Jyoti gosavi

Tragedy Classics Others

3  

Jyoti gosavi

Tragedy Classics Others

दहीहंडी

दहीहंडी

5 mins
206


पावसाळा सुरू झाला कि श्यामला खुप आनंद व्हायचा, कारण त्यानंतर पुढच्या महिन्यात श्रावण महिना यायचा. गोकुळाष्टमी झाली की दुसऱ्या दिवशी दहीहंडी. त्या दहीहंडीसाठी ते आषाढी एकादशी पासूनच प्रॅक्टिस करायला सुरुवात करायचे.त्यांचा एक पण तरी उस्ताद असायचा, तो त्यांची बरोबर प्रॅक्टिस करून घ्यायचा, आपले अनुभव पणाला लावायचा. थरावर थर कसे रचायचे, खाली तळाला ताकतवान आणि जाड माणसे उभी करायची. त्यांनी पाय घट्ट रोवून उभे राहायचे. मग एकाच्या खांद्यावर दुसरा, दुसऱ्याच्या खांद्यावर तिसरा, असे करत करत पाच जणांचा थर रचला जायचा.आणि एकदाची हंडी पर्यंत पोचण्याची उंची व्हायची.


मग ही प्रॅक्टिस दररोज सुरू असायची . श्याम अगदी पाच -सहा वर्षाचा असल्यापासून, दहीहंडीच्या वरच्या थरावरती असायचा.आणि अजिबात न घाबरता, खाली न बघता, तो आपला नारळ काढून ती हंडी फोडायचा. मग त्या कौतुकभरल्या नजरा, आणि लोक त्याला अगदी अलगद झेलायचे.कधीच खाली पडू द्यायचे नाहीत.मग ती जिंकण्याची नशा, त्यानंतर होणारा जल्लोष, गाण्याच्या तालावर नाचणारे गोविंदा, आणि स्टेजवर जाऊन पारितोषक घेताना तो बाल गोविंदा, सगळ्यांच्या कौतुकभरल्या नजरा झेलत, बक्षीस, पैसे, ट्रॉफी घेऊन खाली यायचा. अर्थात ती काही त्याच्या एकट्याची नसायची. नंतर सगळे जण वाटून ती घेत असत. त्यातही कोणी जखमी झाले, कोणाचा हाड मोडला, त्याचा औषध उपचार तो जरी फुकट होत असेल, तरी कामावर जाणार असेल तर थोडीफार नुकसानभरपाई घरी द्यावी लागायची. ट्रकचे भाडे, दिवसभराच्या खाण्यापिण्याचा खर्च, त्यातून काही फायदा नसायचा. पण एक मर्दानी खेळ ,एक जल्लोष, एक नशा, म्हणून फायदा तोट्याचा विचार न करता वर्षानुवर्षे अनेक गोविंदा मंडळे हा खेळ खेळत होती .


पुढे सगळ्याच गोष्टींचे ग्लोबलायझेशन झाले, मोठे मोठे पुढारी ,राजकारणी, या सांस्कृतिक उत्सवामध्ये पडले आणि सारं काही बदललं. नवीन गोविंदांना ते आवडत होतं, पण जुन्या गोविंदांना ते पटत नव्हतं.तो एक खेळ होता ,पण म्हणून काही गोविंदाच्या जीवाशी खेळायच? राजकारणी तर अकरा अकरा लाखांचा रकमा लावू लागले. आणि आपली दहीहंडी प्रतिष्ठेची बनवू लागले. दहीहंडी ग्लोबल झाली आणि भारतातच काय पण सातासमुद्रा पलीकडे फेमस झाली. नंतर हळु एकाचे अनुकरण दुसऱ्यांनी करत- करत सगळेच पक्ष आपापली एक मोठी मोठी दहीहंडी लावू लागले. ज्याच्या रकमा पाच लाख, सात लाख ,अकरा लाख, एवढेच काय पण 51 लाखापर्यंत गेल्या. 


शिवाय राजकारण्यांना दिवसभर इव्हेंट करायचा असायचा, त्याच्यासाठी मोठे मोठे गायक, ऍक्टर, नावाजलेला ऑर्केस्ट्रा सारेकाही यायचं. 

मोठी मोठी मंडळी आपली हजेरी लावून जायची . आणि ही पोर देखील दिवसभर ट्रकमधून फिरत असायचे. कुठली हंडी मोठी आहे ,कोणत्या हंडीला जास्त बक्षीस आहे, हे सारे बघण्यासाठी फिरत असायची, आणि सगळी मंडळी जिथे जास्त बक्षीस आहे तिथेच घिरट्या घालायची. तिथे त्यांच्यामध्ये हंडी फोडण्यासाठी चढाओढ लागायची, संघर्ष व्हायचा, कधीकधी मैदानाबाहेर मारामारी पण व्हायची, 


हे सारं आता हाताबाहेर गेलं होतं. श्यामच्या घरात देखील आता या गोष्टींना विरोध होता. अरे बाबा रे नऊ नऊ थर लावायचे ,म्हणजे काही गंमत आहे का? तो कृष्ण पण एवढे थर लावत नव्हता, तो तर देवाधी देव होता. त्याने एकट्याने हात वर केला असता, तरी सगळे दही लोणी हाताशी आले असते. परंतु एकीचे बळ दाखवण्यासाठी, त्याने अशा काही क्लुप्त्या केल्या. आमच्या लहानपणी तर काठीने हंडी फोडत असत, आई बडबडत होती. 


श्याम तू या वर्षी जायचं नाही, मला भीती वाटते. "मरो ते बक्षीस" आपण काही त्याच्या पैशावर ते आहोत का? मग तू का ऐकत नाहीस? यावर्षी तू प्रॅक्टिसला जायचे नाहीस. 


अग आई कशाला घाबरतेस? वयाच्या पाचव्या वर्षापासून मी हंडी फोडतोय. अगदी वरच्या थरावर जाऊन फोडतोय, तेव्हा तरी मला काही झालं का? 


अरे तेव्हा तू लहान होतास, तुझे वजन कमी होते. आता तू मोठा झालास. 

अगं यावेळी मी नाही वरच्या थरावरती, वरुन दुसर्‍या थरावर असेन. हंडी फोडणारा बाळगोपाळ वेगळा आहे. 

त्या बाजूंच्या शिर्के ची मुलगी आहे ना?संपदा! तिला यावेळी कृष्ण केले आहे. हंडी फोडण्यासाठी जी वरच्या थरावरती जाणार आहे. 

पण हे आता बंद करा


  श्याम न ऐकता प्रॅक्टिसला जातच राहिला. बघता- बघता आषाढ महिना निघून गेला. आज कृष्णजन्म आणि उद्या दहीहंडी, संध्याकाळी मोठा जल्लोषात कृष्णजन्म झाला. परंतु आता टीव्हीवर गेल्या वर्षी खाली पडून, जायबंदी झालेल्या गोविंदाची मुलाखत दाखवत होते. तो गोविंदा हात जोडून सर्वांना सांगत होता, बाबांनो मी पण असाच तुमच्यासारखा एक उत्साही गोविंदा होतो आणि मोठ्या जल्लोषाने वरती जाऊन हंडी फोडत होतो. पण गेल्या वर्षी मी पडलो, डोक्याला मार लागला, बेशुद्ध झालो. त्यानंतर हॉस्पिटलला आई-वडिलांनी लाखोंनी खर्च केला, तेव्हा कुठे मी हाती लागलोय. पण कायमचा अपंग होऊन या खुर्चीत बसायची पाळी आली. ना कुठलं मंडळ आल, ना सरकार आलं, ना ज्यांनी मोठे मोठे बक्षीस लावले होते, ते आयोजक आले. शेवटी आता माझ्या घरच्यांवर मी ओझ झालो आहे. तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्ही हे सोडून द्या. आणि आपला सण-उत्सव म्हणून करायचे झाले तर पाच थरांच्या वर थर लावू नका. 


अरे श्याम बघ! बघ, तो गोविंदा काय सांगतोय! आई म्हणाली 


अग ते दरवर्षीच पडलेले गोविंदा, असं काही सांगत असतात. त्यांच्या टीमच काहीतरी चुकलेलं असतं, किंवा त्यांचं स्वतःचं काहीतरी चुकलेल असतं, तेव्हा ते अशी जखमी होतात. आमची टीम, आमचं मंडळ, एकदम पक्क आहे. गेले कित्येक वर्षे आम्ही ती मानाची हंडी फोडता होत आहोत. 


श्यामने काही घरच्यांचे ऐकले नाही .तो दरवर्षी प्रमाणे आपल्या चमू बरोबर गेला, त्यांच्या मंडळात देखील, दरवर्षी 1/2 गोविंदा जखमी होत होते. 

ते काही पुन्हा येत नव्हते. कोणाचा हातपाय मोडत होता, कोण जायबंदी होत होता, कोण बरा होत होता. तर कोणाला कायमचे अपंगत्व येत होते. परंतु पुढची पिढी काही त्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हती. कानाडोळा करत होती. आणि प्रत्येकाला जिंकण्याची नशा होती. शेवटी त्या मानाच्या मंडळाची 21 लाखाची हंडी फोडण्यासाठी श्याम चे पथक आले. आधी छान नाचून वगैरे झाले, अंगावर पाणी टाकून झाले, मग आयोजकांचे भाषण झाले. 


आज पर्यंत आमची हंडी फोडण्याचा मान तुम्ही घेतलेला आहे, यावर्षी देखील तुम्ही हंडी फोडाल याची आम्हाला खात्री आहे. यांच्या गोविंदाने नाचून जल्लोष केला, पण गडबड झाली. इतर ठिकाणी सात थर लावले तोपर्यंत संपदा वर चढून हंडी फोडत होती. पण नऊ थरांसाठी वरती चढायला ती काही तयार होईना. ती घाबरू लागली, ती घाबरते म्हटल्यावर तिला वर चढवले नाही. त्यातल्या त्यात वजनाने हलका शामच होता. मग त्यालाच वरच्या थरावर जाण्यासाठी सांगण्यात आले. असेही वरून दुसऱ्या थरापर्यंत तो तर असणारच होता. अजून एक थर वरती. 


त्याला पूर्वीचा अनुभव होता, त्यामुळे तो तयार झाला .सर सर सर वरती चढत गेला, वर जाऊन त्याने हंडीला हात घातलादेखील, तोच काहीतरी गडबड झाली. तिसऱ्या थरांमधील मुलांचे हात सुटले आणि सगळेच ढिगाऱ्यासारखे एकमेकावरती पडले. श्याम वरती एका हाताने रश्शी धरून लटकत राहिला. एका हातात नारळ तसाच होता, त्याने मोठ्या जिद्दीने मटका फोडला, आणि त्याचा दुसरा हात निसटला. खालच्या गर्दीने त्याला झेलण्याचा प्रयत्न केला, पण तो बाजूला जाऊन खालीच पडला. डोक्याला मार लागला आणि बेशुद्ध होता होता त्याला आईचे शब्द आठवत राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy