल है भैया" म्हणत हसत राहायचं.. ज्याला पोक्त झालोय अस वाटतंय तो गांभीर्य चेहऱ्यावर घेऊन ओठात आलेलं हसू लपवत मनात खदखदत बसेल किंवा तुमच्या बालिशपणाला पाहून कुत्सित का होईना पण हसेल मग त्या निमित्ताने तरी हसू द्या. आपणही राहू हसत आणि हसवत.. हो ना...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational